Sunday 27 October 2019


टेक्नोसॅव्ही होतांना ...


नव्वदीच्या वा नंतरच्या काळात जन्मलेल्या पिढीचं मस्त चालू असतं, नवनवीन 'गॅझेट्स' हाताळणं. नवनवीन ऍप वापरणं, नवीन टेक्नॉलॉजिशी जमवून घेणं. इ- कॉमर्सचे व्यवहार सफाईने करणं. पेटीएम, पे-फोन, गुगल-पे, ओला, उबर, स्वीग्गी, अमेझॉन इ. साऱ्या ठिकाणी डिजिटल मनी अगदी 'इझ'मध्ये फिरवत असतात. नेट बँकिंग, ऑन लाईन बिल भरणे, मनी ट्रान्स्फर इ. बँकेच्या माध्यमातून होणारे व्यवहार म्हणजे त्यांच्या दृष्टीने डाव्या हाताचा मळ !

आताची 'जनरेशन' जन्माला आल्यावर, पीसी, लॅपि, पीडी, किंडल असे सारे शब्द अंगाईगीतासारखे ऐकत असते. त्यांच्या आयांना म्हणा, कुठलं अंगाईगीत यायला. पण ह्याच साऱ्या गोष्टी, सत्तरीच्या, ऐशीच्या दशकात जन्मलेल्या पिढीच्या दृष्टीने 'टफ टास्क'. वयाच्या पंचविशीत पहिल्यांदा कोंपुटर पाहिलेला. तो ही भला मोठा डेस्कटॉप. त्यापूर्वी कधीच कॉम्पुटरशी संबंध आलेला नाही. त्यानंतर आला 'पेजर'. नवीन जनरेशनला हा प्रकार, बहुधा माहिती नसणार ! मग ते ते फ्लॅट स्क्रीन मॉनिटर, टीव्ही आले. पूर्वीचे साधे मोबाईल, 'नोकिया' कंपनीचे, ह्या जनरेशननी मात्र पहिल्यांदा हाताळले. त्याचा उपयोग फक्त कॉल करणे व स्वीकारणे इतकाच. रेंजची फारच बोंब असायची.

मग खूप वर्षांनी ते 'नोकिया' कंपनीचे हँडसेट जाऊन, आधुनिक 'अन्ड्रॉईड' तंत्रज्ञानाचे 'सॅमसंग' वगैरे कंपनीचे हँडसेट बाजारात आले. आणि नोकीया कंपनी हे नवीन तंत्रज्ञान वापरात नसल्याने इतर कंपन्यांच्या स्पर्धेत बरीच मागे पडली, मार्केटमध्ये आऊटडेटेड तंत्रज्ञान वापरल्याने. जगण्याच्या मार्केटमध्ये आऊटडेटेड होऊन गायब व्हायचं नसेल तर, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावेच लागेल. त्याला आपलंसं करावंच लागेल, टेक्नोसॅव्ही व्हावं लागेल, हाच ह्या जुन्या जनरेशन करता धडा.
 
पण हे टेक्नोसॅव्ही होतांना ... थोडं काळजीपूर्व, थोडं सावधपणे. सोशल अकाउंट हॅक होणं, बँकेच्या अकाउंट मधून पैसे काढून घेतले जाणं, असे प्रकार आजूबाजूला घडतांना आढळतात. मागच्यास ठेच, पुढचा शहाणा ह्या न्यायाने काही गोष्टीत सजग असणं खूप आवश्यक. 'डूज आणि डोन्ट डूज' ह्यातली नियमावली नेमकेपणाने 'फॉलो' करणे हा पहिला नियम! जस की आपला ई-मेल अकाउंटचा पासवर्ड कुणाशी शेअर न करणं. एटीएम पिन कुणालाही नं सांगणं. मोबाईल सेट वऱ अपरिचित ऍप डाउनलोड न करणं. इ. गोष्टी प्राथमिक गरजेच्या.

शेवटी एकचं सांगणं, टेक्नोसॅव्ही होतांना ...
सावध हरणी सावध गं
करील कुणीतरी पारध गं
हे आपणाला सर्वांना परिचित असलेलं गाणं लक्षात असू द्या, म्हणजे झालं.


