Tuesday 11 December 2018

छिंदम आता तुमच्या छाताडावर बसेल ...


होय, छिंदम आता तुमच्या छाताडावर बसेल... आहे हिम्मत त्याला उतरवण्याची ?
सातशे -आठशे वर्षांपूर्वी तो चंगेज खान आला.. 
मग आला खिलजी ... पाठोपाठ निज़ाम अन मुघल ... 
मग आला बाबर अन मग अकबर 
असेच कोणीबाही येत राहिले.
त्यांनी तुम्हाला ओरबाडलं ... तुमचं घरदारही लुटलं. 
तुमच्या आया -बहिणींवर हात टाकला ... त्यांची अब्रूही लुटली. 
तुम्ही पाहत होतात षंढासारखे ! 
मग तुमच्या संसाराची अक्षरशः राख रांगोळी झाली. अन ...
अन, त्या राखेतून फिनिक्स पक्षासारखा उभा राहिला तो तुमचा आमचा शिवबा !
त्याने उभं केलं स्वराज्य !!
मग तुम्ही जगू लागलात अभिमानानं. 
मुलं बाळ रांगू लागलं आनंदानं. 
घरात लेकी सुना नांदू लागल्या सुरक्षितपणे. 
जणू आनंदवन उभं राहिलं.
ह्या शिवबाची थोरवी सांगायची सोडून तो छिंदम.. त्याला शिवी देत होता. 
आणि तुम्ही परत षंढाच्या भूमिकेत उभे...
मग तो उभा राहिला तुमच्या नाकावर टिच्चून नगरच्या निवडणुकीला ... 
त्यानं दाखवलं मग आमिष पैशाचं ... 
मग तुम्ही धावलात त्यामागे हपापल्यासारखे ... 
अन तो आला निवडून थाटात ...
आता तो बसेल तुमच्या छाताडावर
अन तुम्ही गुमान वाट पहात राहाल ... 
शिवबाने पुन्हा जन्म घेण्याची...

anilbagul1968@gmail.com

लाल फितीचा कारभार - अर्थात रेडटेप !!




शासन व्यवस्था आणि तिचा एकूण कारभार, ह्याचं वर्णन एका वाक्यात कसं करता येईल ? 
तर सरकारी काम म्हणजे फायलींचा वर्षानुवर्षे रेंगाळणारा प्रवास  !
म्हणजेच लाल फितीचा कारभार - अर्थात रेडटेप !!

नको असलेल्या फायली, कधी त्यात अडकल्या जातात. कधी जाणीवपूर्वक अडकविल्या जातात.
तर हव्या असलेल्या फायली नको तितक्या जलदगतीने प्रवास करत पुढे दामटल्या जातात.
कारण काय तर ..
लालची  राजकारणी, धनदांडगे व्यापारी आणि भ्रष्ट नोकरशहा ह्यांच्या अभद्र युतीचा 'वेस्टेड इंटरेस्ट' त्यात असतो.

पण त्यांना हवी असलेली फाईल जर कोणी नोकरशहा जाणीवपूर्वक दाबून ठेवत असेल तर ?
तर ... संघर्ष अटळ असतो.  अन कधी कधी तो 'टोकदार'ही होत जातो.

हाच टोकदार संघर्षाच्या, दमदार लढ्याचा विषय आहे, 'रेडटेप' ह्या  पत्रकार अभिजित कुलकर्णी ह्यांच्या नव्या कोऱ्या कादंबरीचा. प्रस्तुत कादंबरी ही लेखकाची पहिलीवहिली साहित्यनिर्मिती आहे, हे पाहून अचंबित व्ह्यायला लागतं, हि वस्तुस्थिती.

मराठी वाडःमयात, एकूणच राजकारण ह्या विषयावरील, त्यातही शहरी राजकारणावर बेतलेल्या कादंबऱ्या तश्या हातावर मोजण्याइतक्या. त्यातही महत्वाच्या, 'आज दिनांक' ,'सिंहासन' आणि पडघम-'अस्वस्थ दशकाची डायरी ह्याच. त्या मांदियाळीत ही रेडटेप ह्यापुढे असेल असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही.

