Sunday 27 October 2019

धोड्यांब्याच्या बेबी आत्याची छोटी





केवळ सहा नातेवाईक असणारा, पुण्यात भावाकडे राहून इंजिनीअर झालेला, कोकणस्थ नवरोबा. नाशकात नोकरी निमित्ताने आलेला, आंतरजातीय विवाह स्वतः ठरवून, करून मोकळा झालेला. पण बायकोच्या सख्या-चुलत नातेवाइकांनी आणि इथल्या खेडेगावच्या चित्र-विचित्र नावांनी पुरता भंजाळलेला.

आंतरजातीय विवाह केलेल्या, नवरा-बायकोच्या संसारातील आणखी एक गम्मत ....

मे महिन्यातली सायंकाळ. मस्त वारा सुटलेला. औरंगाबाद रोडवरच्या कुठल्याश्या मंगल कार्यालयाच्या हिरवळीवर, नवरोबा सपत्निक उभा. झकास लायटिंग. मराठी भावगीतांचा वाद्यवृंद मेंदीच्या पानावर. गायक – गायिका तळमळीने गातायत. अष्टविनायक चित्रपटातलं 'ते' गाणं.
दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने
पण गाण्यांकडे कुणाचंही लक्ष नाही. सारे गप्पा मारण्यात, विनोदावर हसण्यात, एकमेकांना टाळ्या देण्यात दंग.

खेडलेझुंगेच्या धाकट्या मावशीच्या मुलीचं लग्न. ‘’जवळचं लग्न आहे. आपल्याला जावच लागेल.’’ बायको. खेडलेझुंगे नावाचं गाव असतं, हेच माहीत नसलेल्या नवरोबाला धाकटी मावशी कुठून आठवणार? पण लग्न होऊन आता दोन वर्ष झालेली.

‘’तुम्हाला व्यवहारातलं कवडीचं कळत नाही’’, हे बायकोचं ठाम मत, एव्हाना त्याला पूर्णपणे पटलेलं. त्यामुळे बायको बरोबरची त्याची वरात नेहमीचीच ठरलेली. तशीच आजचीही.

गोरज मुहूर्तावरचं लग्न. पण पत्रिकेतला मुहूर्त नावालाच असल्यासारखा. नवरोबाला ह्याचं फारच नवल. कोकणात, पुण्यात लग्नाचा मुहूर्त म्हणजे, स्टॅं. टा. - स्टॅंडर्ड टाईम. भटजीबुवांची किती धांदल असायची.

‘’मुलीच्या मामांनी नवर्‍या मुलीला ताबडतोब घेऊन. मुहुर्त जवळ आलाय.’’ असा पुकारा असतो तिथे. 

इथं सारं निवांत. नवर्‍या मुलाची वरात यायला अजून किमान अर्धा तास लागेल, अशी माहिती बायकोनी दिलेली. आजूबाजूला तुडुंब गर्दी. नवरोबाच्या मनी आश्चर्य ! ह्यांचे एव्हढे नातेवाईक आहेत ?

कोकणात मामा आणि मामी. त्यांना मुलबाळ नाही. पुण्यात, सदाशिव पेठेत राहणारा मोठा भाऊ विवेक, त्याची बायको अंजली आणि त्यांची मुलगी वीणा. हे सोडले तर त्याला सहावा नातेवाईक नाही, बायको सोडून. इथं तर कुंभमेळाच भरलाय जणू.

इतक्यात एकजण त्यांच्या दिशेने येतो.
''हा विजय. माझ्या चुलत काकीचा - नंदा काकीचा धाकटा''.
‘’ही मंदाक्का. वडाळीभोईच्या ताई आज्जीची थोरली’’.
मग हा अमुक, अन ती तमुक असं करत, बायको डझनभर नातेवाईकांची ओळख करून देत रहाते.