-----अनिल सुमति बागुल
anilbagul1968@gmail.com


फराळ, फटाके आणि चटके



लग्नाला आता दहा वर्षे झालीत. घरात 'स्वराली'च्या, मुलीच्या रूपाने सुख नांदते आहे. दिवाळी दाराशी आलेली आहे. 'गोविंदनगर'च्या ऐसपैस फ्लॅटमध्ये साफसफाई जोरात सुरु आहे. त्यात परत फराळ करायची धांदल ! नवरोबाला चिवडा, चकली आवडते, तर स्वरालीला करंज्या. खरं तर स्वरालीचा हट्ट होता फटाके आणण्याचा. पण नवरोबा पडले पर्यावरण प्रेमी. 'ग्लोबल वार्मिंग', 'कार्बन उत्सर्जन', 'इ -दिवाळी' असे मोठे मोठे शब्द वापरून तो स्वरालीला दिवसभर समजावत राहिला. शेवटी 'पिंक कलर'चा एक ड्रेस आणि किंडल ह्यावर तह आटोपला.

सायंकाळी बायको दरवाजात रांगोळी काढत असतांना, शेजारी 'मेहतां'च्या घरी लगबग सुरु झालेली तिला जाणवली. आनंदीबेनने बडोद्यावरून पाहुणे-तिचा भाऊ, भावजय आणि भाची आल्याची माहीती दिली. यावेळी भाऊबीजेला त्या बडोद्याला जाणार नव्हत्या, त्यामुळे भाऊंचं इथं आला होता.

दुसरा दिवस उजाडला, आज 'धनत्रयोदशी'. आज पासून खरी दिवाळी सुरु होणार. बायकोने चिवडा चकली आणि करंजीचे डबे काढले फराळाला, आणि नवरोबा आणि स्वरालीला आवाज दिला. दोघेही तुटून पडले. फराळावर, ते पाहून बायको समाधानी. इतक्यात आनंदीबेन घरात शिरतात. पाठोपाठ आनंदीबेनची भाची. आनंदीबेनने ओळख करून देतात, ''ही काव्या''.

''भाभी हैप्पी दिवाली, जिजू हैप्पी दिवाली'', इति काव्या.
नुकतीच विशी पार केलेली, काव्या फारच बोलकी वाटत होती. काळ्याभोर टप्पोऱ्या डोळ्यांची, गोरीपान काव्या, ब्लू जिन्स आणि वाईन कलरच्या टीशर्टमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
''हॅलो स्वराली, लोनी असं म्हणून, तिने स्वरालीच्या हातात भली मोट्ठी 'कॅडबरी' टेकवली.
''जिजू, ये लोनी, स्पेशल फाफडा, फॉर यू. '' असं म्हणत एक छान पॅक केलेला डब्बा, नवरोबाच्या हातात दिला. तिच्याकडे डोळे फाडून पाहणाऱ्या नवरोबाची नजर, बायकोला काहीतरी सांगून गेली.

संध्याकाळी तिघे, दरवर्षीप्रमाणे कपालेश्वर मंदिरात दर्शनाला जाऊन आले. सोसायटीच्या गेट मधून शिरतानांच, ‘काव्याचा खिदळण्याचा, आनंदाने चित्कारण्याचा आवाज येत होता. ती फटाके उडवण्यात दंग होती. बायकोने स्वरालीकडे आणि नवरोबाकडे पाहीले, दोघांचंही लक्ष काव्याकडे !

दिवाळीचा आज तिसरा दिवस, आज लक्ष्मीपूजन. नेहमीप्रमाणे तिने, स्वरालीला आणि नवरोबाला फराळाला बोलावले. तर दोघेही काव्याने दिलेला 'फाफड्या'चा डबा उघडून खाण्यात दंग. आज स्वरालीला, करंजी नकोशी झालेली आणि नवरोबाला चिवडा,चकली ! बायको काय समजायचे ते समजून चुकली.

