Tuesday, 1 September 2020

मंतरलेला चैत्रबहार

 

मांडीवरच्या तान्हुलीकडे, वैजू कौतुकाने पहात होती, अगदी एकटक. तान्हुली झोपी गेली होती, दूध पिऊन, अगदीतृप्त होऊन. नांव काय ठेवूयात तान्हुलीचं? येत्या आठ दिवसांनी, तान्हुलीचं बारसं करायचंय, आई म्हणत होत्या. 'खानोली'तल्या आपल्या ह्या घरातच करूयात, विजयचा आग्रह होताती विचारात पडते. नकळत ती बोलून जातेसुरंगी’! नाव सुचताच, तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. आता ती विचारात पूर्ण बुडून जाते, भूतकाळात शिरते.

नुकतंच लग्न झालेले ती दोघं, विजय आणि वैजू हनिमूनला गोव्याला आलेले असतात. गोव्याच्या रम्य वातावरणात त्याच्या प्रेमाला भरती आलेली असते. दिवस-रात्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ती दोघे, परतायचा दिवस येतो तसे भानावर येतात. येतांना आईने गावच्या घरी, 'खानोली'ला बोलावल्याची त्याला आठवण होते.

घरी पोहोचताच, आई उत्साहाने त्या दोघांच स्वागत करते. मीठ-मिरचीने ओवाळते.

''तुमका संसार सुखाचा होयुयात, रवळनाथा, तुका काळजी असा.'' – आई

वैजू, खरंतर पहिल्यांदाच कोकणात आलेली असते. उत्सुकतेने सारं पहात असते. आई तिला घर दाखवते, आंगण दाखवते. परसदारी घेऊन जाते. विहीर दाखवते. नारळाची -सुपारीची वाडी दाखवते. सारं सारं वैजूला फारआवडून गेलेलं असतं. इथंच राहता आलं तर? तिला नकळत वाटून जातं. त्याच विचारात, रात्री ती विजयच्या कुशीत गाढ झोपून जाते.

 दुसऱ्या दिवशी सकाळी, ती जागी होते तीच विजयच्या आवाजाने.

‘’ वैजू, चल लवकर. काहीतरी खास दाखवायचंय तुला’’! त्याच्या आवाजात कमालीचा उत्साह भरलेला. वैजूला आश्चर्य वाटतं. घाईघाईने आवरुन ती, त्याच्या सोबत निघते. तो तिला परसदारी घेऊन येतो. परसदारी कसलासा घमघमाट पसरलेला. कस्तुरी अत्तर शिंपडल्यागत. तो एका झाडाशी तिला घेऊन जातो, अन तिला त्या, ‘कस्तुरीचा शोध लागलेला असतो

समोरच्या झाडावर पिवळसर सोनेरी, फुलांचे झुपकेच्या झुपके लगडलेले! टपोरी मोत्यासारखे!! विलक्षण सुगंध प्यालेले!!! ती हरखुन जाते. मंतरल्यागत पहात रहाते, त्याकडे! इतक्यात विजय, सफाईने झाडावर चढतो. हलक्या हाताने ते झुपके खुडतो, अन वरूनच तिच्याकडे टाकतो. ती शिताफीने ते झुपके ओंजळीत पकडते. नकळत ओंजळ नाकाशी घेते, अन तो सुगंध भरभरुन ओढून घेते. तिचं मन मोहरून जातं.

''ही 'सुरंगी'! चैत्रात ह्याला असा वेड लावणारा बहर येतो. चैत्रबहर''!! सांगतांना विजयचा उत्साह ओसंडून वहात असतो.

हाच उत्साह ओतप्रेत घेऊन ती दोघं गावाहून निघतात. वैजूने आठवणीने, मोठ्या हौसेने, झाडं बरोबर घेतलेलं असतं, सुरंगीचजणू त्यांच्या संसारसुखाचा सुगंध देणारं!! 

नाशिकला परतल्यावर, सातपूरच्या घरी, रो हाऊसच्या छोट्याश्या अंगणात वैजू ते झाडं लावते.