कादंबरीचा नायक, बांद्र्याचा जिल्हाधिकारी महेश राऊत,  ह्या संघर्ष लढ्यातले मुख्य पात्र. तर दै. प्रखरचा वृत्तसंपादक जया आणि त्याचा सहकारी अभि ह्या लढ्यातले त्याचे साथिदार. ह्यांचा लढा आहे तो प्रामुख्याने महसूल मंत्री कदम, आरोग्यमंत्री घोरपडे, ह्यांच्याशी. मंत्रालयातले चीफ सेक्रेटरींच्या मार्फत महेशला पायबंद करण्याच्या प्रयत्नात ते असतात. जोडीला मुख्यामंत्री, सांस्कृतिक मंत्री रोकडे, कदमांच्या उजवा हात सुरेश नाईक आणि महेशचा बॅचमेट रासकर आणि माहिती जनसंपर्क अधिकारी वर्षा.

प्रत्येक पात्रबरोबरचे संवाद लेखकाने खुमासदारपणे रंगवल्यामुळे ती जिवंत वाटू लागतात. हे सारं इतकं जमून आलंय की वाचकांनी त्या पात्रांना आपल्या आसपास शोधल्यास नवल वाटू नये. त्यातही 'वर्षा ' इतकी फर्मास उभी राहिली आहे त्याला तोड नाही ! तीच अघळ-पघळ अन प्रसंगी लाडिक बोलणं, तिची वेशभूषा, प्रसंग निभावून नेण्याची हातोटी लाजवाब !!  अशी 'वर्षा' जवळपास प्रत्येक ऑफिस मध्ये असू शकते, असं वाटावं इतकी हि 'वर्षा' चपखल उभी राहिली आहे.

बान्द्रातील सरकारी वसाहतींचा पुनर्विकास आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. सदरची फाईल ही जिल्हाधिकारी महेश राऊत ह्यांच्याकडे आहे. ती त्यांनी मंजूर करून लवकर मंत्रालयात पाठवावी ह्यासाठी शासनातील एक लॉबी प्रयत्नशील आहे. चीफ सेक्रेटरी हे महेशवर दबाव आणत आहेत. महसूल मंत्री कदम ह्यंची त्याकरिता चरफड सुरु आहे.  ह्या प्रस्तावातील काळबेरं,  हे महेशने ओळखले आहे. बिल्डरलॉबीचा कावा त्याच्या लक्षात आला आहे. त्याच्या प्रामाणिक मनाला ही गोष्ट पटलेली नाहीये. कोणत्याही परस्थितीत हा डाव त्याला हाणून पाडायचंय. त्यासाठी कोणताही दबाव झुगारून द्यायची त्याची मानसिक तयारी झालीये. आणि मग सुरुवात होते रंगतदार खेळाला...

हा खेळ आहे दोन प्रवृत्ती मधला. पैश्याच्या लालसेपोटी वखवखलेली बिल्डर लॉबी, नीती-अनीतीची कोणतीही चाड नसणारे राजकारणी आणि सहज विकले जाणारे सरकारी बाबू ही अभद्र युती पटाच्या एका टोकाला. तर, प्रामाणिक सरकारी अधिकारी आणि तत्वनिष्ठ पत्रकार पटाच्या दुसऱ्या टोकाला. दोन्हीकडून दुसऱ्याला मात देण्यासाठी चाली खेळल्या जातात. प्याद्यांचा वापर केला जातो. शेवटी बाजी कोण मारतं?

कथा पुढे सरकतांना राजकारण्यामधल्या परस्परांमधला शह-काटशह, नोकरशाही मधला सुप्त संघर्ष ह्याच बरोबरीने वृत्तपत्राजगतातील पत्रकारामधील कुरघोडी ह्या पटलावर नेमकेपणाने येतात.

शेवटच्या क्लायमॅक्समध्ये महेशला जाळ्यात ओढण्यासाठी लावलेल्या 'हनीट्रप'चं वर्णन फारच रंजक झालं आहे. त्यात आपला कथानायक गुंतू नये, अशी भावना वाचताना प्रत्येक वाचकाची होणार ह्यात शंका नाही.