फराळ होताच स्वराली, नवरोबा आणि काव्या बाहेर पडले बाजारात जाण्यासाठी. तिघांच चांगलच गूळ-पीठ जमल्यासारखं ! साधारण दोन तासांनी ते येतात तेच मुळी, हसत-खिदळत. तिघांच्याही हातात मोठ्ठाल्या प्लस्टिक पिशव्या !! फटाक्यांची मोट्ठी खरेदी झालेली. भुईचक्र, फुलबाज्या, भुईनळे, कारंजे, बाण, लवंगी फटाके आणि लक्ष्मी बॉम्ब ! मनाजोगते फटाके मिळाल्यामुळे स्वराली खुशीत. बायको नवऱ्याकडे पहाते.
''अगं स्वरालीचा खुपच हट्ट होता, म्हणून आणले. ते ग्लोबल वार्मिंग वगैरे ठीक आहे पण आपली संस्कृती टिकवणंही महत्वाचं. आणि मुलांचा आनंद का म्हणून आपण हिरावून घ्यायचा ? आणि तसही वर्षाच्या शेवटी, थर्टी फर्स्टला, नवीन वर्षाच्या स्वागताला, संपूर्ण जगात फटाके वाजतातच की?’’ नवरोबाचा भला मोठा खुलासा.

आज 'भाऊबीज'. बायको आणि आनंदीबेननी, ओवाळण्याचा कार्यक्रम एकत्र ठरवलेला. त्याप्रमाणे संध्याकाळी सगळे जण त्यांच्या घरी जमतात. आनंदीबेन त्यांच्या धाकट्या भावाला ओवाळतात. इतक्यात बायको नवरोबाला पाटावर बसायला सांगते, आणि 'काव्याला' चक्क गुजरातीत म्हणते,
‘’काव्या, तने तारा भाईने ओवाळू नथी के? ... तुला तुझ्या मोठ्या भावाला ओवाळायचं नाही का?’’
नवरोबा अवाक होऊन बायकोकडे पहातो. बायको मिश्किलपणे हसत असते. इतक्यात आनंदीबेन, काव्याच्या हातात ओवाळणीचं ताट ठेवतात. काव्या पुढे होते आणि नवरोबाला ओवाळते. ओवाळणी म्हणून पाचशेची नोट, ताटात ठेवतांना नवरोबाचा चेहरा, फटाक्यांचे चटके लागल्यासारखा अपराधी झालेला असतो. 

anilbagul1968@gmail.com






माजे राणी माजे मोगा



आंतरजातीय लग्नानंतरची आणखी एक गंमत ...

लग्नाला आता तीन वर्षे होऊन गेलीत. नव्या नवलाईची भरती संपून वादाच्या ओहोटीला सुरवात झालेली. दिवसाआडच्या चकमकी ठरलेल्या. एके दिवशी तर धुमशान घडून गेलं. एकमेकांच्या आई-बापाच्या नावाने उद्धार आणि एकमेकांच्या जातीवरुन वस्त्रहरणचा दशावतारी खेळ ! 
‘’तुझ्या आवशीचा घो!’’ नवरोबाने मालवणीचा आधार घेतला.
‘’दोन बापचा तू!! बायकोचा अस्सल नाशिक ठसका.  
वस्त्रहरण नाट्यातली ही दोन शेवटची वाक्ये !!!

बायकोने त्यानंतर अबोला धरला, घाईघाईने बॅग भरली आणि माहेरची वाट धरली. नवरोबा गुश्यातच होते. त्याने तिला अडवायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. रात्रभर नवरोबा विचार करत राहिला. आंतरजातीय लग्न करून आपण मोठी चूक केली का काय ? असं त्याला वाटू लागले. दोन दिवस झाले, तीन -चार दिवस उलटले. बायको घरी येईना आणि फोन पण घेईना. एव्हाना नवरोबाचा तो विचार कुठल्याकुठे गायब झाला. 'जमदग्नी' अवतारातून 'नवरोबा' अवतारात त्याचा ससा होऊन बसला. सासुरवाडीकडून तरी बोलावणं येईल ह्या अपेक्षेत तो होता. तो ही अपेक्षाभंग झाला. त्याच्या जीवाची घालमेल सुरु झाली. बायको आपली चांगलीच रिसवांन आहे, हे तो तीन वर्षांच्या सहवासात ओळखून गेला होता. अखेर त्याने मनाचा हिय्या केला आणि सासुरवाडी जवळ केली.