आता खऱ्या अर्थाने त्यांच्या नव्या नवलाईच्या संसाराची सुरवात झालेली असते. विजय सातपूर 'एमआयडीसी' एका कंपनीत कामाला. दिवसभर तो कंपनीत नोकरी करत असतो अन ती घरी. सुखाचे दिवस झरझर सरत असतात. अन अचानक त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागते, काजळमायेसारखी! वैजूच्या अंगावर सर्रकन काटा येतो. ती दचकून भानावर येते.

लग्नानंतर पहिल्यांदाच आपण इथं कोकणातल्या घरी आलो होतो, तेव्हाच तर मनोमन वाटत होतं की आपल्याला, इथंच रहावं असं. मग आत्ता का दचकलो आपण? ती परत भूतकाळात जाते.

विजय, मोठ्या हिरीहिरीने पिवळ्या बावटायुनियनचं काम करत असायचा. त्याच्याच कंपनीत, बोनस वाटपाचा तिढा तयार होतो. कंपनीत त्याची युनियन संप पुकारते. मालक आणि युनियन, दोघांपैकी कुणीही नमतं घ्यायची तयारी दाखवत नाहीत. संप चिघळतो. अखेर टाळेबंदी जाहीर होते. युनियनचे वरिष्ठ पुढारी, जरा जास्तच ताणू पाहतायत असं विजयचं मत असतं. सुरवातीला उत्साहाने पुढे झालेला विजय, युनियन लीडरच्या हेकेखोर स्वभावाने निराश होतो. निराशेतून त्याला दारूचं व्यसन जडतं. रोज रात्री आठ वाजता त्यांच पिणं सुरु होतं.

वैजूला तो जणू विसरून जात असे, त्या वेळी. त्यामुळे त्यांच्या संसारातल्या शृंगाराला जणू ओहोटी लागलेली. हे होत्याच नव्हतं होतांना, वैजूचा जीव तीळतीळ तुटत असतो. ती खूप प्रयन्त करते, विजयला समजवायचा. आपण कोकणात खानोलीला तुमच्या गावी जाऊयात. सुदैवाने शेतीवाडी आहे आपली. हे इथे असं दुसऱ्याकडे चाकरी करण्यापेक्षा, कष्टाची भाकरी खावूयात. ती त्याला समजावत असते.  

ह्याच दरम्यान 'करोना व्हायरस' जगभर हाहाकार माजवतो. चीन देशापासून सुरु झालेली संक्रमणाची लागण हा हा म्हणता, इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन आणि साऱ्या अमेरीकेत पसरते. लाखो जीव त्यात बळी जातात. भारतात देखील त्याचा आता शिरकाव झालेला असतो. सरकार पूर्ण देशात, एकवीस दिवसांचे लॉकडाऊन’, घोषित करते. आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायची, वैजू मनाची तयारी करते.

पण लॉकडाऊनमुळे भाजीपाला आणि किराणा माल सोडून बाकी सारं बंद होतं. रेस्टॉरंट, बार, वाईन शॉप सगळं बंद. विजयचा मद्याचा घरातला स्टॊक संपतो. तो अस्वस्थ होतो. रात्र काढणं त्याला असह्य होऊ लागतं. अशावेळी वैजू, त्याला धीर द्यायचा प्रयत्न करते. त्याला जवळ घेऊन समजावयाचा, त्याचं मन राखायचा प्रयत्न करत राहते. गावी कोकणात जाण्याचं सुचवून पहाते. व्यसनापासून दूर राहण्याची त्याची मनाची तयारी ती करत राहते.

फाल्गुन संपून, एव्हाना चैत्राचा महिना सुरु होतो. निसर्ग जणू कात टाकत असतो. झाडं वेलींना नवी पालवी फुटू लागते, अन वैजूच्या आशेला देखिल. ती वाट पहात असते, चैत्र बहर येण्याची! अन तो दिवस उजाडतो. अंगणातील सुरंगीला कमालीचा बहर येतो. मंतरल्यासारखी ती भल्या पहाटे, सुरंगीच्या कळ्या खुडून आणते. त्याचा छानसा वळेसर (गजरा) केसात माळते. त्याला उठवायला जाते. तो सुरंगीच्या मादक सुवासाने जागा होतो. नकळत तिला मिठीत घेतो. दोघांच्या शृंगाराला देखील बहर येतो, खूप दिवसांच्या दुष्काळानंतर! ह्या चैत्र बहराने त्यांच्या आयुष्यात नव्याने पालवी फुटते.