''अय तायडे, ईठं पाय ना, माझी दे की दाजींशी ओळख करून.''
पांढर्‍याफेक धोतर टोपीतला, एक काळाकुट्ट इसम त्या दोघांच्या दिशेने उत्साहात येतो. त्यांच्या पाठोपाठ जाडगेली ठुसकीशी बाई पाय फरफटत येते. आल्यासरशी बायकोला घट्ट मिठी मारते. आसवांचा हुकमी मारा मग दोघांच्या डोळ्यातून सुरु होतो. नवरोबा हैराण. आजवर कधीही न पाहिलेली दोन माणसं त्याच्या समोर. यत्किंचितही ओळख नसणारी. त्यातला पुरुष, बायकोला तायडे तायडे म्हणतोय आणि बाई चक्क बायकोला जवळ घेऊन अश्रू ढाळतेय ! आसवांची गर्दी ओसरल्यावर बायको भानावर येते. पदरानं डोळे पुसल्यासारखे करत त्या दोघांची ओळख करून देते.

‘’हे दौलतअप्पा. माझे सख्खे-चुलत मामा. सुकेणेचे शांतारामतात्या नै का, त्यांचे हे आत्येभाऊ, पिंपळस रामाचे इथं असतात.’’

सुकेणे कुठे आहे? ह्या भूगोलात नवरोबा हरवलेले. त्यामुळे 'कुटुंब इतिहास ऑप्शन'ला टाकल्यागत. नवरोबाची ही गडबड, बायकोच्या लक्षात येते. 

‘’अरे सुकेणे म्हणजे कसबे सुकेणे. हिराबाईची धाकटी नै का दिलीय तिथं होळकरांना?’’
नवरोबाने समजल्यागत मुकाट मान हलविली. हे सख्खे-चुलत काय असतं? ह्यानं तो आधीच गोंधळलेला !

''अय तायडे, अगं हिची बी ओळख करून दे ना.’’ दौलतअप्पा.
‘’अय्या, राहिलच की !’’
‘’अगं हे माझे मिस्टर शिरीषराव.’’
‘’आणि हो, ही धोड्यांब्याच्या बेबीआत्याची छोटी !’’
नवरोबा आता पुरते गारद !!

anilbagul1968@gmail.com


-


डांगर, डुबुकवडे आणि डाळिंब्यांची उसळ




सैराट चित्रपटाने आंतरजातीय विवाहाचा मुद्दा, ऐरणीवर आणला. आंतरजातीय विवाह हा अधिकतर वेळेला वादाचाच मुद्दा असतो. बहुतेक वेळेला असे विवाह, हे पळून जाऊन झालेले असतात. त्यामुळे विरोध हे टोकाचे असतात. पण काही वेळेला असे विवाह ठरवून, दोन्ही बाजूच्या संमतीने, सहमतीने केले जातात. पुरोगामी महाराष्ट्रात हे प्रमाण तुलनेने अधिक असावे.

अशा लग्नानंतर मात्र चालीरीती, खान-पान पद्धती, भाषाशैली भिन्न असल्याने बरेचदा अनेक गमती जमती घडत असतात.

त्यातलीच एक गंमत ...


लग्न नुकतंच झालेलं. राजाराणीचा नवाकोरा संसार.
''संध्याकाळी जेवायला काय करू?''
सकाळी नवरा कंपनीत जातांना, दुपारच्या जेवणाचा डबा त्याच्या हातात देत बायकोने विचारले.
''चवळ्यांची आमटी, इंद्रायणी भात, कैरीचं लोणचं, उडदाचे पापड आणि डांगर!''
नवऱ्याने क्षणभर विचार करून उत्साहात कोकणी बेत सांगितला.

रात्री जेवायला बसतांना, आपल्या आवडीचा बेत म्हणून नवरा खुशीतच होता.
पानं वाढून झाली. त्याची नजर शोधू लागली.
''डांगर कुठंय?'' त्याचा प्रश्न.
''ही काय उजव्या हाताला डांगरची भाजी'', बायको समाजावणीच्या सुरात म्हणाली.
''अगं ही तर लाल भोपळ्याची भाजी आहे.'' नवरोबा.
''इथं नाशिकमधे ह्यालाच तर डांगर म्हणतात.'' बायको.
नवर्‍याचा साहजिकच वैतागून कपाळावर हात.
''अगं डांगर म्हणजे पापड लाटयायच्या आधी ज्या लाट्या बनवतात ना, त्याला कोकणात डांगर म्हणतात''. नवरोबाचा खुलासा.  
बायको मात्र खट्टू होते.