सासरी जावईबापूच थंड स्वागत झालेलं.
‘’जावईबापु, असं वागणं आमच्या बुद्धीला पटत नाही.’’ सासरेबुवा गुरगुरले.
इतक्यात स्वयंपाक घरातून भांड्याच्या आवाजाच्या तीन फैरी सासुबाईंनी झाडल्या. पाठोपाठ चहाचा कप, समोरच्या टीपॉय आदळून बायको तरातरा निघून गेली. नवरोबा मनातून जाम हादरून गेला. 

तुम्ही व्हा फुडं, तिची आई लेकीला पोहोचवून देईल उद्याच्याला’’ सासरेबुवांच्या ह्या शब्दांनी त्याला थोडा धीर मिळाला. त्याने मोका साधला आणि काढता पाय घेतला. दुसर्‍या दिवशी सासुबाईंनी लेकीची पाठवणी केली पण जातांना नवरोबाची चांगली शिकवणी घेतली. घरी बायको कामे सारी करीत राहिली पण अबोला कायम. तिला तसं गूश्यातच पाहून नवरोबा चक्रवला. शेवटी त्याने त्याच्या पुण्याच्या भावाचा सल्ला घ्यायच ठरवलं. घाईघाईने मोठ्या भावाला, विवेकला फोन केला, घडलेलं सारं कीर्तन गायलं.

''शिरीष, अरे काहीही विशेष घडलेलं नाही, उगाच टेन्शन घेऊ नकोस. घरोघरी असेच कार्यक्रम 'व्यवस्थित' होत असतात. तुझाही 'यथासांग' पार पडलाय. ''
नवरोबा अवाक होऊन ऐकतच राहिला.
''दादा, अरे ह्याच्यातून मार्ग कसा निघणार ते सांग ना? थोड्याश्या नाराजीने नवरोबाने विचारले.
‘’अरे शिरीष, तुमच्या प्रेमाची गोडी कमी झालीय, ती वाढव फक्त. थोडासा रुमानी हो जाय!’’ विवेक त्याला म्हणाला.

रविवार असून नवरोबा दुसर्‍या दिवशी सकाळी, लवकर उठले. आळोखे पिळोखे देत त्याने शेजारी पहिले. बायको पलंगावर घोरत पडलेली. घाईघाईने त्याने तोंड धुतले आणि लिव्हिंग रूम तडक गाठली. सफाईने  म्युझिक सिस्टम सुरू केली.
असा बेभान हा वारा sss.’ लतादिदींचा मखमली सुर घरात पसरू लागला.
आता नवरोबाने किचन गाठलेलं. चहाच पातेलं गॅस वर ठेऊन गाणे गुणगुणू लागला.

''गुड मॉर्निंग डार्लिंग. चाय ईज रेडी!'' टेरेस मध्ये झोपाळ्यावर बसून गाणे गुणगुणत बसलेल्या बायकोला उद्देशून नवरोबा म्हणाले. बायकोचे चकार शब्द नाहीत, मात्र चहा पिऊन कप खाली ठेवतांना मात्र बायकोने दाद दिली चहाला.
‘’मस्त झाला होता चहा, थॅंक यू डार्लिंग!’’

ते ऐकताच नवरोबा पार विरघळून गेला. झटक्यात पुढे झाला, तिला जवळ घेतलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवून मोकळा झाला. म्युझिक सिस्टम वर एव्हाना गाणं बदललं होतं.

लतादीदी आता गोड कोकणी गीत गात होत्या 
माजे राणी, माजे मोगा, तुजे डोळ्यात सोधता ठाव
माजे राजा, माजे मोगा, तुझे नावाक जोडता नाव
फुलाफुलांक पुशीत आयलो, तुजे माजे प्रीतीचो गाव

anilbagul1968@gmail.com




धोड्यांब्याच्या बेबी आत्याची छोटी





केवळ सहा नातेवाईक असणारा, पुण्यात भावाकडे राहून इंजिनीअर झालेला, कोकणस्थ नवरोबा. नाशकात नोकरी निमित्ताने आलेला, आंतरजातीय विवाह स्वतः ठरवून, करून मोकळा झालेला. पण बायकोच्या सख्या-चुलत नातेवाइकांनी आणि इथल्या खेडेगावच्या चित्र-विचित्र नावांनी पुरता भंजाळलेला.