आठवणीतून जागे होतांना ती नकळत बोलून जाते सुरंगी नाव ठेवायचं. त्याच्याच मंतरलेल्या,चैत्र बहराचाच तर प्रसाद आहे, आपली तान्हुली !


anilbagul1968@gmail.com

 



Thursday, 27 August 2020

‘९६’ - Cinema Review

 

९६



'व्हाट्स ऍप' वर तुमचा 'री युनियन' ग्रुप हा असणारच, दहावीच्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींचा.

त्यातलं एखादा / एखादी असं असणारंच कोणीतरी खास !

मला नक्की माहित्येय तुम्ही जाहीर कबुली देणार नाहीत, पण...

पटत असेल तर तुम्ही पहायलाच हवा असा आहे ९६ !!

 

साऊथचा हिंदीत डब केलेला हा सिनेमा.

माझ्या मुलाने खास आग्रह करून पहायला लावला.

त्यामुळे काल मी 'यू ट्युब' वर पाहीला. 

साऊथचे सिनेमे हे बटबटीत, लाऊड, मेलोड्रॅमॅटिक वगैरे वगैरे असतात, हा  माझा  आजवरचा समज. 

ह्या समजाला मोडीत काढत, '९६' मनाच्या एका हळुवार कप्प्यात आपसूक दाखल झाला.

 

राम हा एक कुशल 'ट्रॅव्हलर फोटोग्राफर'.

कलावंत जसा असायला हवा तसाच हळुवार मनाचा !

पण, आजवर अविवाहित राहिलेला.

 

एके दिवशी फिरता फिरता त्याच्या मूळगावी पोहचतो.

गाव पहाताच आपसूक 'नॉस्टॅल्जीक' होतो.

इतक्यात शाळेची इमारत दिसते.

गेटवर तर तोच वॉचमन असतो, त्याच्या लहानपणीचा.

त्याच्याशी गप्पा मारता मारता तो शाळाभर फिरतो, मित्र मैत्रिणींच्या आठवणींसह !

बावीस वर्ष उलटून गेलेली आहेत, इतक्या वर्षात हे पहिल्यांदा होतंय.

विलक्षण भावुक होतो राम !!

 

वॉचमन त्याला, त्याच्या एका मित्राचा मोबाईल नंबर देतो.

मित्र त्याला, त्यांच्या 'व्हाट्स ऍप' ग्रुप मध्ये ऍड करतो.

मग काय गप्पांचा धो धो पाऊस.

ग्रुपचा 'री युनियन' बेतही मग ठरतो.

 

एक एक करुन सगळे गोळा होतात.

पण थोड्या वेळाने, राम अस्वथ होतो.

हि अस्वस्थता तिच्या वाट पहाण्यातुन आलेली.

तिची ओढ त्याला कातर करते.

 

अखेर तो क्षण येतो.

'ती' येते.  

'जानकी' त्याची जानू.

भेटीत नजरानजर होते.

अबोलपणे खूप काही बोलून जाणारी.

आठवणींचा फ्लॅशबॅक’, एक एक क्षण ताजा करत जातो. 

दोघेही सुखावतात.

 

सहवासाची भूक, त्यांना पूर्ण रात्र झोपू देत नाही.

तिला त्यावेळी पडलेला प्रश्न, ती विचारते.

तू अचानक सांगता शाळा सोडून दुसऱ्या गावी का गेलास?

उत्तर मिळतं.

मग तो विचारता होतो.

तुझ्या कॉलेजला मी आलो होतो भेटायला, त्यावेळी तू का नाकारलंस भेटायला.