कोणत्याच खेळीला महेश हार पत्करत नसल्याचे पाहून हताश झालेले वरिष्ठ अपेक्षेप्रमाणे महेशची बदली करतात. त्याही परिस्थितीत महेश लढा चालू ठेवतो.  त्या करीता मंत्रालयातल्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांचीही  त्याला साथ मिळते. त्या सर्वांनी मिळून आखलेला  प्लान एका अर्थाने यशस्वी होतो.

मुदलात सशक्त कथाबीज, ओघवती भाषा, घटनांचा वेग, ठसठशीत पात्रे, त्यांच्यातले खुमासदार संवाद, टोकदार संघर्ष, त्याकरीता रचलेले डावपेच ह्या साऱ्यामुळे कादंबरी वाचनीय आणि दर्जेदार झालीये. अभिजित कुलकर्णी ह्यांची हि साहित्यकृती म्हणजे पदार्पणातच ठोकलेले शतक ठरावे. त्यात मेहता पब्लिशिंग सारख्या विख्यात प्रकाशन संस्थेने निर्मिती करतांना कुठेही कसर ठेवली नाहीये. त्यामुळे ही कादंबरी 'बेस्ट सेलर ' ठरल्यास आश्चर्य वाटू नये.

anilbagul1968@gmail.com

Wednesday 5 December 2018

ह्या तेहेत्तीस कोटी देवांचं करायचं तरी काय ?

''धिक गांडीव धिक तृणिर !''
धारातीर्थी पडलेल्या अभिमन्यूचं पार्थिव मांडीवर ठेऊन शोक करणारी पांचाली, अर्जुनाकडे पाहून गरजली होती.
हे अर्जुना, हे धनुर्धारी, तुझ्या निष्णात धनुर्धारी असण्याचा आणि तुझ्या त्या गांडीव धनुष्याचा उपयोग काय ? जो माझ्या पुत्राचे प्राण वाचवू शकला नाही.
चक्रव्युहा मध्ये फसलेल्या अभिमन्यूच्या वीरमरणानंतरचा प्रसंग याद यावा असाच प्रसंग काल-परवा घडला आहे. उत्तरप्रदेशातल्या 'बुलंदशहर' येथे.




कोणा एका शेतकऱ्याच्या शेतात गाईचं मुंडकं सापडल्याची बातमी हा हा म्हणतां साऱ्या शहरात पसरली.
खऱ्या -खोट्याची कोणतीही शहानिशा नं करतां तरुणांची माथी भडकावण्यात आली.
अशा शेकडो माथेफिरुंचा जमाव जमला. जमाव हिंसक झाला, त्याने जाळपोळ सुरु केली.
त्यांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवरच त्या जमावाने हल्ला चढवला.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह ह्यांच्यावर गोळ्या झाडून चक्क हत्या करण्यात आली. आणि...

आणि अचानक, एक हसता-खेळता संसार उजाड झाला.
ही बातमी पाहतांना पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंहच्या पत्नीचा शोक पाहतांना मला त्या पांचालीची सय आली.
हे सगळं महाभारत घडलं त्या गाईमुळे ! पोटात तेहेत्तीस कोटी देव असणाऱ्या !!
शरयू नदीकाठी जन्म घेणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या भूमीत हे असलं गलिच्छ रामायण घडावं ?
रामाला वनवासात धाडण्यास कारणीभूत मंथरेला, अन त्या प्रकांड पंडित रावणाला देखील चीड आणू शकणारी ही घटना !
गाय ही केवळ उपयुक्त पशु आहे, असं पोटतिडकीने सांगणाऱ्या प्रखर हिंदुत्ववादी वीर सावरकरांचं आपण कधी ऐकणार आहोत ?
आणि म्हणूनच मला प्रश्न पडलाय - ह्या तेहेत्तीस कोटी देवांचं करायचं तरी काय ?
तुम्हीच सांगा आता.

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...