आंतरजातीय विवाह केलेल्या, नवरा-बायकोच्या संसारातील आणखी एक गम्मत ....

मे महिन्यातली सायंकाळ. मस्त वारा सुटलेला. औरंगाबाद रोडवरच्या कुठल्याश्या मंगल कार्यालयाच्या हिरवळीवर, नवरोबा सपत्निक उभा. झकास लायटिंग. मराठी भावगीतांचा वाद्यवृंद मेंदीच्या पानावर. गायक – गायिका तळमळीने गातायत. अष्टविनायक चित्रपटातलं 'ते' गाणं.
दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
पण गाण्यांकडे कुणाचंही लक्ष नाही. सारे गप्पा मारण्यात, विनोदावर हसण्यात, एकमेकांना टाळ्या देण्यात दंग.

खेडलेझुंगेच्या धाकट्या मावशीच्या मुलीचं लग्न. ‘’जवळचं लग्न आहे. आपल्याला जावच लागेल.’’ बायको. खेडलेझुंगे नावाचं गाव असतं, हेच माहीत नसलेल्या नवरोबाला धाकटी मावशी कुठून आठवणार? पण लग्न होऊन आता दोन वर्ष झालेली.

‘’तुम्हाला व्यवहारातलं कवडीचं कळत नाही’’, हे बायकोचं ठाम मत, एव्हाना त्याला पूर्णपणे पटलेलं. त्यामुळे बायको बरोबरची त्याची वरात नेहमीचीच ठरलेली. तशीच आजचीही.

गोरज मुहूर्तावरचं लग्न. पण पत्रिकेतला मुहूर्त नावालाच असल्यासारखा. नवरोबाला ह्याचं फारच नवल. कोकणात, पुण्यात लग्नाचा मुहूर्त म्हणजे, स्टॅं. टा. - स्टॅंडर्ड टाईम. भटजीबुवांची किती धांदल असायची.

‘’मुलीच्या मामांनी नवर्‍या मुलीला ताबडतोब घेऊन. मुहुर्त जवळ आलाय.’’ असा पुकारा असतो तिथे. 

इथं सारं निवांत. नवर्‍या मुलाची वरात यायला अजून किमान अर्धा तास लागेल, अशी माहिती बायकोनी दिलेली. आजूबाजूला तुडुंब गर्दी. नवरोबाच्या मनी आश्चर्य ! ह्यांचे एव्हढे नातेवाईक आहेत ?

कोकणात मामा आणि मामी. त्यांना मुलबाळ नाही. पुण्यात, सदाशिव पेठेत राहणारा मोठा भाऊ विवेक, त्याची बायको अंजली आणि त्यांची मुलगी वीणा. हे सोडले तर त्याला सहावा नातेवाईक नाही, बायको सोडून. इथं तर कुंभमेळाच भरलाय जणू.

इतक्यात एकजण त्यांच्या दिशेने येतो.
''हा विजय. माझ्या चुलत काकीचा - नंदा काकीचा धाकटा''.
‘’ही मंदाक्का. वडाळीभोईच्या ताई आज्जीची थोरली’’.
मग हा अमुक, अन ती तमुक असं करत, बायको डझनभर नातेवाईकांची ओळख करून देत रहाते.