लग्नानंतरची पहिलीच दिवाळी. जावईबापूंना सासरी आग्रहाचं निमंत्रण.
मोठ्या उत्साहात जावईबापू सपत्निक सासरी दाखल. लेक-जावई आले म्हणून सारं आनंदाचं वातावरण ! जेवणाला गोडा धोडाचं बनवलेलं. सासरेबुवांनी 'बुधा हलवाई'कडून श्रिखंड खास आणलेलं. मेहुण्यानं 'सोनाली दरबार'मधून खास 'मघई पान' आणून फ्रिजमधे काळजीने ठेवलेलं.
थोड्यावेळाने ताट वाढली जातात. जावईबापूंना आग्रहाने जेवायला बसविले जाते. 

पानात श्रीखंडाच्या वाटीबरोबरच अजूनही एक वाटी असते.
हे काय असावं जावईबापूंना प्रश्न पडलेला.
''जावईबापूं, श्रीखंडपुरी बरोबर डुबुकवडेही हाणा'. सासरेबुवांचा आग्रह सुरु होतो.
''डुबुकवडे आणखी वाढू का?'' सासूबाईंचा प्रश्न.
जावईबापू गप्प.
''वाढ गं, वाढ, त्यांना संकोच वाटत असेल, तू वाढ''. सासरेबुवा फर्मान सोडतात.
जावईबापूंच्या पानांत चार डुबुकवडे आणि दोन पळ्या आमटी वाढली जाते.
जावईबापू बायकोकडे पाहतात.
ह्यांना डुबुकवडे माहिती नसावेत, ते कसे खायचे ते कळत नसावं. हे पत्नीच्या लक्षात येतं.
ती जवळ जाऊन त्यांना समजावते.
माझं कसं डांगराच्यावेळी झालं होतं? तसं तुमचं डुबुकवड्यांचं झालंय.
फिट्टम फाट ! 

राजा राणीचा संसार, असा फिट्टम फाट करत फुलत असतो.
एके दिवशी, भल्या पहाटे नवरोबाचे मामा घरी येतात.
मामा थेट कोकणातून, दापोलीहून आलेले असतात.
हवा पाण्याच्या गप्पा होतात.
''सुनबाई, दुपारी जेवायला डाळिंब्यांची उसळ आणि तांदळाची भाकरी कर बरं!
बऱ्याच दिवसांपासून खाईन म्हणतो. आमच्या हिला आवडत नाही म्हणून माझ्या पानांत कधी येत नाही. मामांची फर्माईश.
नवरा कंपनीत अर्धा दिवसाची रजा घेणार असतो. पण अर्धा दिवस कामावर जाणं भाग असतं.
‘’येतांना किनई छानशी चार 'गणेश डाळींब' घेऊन या, मामांना मस्त उसळ खायचीय ना’’.बायको.

नवरोबा मान डोलावतो. हिला डाळिंब्यांची उसळ कशाची बनवतात, हे नक्की माहीत नसणार ! आता ही डाळींब सोलून त्याच्या दाण्यांची उसळ बनवणार. मामासमोर तिची फजिती होईल. नवर्‍याच्या डोक्यात फिट्टम फाट’, फिट्ट बसलेलं.
दुपारी, अर्ध्या दिवसाची रजा घेऊन, आठवणीनं चार 'गणेश डाळींब' घेऊन, नवरोबा येतो.
थोड्या वेळाने स्वयंपाक करून बायको पानं वाढते.
‘’वा शिरप्या नशिब काढलंस ! बायको सुगरण मिळाली हो !!
मस्त झालीय गं पोरी डाळिंब्यांची उसळ !!!’’ मामांची खुश होऊन कौतुकाची दाद.
फिट्टम फाट ! बायको नवर्‍याच्या कानात पुटपुटते.
‘’ऑन लाइन पार्सल मलाही मागवता येतं म्हटलं !!
मानेला झटके देत बायको लाडिकपणे विचारते, ‘’तुम्हाला देऊ डाळींब सोलून?’’.
तिच्या त्या गोडव्याने नवरोबा पार विरघळून गेलेला असतो.    

