Tuesday 4 July 2017

दोन अंडी, पाच पाव !!



काल परवाच झाला मृत्यु, मंजुळा शेट्येचा ! मुंबईतल्या ऑर्थर रोड जेल मध्ये; महिला पोलिसांच्या जबर मारहाणीत !! दोन अंडी आणि पाच पावाचा हिशोब तिला लावता आला नव्हता..

जे हिशेब मंजुळाला आजवर लावता आले नव्हते गजाबाहेरच्या जगात, तेच तर चुकते करायला ती पोहचली होती गजाआड ! तिथे ती नव्याने हिशेब मांडू पाहात होती. पण नियतीला कदाचित तेही मंजूर नसावं.अशा अनेक ‘मंजुळा’ आपल्या आजूबाजूला असतात, जमाखर्चाच्या आकडेमोडीत व्यस्त. कित्येकांचे जमतात, तर बऱ्याचदा चुकलेले असतात.

दाउदची आई, अल्लाला प्यारी होतांना, आयुष्याची वजाबाकी मांडून गेली असेल का? त्या ‘तुकाराम ओम्बले’ची पत्नी भरल्या कपाळावरचं कुंकू पुसतांना सव्वीस अकराचा पाढा म्हटली असेल का? केईमच्या त्या वार्डात, अखेरचा श्वास घेतांना ‘ अरुणा शानबाग’ला गणित सुटलं होतं का आयुष्याचं? ह्या सगळ्याची उत्तरं माहीत असतील आपल्याला, कारण ती आपणच ठरवलेली असतात म्हणून ! पण एखाद्याच्या आयुष्यात नियतीने मारलेल्या फुल्यांचा अर्थ कुठे माहीत असतो आपल्याला? नाहीतर हिशेब चुकल्या मुळे वाढलेले असे अनेक ‘स्त्रीगर्भ’ वजा होतेच ना !

खरं तर असे अनेक हिशेब लागत नसतात आपले आयुष्यात. म्हटलं तर पै-पैशाचे, म्हटलं तर नात्यातल्या अपूर्णतेचे. आयुष्य सरत जातं बेरजा वजाबाक्या करत ! अगदी जवळचा ‘हच्चा’ दिला तरी जुळणी होत नाही मनासारखी. मग नियती हसत राहते, एखाद्या क्रूर खलनायाकासारखी !

पण आपण तर असतो सर्वसामान्य. आपलं जगणं थोडीच असणार अमिताभच्या फिल्म सारखं; ‘दो और दो पांच?

आपल्या नशिबी फक्त आणि फक्त दोन अंडी आणि पाच पाव !!

anilbagul1968@gmail.com



  

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...