''अय तायडे, ईठं पाय ना, माझी दे की दाजींशी ओळख करून.''
पांढर्‍याफेक धोतर टोपीतला, एक काळाकुट्ट इसम त्या दोघांच्या दिशेने उत्साहात येतो. त्यांच्या पाठोपाठ जाडगेली ठुसकीशी बाई पाय फरफटत येते. आल्यासरशी बायकोला घट्ट मिठी मारते. आसवांचा हुकमी मारा मग दोघांच्या डोळ्यातून सुरु होतो. नवरोबा हैराण. आजवर कधीही न पाहिलेली दोन माणसं त्याच्या समोर. यत्किंचितही ओळख नसणारी. त्यातला पुरुष, बायकोला तायडे तायडे म्हणतोय आणि बाई चक्क बायकोला जवळ घेऊन अश्रू ढाळतेय ! आसवांची गर्दी ओसरल्यावर बायको भानावर येते. पदरानं डोळे पुसल्यासारखे करत त्या दोघांची ओळख करून देते.

‘’हे दौलतअप्पा. माझे सख्खे-चुलत मामा. सुकेणेचे शांतारामतात्या नै का, त्यांचे हे आत्येभाऊ, पिंपळस रामाचे इथं असतात.’’

सुकेणे कुठे आहे? ह्या भूगोलात नवरोबा हरवलेले. त्यामुळे 'कुटुंब इतिहास ऑप्शन'ला टाकल्यागत. नवरोबाची ही गडबड, बायकोच्या लक्षात येते. 

‘’अरे सुकेणे म्हणजे कसबे सुकेणे. हिराबाईची धाकटी नै का दिलीय तिथं होळकरांना?’’
नवरोबाने समजल्यागत मुकाट मान हलविली. हे सख्खे-चुलत काय असतं? ह्यानं तो आधीच गोंधळलेला !

''अय तायडे, अगं हिची बी ओळख करून दे ना.’’ दौलतअप्पा.
‘’अय्या, राहिलच की !’’
‘’अगं हे माझे मिस्टर शिरीषराव.’’
‘’आणि हो, ही धोड्यांब्याच्या बेबीआत्याची छोटी !’’
नवरोबा आता पुरते गारद !!

anilbagul1968@gmail.com


-


डांगर, डुबुकवडे आणि डाळिंब्यांची उसळ




सैराट चित्रपटाने आंतरजातीय विवाहाचा मुद्दा, ऐरणीवर आणला. आंतरजातीय विवाह हा अधिकतर वेळेला वादाचाच मुद्दा असतो. बहुतेक वेळेला असे विवाह, हे पळून जाऊन झालेले असतात. त्यामुळे विरोध हे टोकाचे असतात. पण काही वेळेला असे विवाह ठरवून, दोन्ही बाजूच्या संमतीने, सहमतीने केले जातात. पुरोगामी महाराष्ट्रात हे प्रमाण तुलनेने अधिक असावे.

अशा लग्नानंतर मात्र चालीरीती, खान-पान पद्धती, भाषाशैली भिन्न असल्याने बरेचदा अनेक गमती जमती घडत असतात.

त्यातलीच एक गंमत ...


लग्न नुकतंच झालेलं. राजाराणीचा नवाकोरा संसार.
''संध्याकाळी जेवायला काय करू?''
सकाळी नवरा कंपनीत जातांना, दुपारच्या जेवणाचा डबा त्याच्या हातात देत बायकोने विचारले.
''चवळ्यांची आमटी, इंद्रायणी भात, कैरीचं लोणचं, उडदाचे पापड आणि डांगर!''
नवऱ्याने क्षणभर विचार करून उत्साहात कोकणी बेत सांगितला.

रात्री जेवायला बसतांना, आपल्या आवडीचा बेत म्हणून नवरा खुशीतच होता.
पानं वाढून झाली. त्याची नजर शोधू लागली.
''डांगर कुठंय?'' त्याचा प्रश्न.
''ही काय उजव्या हाताला डांगरची भाजी'', बायको समाजावणीच्या सुरात म्हणाली.
''अगं ही तर लाल भोपळ्याची भाजी आहे.'' नवरोबा.
''इथं नाशिकमधे ह्यालाच तर डांगर म्हणतात.'' बायको.
नवर्‍याचा साहजिकच वैतागून कपाळावर हात.
''अगं डांगर म्हणजे पापड लाटयायच्या आधी ज्या लाट्या बनवतात ना, त्याला कोकणात डांगर म्हणतात''. नवरोबाचा खुलासा.  
बायको मात्र खट्टू होते.