anilbagul1968@gmail.com



Tuesday 22 January 2019

तुम्ही कधी निघणार अशा फेरफटक्याला ?


रविवारची आळसटलेली सकाळ असावी.
गोधडीत पहुडलेला देह असाच उबेला घट्ट धरून असावा.
बऱ्याच उशिराने अखेर मनानी तयारी दाखवावी, उगवलेल्या दिवसाला कवेत घ्यायला .
मग वाफळलेल्या कडक चहाचा मनासारखा आस्वाद घेऊन झालेला असावा.
अन न्याहारीला तर्रीदार झणझणीत मिसळ पेश व्हावी.
जिभेचे असे चोचले पुरवून हात धुतांना...
फुग्याला पिन टोचविच नां !
"आज रविवार आहे, आज मला कुठेतरी फिरवून आणच."
आठवडाभर मी घरातच आहे तू बिझी असतोस म्हणून.
खूप कंटाळलीय रे मी !
मातोश्रींचं म्हणणं वाजवी होतंच.
आता मला, माझा रविवारचा खास मूड, माझ्या 'होंडा सिटी'च्या डिक्कीत टाकावा लागणार तर...
आई कुठं जायचं तूच सांग, चॉईस तुझा.
चांदवडला जाऊ शकतो, रेणुका मातेचं मंदिर पहायला !
अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला 'रंगमहाल' पण आपण तिथे पाहू शकतो.
दुसरं ऑप्शन आहे सिन्नरचा.
इथं पाहता येईल बाराव्या शतकांतील गोंदेश्वर मंदिर, आणि गारगोटी संग्रहालय... दगडगोट्यांच.
रंगमहालाचं कसलं कौतुक मला मेलीला, आईने खास कोकणी सूर लावला होता तर.
इथं मला मेलीला डोळ्यांनी धड दिसत नाही अन रंगमहाल काय डोंबल बघायचं?
आणि तुझं म्हणशील तर खुप रंग उधळून झालेत की रे तुझे आजवर !
आता पन्नाशीत आजून काय उधळायचं, त्यापेक्षा दगडं बघाला जाऊ !!
मातोश्रीचा आदेश कोण डावलणार ?
अशावेळी सोबतीला कोण असावं?
विजय असला तर जास्त चांगलं.
त्याला फोन केला अन तो ही लगेच तयार झाला.
मग काय निघालो की !


























सिन्नरच्या अलीकडे माळेगाव 'MIDC' त आहे हे 'गारगोटी' संग्रहालय !
'MIDC'च्या प्लॉट मधे हे कसं काय?
असला शंकेखोर प्रश्न, पायातले बूट काढतानाचं डोक्यातून काढून टाकला.
प्रथमदर्शनीच 'भारतमाते'चं शिल्प मन मोहवणार !
डायनसोरची हाडं, कित्येक लाख वर्षापूर्वीचे हत्तीचे दात, पंधरा हजार वर्षापूर्वीचे लोह !!
लोणार सरोवराच्या निर्माणावेळाचे !!!
मग नऊ नवरत्ने, त्यांची उपरत्ने... सारी अद्भुत दुनिया !
'गारगोटी'... के. सी. पांडे ह्या अवलियाने जमवलेली ही अनमोल दगडांची दुनिया.
डोळे विस्फारणारी, अन अचंबित करणारी !
चालून चालून वृद्ध आईचं शरीर दमून गेलं होतं.
विजयनी सुचवलं मस्त चहा घेऊ आपण "वैशालीत".
इथे हा असा 'विजय' हुकमी वाटतो.
मग काय गरमा गरम चहानी ऊर्जा दिली हवीहवीशी.
निघालो मग 'गोंदेश्वर' जणू सर करायला.



सुमारे आठशे वर्षांपूर्वीची ही मंदिरं !
दख्खनी शैलीतली.
इतके वर्षे दुर्लीक्षित, पण आता गर्दीने व्यापलेली.
जणू 'प्री वेडिंग शूट'साठीच निर्मिती झाली की काय असं वाटावं.
गोन्देश्वरच्या विस्तीर्ण प्रांगणात सूर्य अस्ताला आलेला.
हलकेच कॅमेऱ्याने टिपला अन आईला विचारलं,
माते छान झालं ना सगळं ? निघायचं आता?
चला निघुयात. तसं तू चांगलं काहीतरी दाखवलं आहेस म्हणायचं !
तिच्या तृप्तीच्या सुरांनी, मीही सुखावलो.
एकुणात 'गब्बर खुस हुवा तो' !!
तुम्ही कधी निघणार अशा फेरफटक्याला ?

anilbagul1968@gmail.com

Friday 4 January 2019

जिंदगी के लिये एक मुलाकात जरुरी है!

दिलबर... दिलबर...
गाडी निघाली होती नाशिकच्या दिशेने.
आणि वाजत होतं हे गाणं गाडीत !
जिंदगी के लिये एक मुलाकात जरुरी है !
तोच तर अनुभव मनाच्या एका कोपऱ्यात गोळा करून निघालो होतो मी!!
तो माझा बालपणीचा काळ नव्याने ओतप्रोत अनुभवून तर झालं आज !!!
माझं घर, माझं गावं, माझे जिवाभावाचे मैतर, माझं आसपास, माझं भोवताल, सारं, सारं, नव्याने अनुभवून आज निघालो परतीला माझ्या कर्मभूमीकडे.
सासरी निघालेल्या माहेरवशीणीसारखं...
एका डोळ्यात समाधानाचे आसू अन एका डोळ्यात विरहाचे आसू .
माझं जुनं घर, 'स्वीट कॉटेज',पाडून तिथे चार मजली इमारत उभी पहिली. विस्थापित झाल्याचं फील जणू आला.
खरंच हा विकास असू शकतो? कित्येक मनांना, किती एक स्वप्नांना हे असं भकास करून??
कोकणातल्या त्या नाणार प्रकल्पातल्या माझ्या जीवलगांच्या उरातली सल जणू आज अनुभवली मी. 

ती नेरळ विद्या मंदिर शाळा, ते कुसुमेश्वर मंदिर, ती शितळादेवी, त्याबाजूचं ते विस्तीर्ण तळं, ती चक्री, ती मोटारटेकडी सारं सारं फिरलो.

पॅनोरमा पॉईंट आणि पेब किल्याचा तो प्रसिद्ध 'व्ही'ही कॅमेऱ्यात कैद केला. बटाटावडा खाण्यासाठी पार डिकसलला जाऊन आलो. 
जुन्या जीवलगांच्या संगतीने नवी शिदोरी बांधून घेतली. नव्या वर्षांला सामोरे जाण्यासाठी !
काय असेल नव्या वर्षात माझ्यासाठी?
सटविने काय लिहिलंय माझ्या भाळी...
हा पण... तिथल्या स्मशानभूमीत जाऊन दोन फोटो आणि एक सेल्फी पण काढला सेल्फीश होऊन. तिथला 'तो' बोर्ड वाचून शहारालोहीं किंचितसा !
अहं...

मगाशीच ऐकवलं ना गाणं ते तुम्हाला...
दिलबर ...दिलबर
जिंदगी के लिये एक मुलाकात जरुरी है!
म्हणून तर जणू भेटून आलो होतो.
जीवन गाणं नव्याने गाण्यासाठी !!










वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...