लग्नानंतरची पहिलीच दिवाळी. जावईबापूंना सासरी आग्रहाचं निमंत्रण.
मोठ्या उत्साहात जावईबापू सपत्निक सासरी दाखल. लेक-जावई आले म्हणून सारं आनंदाचं वातावरण ! जेवणाला गोडा धोडाचं बनवलेलं. सासरेबुवांनी 'बुधा हलवाई'कडून श्रिखंड खास आणलेलं. मेहुण्यानं 'सोनाली दरबार'मधून खास 'मघई पान' आणून फ्रिजमधे काळजीने ठेवलेलं.
थोड्यावेळाने ताट वाढली जातात. जावईबापूंना आग्रहाने जेवायला बसविले जाते. 

पानात श्रीखंडाच्या वाटीबरोबरच अजूनही एक वाटी असते.
हे काय असावं जावईबापूंना प्रश्न पडलेला.
''जावईबापूं, श्रीखंडपुरी बरोबर डुबुकवडेही हाणा'. सासरेबुवांचा आग्रह सुरु होतो.
''डुबुकवडे आणखी वाढू का?'' सासूबाईंचा प्रश्न.
जावईबापू गप्प.
''वाढ गं, वाढ, त्यांना संकोच वाटत असेल, तू वाढ''. सासरेबुवा फर्मान सोडतात.
जावईबापूंच्या पानांत चार डुबुकवडे आणि दोन पळ्या आमटी वाढली जाते.
जावईबापू बायकोकडे पाहतात.
ह्यांना डुबुकवडे माहिती नसावेत, ते कसे खायचे ते कळत नसावं. हे पत्नीच्या लक्षात येतं.
ती जवळ जाऊन त्यांना समजावते.
माझं कसं डांगराच्यावेळी झालं होतं? तसं तुमचं डुबुकवड्यांचं झालंय.
फिट्टम फाट ! 

राजा राणीचा संसार, असा फिट्टम फाट करत फुलत असतो.
एके दिवशी, भल्या पहाटे नवरोबाचे मामा घरी येतात.
मामा थेट कोकणातून, दापोलीहून आलेले असतात.
हवा पाण्याच्या गप्पा होतात.
''सुनबाई, दुपारी जेवायला डाळिंब्यांची उसळ आणि तांदळाची भाकरी कर बरं!
बऱ्याच दिवसांपासून खाईन म्हणतो. आमच्या हिला आवडत नाही म्हणून माझ्या पानांत कधी येत नाही. मामांची फर्माईश.
नवरा कंपनीत अर्धा दिवसाची रजा घेणार असतो. पण अर्धा दिवस कामावर जाणं भाग असतं.
‘’येतांना किनई छानशी चार 'गणेश डाळींब' घेऊन या, मामांना मस्त उसळ खायचीय ना’’.बायको.

नवरोबा मान डोलावतो. हिला डाळिंब्यांची उसळ कशाची बनवतात, हे नक्की माहीत नसणार ! आता ही डाळींब सोलून त्याच्या दाण्यांची उसळ बनवणार. मामासमोर तिची फजिती होईल. नवर्‍याच्या डोक्यात फिट्टम फाट’, फिट्ट बसलेलं.
दुपारी, अर्ध्या दिवसाची रजा घेऊन, आठवणीनं चार 'गणेश डाळींब' घेऊन, नवरोबा येतो.
थोड्या वेळाने स्वयंपाक करून बायको पानं वाढते.
‘’वा शिरप्या नशिब काढलंस ! बायको सुगरण मिळाली हो !!
मस्त झालीय गं पोरी डाळिंब्यांची उसळ !!!’’ मामांची खुश होऊन कौतुकाची दाद.
फिट्टम फाट ! बायको नवर्‍याच्या कानात पुटपुटते.
‘’ऑन लाइन पार्सल मलाही मागवता येतं म्हटलं !!
मानेला झटके देत बायको लाडिकपणे विचारते, ‘’तुम्हाला देऊ डाळींब सोलून?’’.
तिच्या त्या गोडव्याने नवरोबा पार विरघळून गेलेला असतो.    

anilbagul1968@gmail.com



वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...