ती उत्तर देते. 

 

मग रुखरुख लागते,नियतीने घडवलेल्या ताटातुटीची.

क्षणभर शांतता.

 

थोड्या वेळाने ती भानावर येते.

तो काल’, आज नाही.

तिचा संसार, तिचा संसार साथी, तिची लेक तिला आठवू लागते.

तिचं घर, तिला खुणावू लागतं.

ती निघते, त्या आजमध्ये परत जाण्यासाठी.

 

पण तो मात्र अजूनही 'काल' मध्ये.

कारण तो कायमच कालमध्ये वावरणारा.

 

अव्यक्त प्रेमाची हि अलगूज कथा.

तुमच्या मनाचा ठाव घेते, अगदी हळुवार !

नकळत तुम्ही हि नॉस्टॅल्जीक होता !!

आठवणींचं मोरपीस, अंगावर अलगद फिरून जातं !!


anilbagul1968@gmail.com

 

 

Thursday, 16 April 2020

'कोंडूर्‍या'क गाऱ्हाणं...




शेवटी वाट वाकडी केलीच मी ! होतच माझं हे असं अधूनमधून !! चैनच पडत नाही मुळी,असं केल्याशिवाय. मग काय, तीन दिवसांचा कोकण दौरा ठरवलाच, तो ही भर मुसळधार पावसात !

तळकोकणातील भोगवे, निवती, खावणे, वायंगणी, सावंतवाडी, तुळस, खानोली, पाडगावकरांचं वेंगुर्ले आणि चि. त्रं. खानोलकरांचं कोंडुरं !! असा सारा प्रवास.

ह्या साऱ्या भटकंतीत मनात भिरभिर होती, ती फक्त आणि फक्त कोंडूऱ्याची ! कानांत साद होती ती कोंडूर्‍याच्या सागर लाटांच्या गाजेची !!

का बोलावलं असेल मला कोंडुऱ्यांनं?
खरं तर मला काही नको होतं कोंडुऱ्याकडून, पण त्यालाच काही द्यायचं होतं का?
खानोलकरांच्या कोंडुरा कादंबरीतल्या 'पद्मनाभ'चं आणि माझं काय नातं लागत होतं?
प्रश्नाचां भुंगा घेऊन मी कोकणात वेड्यासारखा फिरत होतो.

सागरेश्वरचा निर्मनुष्य आणि स्वच्छ सागरकिनारा आवडत होता, पण भावत नव्हता. खेमसावंतांचा सावंतवाडीतला देखणा राजवाडा, भुलवत होता पण खिळवत नव्हता.काय होतंय कळत होतं, पण का कोण जाणे कोंडूऱ्याला जायचं धाडस मात्र होत नव्हतं.

वेंगुर्ल्यात वाजत गाजत गणपती पुजले जात होते गणेश चतुर्थीच्या सकाळी. आणि चर्चमध्ये मी, एकटाच येशूच्या मूर्तीसमोर भ्रमित होऊन उभा ! येशूसमोरची माझी प्रार्थना, त्या वरद विनायका पर्यंत पोचली असेल का? चर्चच्या घंटेने मी भानावर येतो.

सायंकाळच्या अवचित वेळी, तुळस गावच्या जैतीर मंदिरात गाभाऱ्यात असतो मी भारल्यागत !
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....व्हय म्हाराजा.....व्हय म्हाराजा, मूळचे तुळस गावचे कदम, मुंबईतून खास तुझ्यापायाशी आलेत, गाऱ्हाणं घेऊन.
... व्हय महाराजा !!
साऱ्यांच्या एकसाथ आवाजाने मी भानावर येतो.

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सारं फिरून झालेलं असतं. आता मात्र वेळ झालेली असते कोंडूऱ्याची ! मनाची बेचैनी वाढवणारी, असह्य हुरहूर जीवघेणी ! दुपारच्या वेळेचं वेतोबाच गाऱ्हाणं कानात अचानक घोंगवतय !!
देहासक्त असूचीचा मनभवरा, भुंग्याने रुंजी घातल्यागत भिरभिरु लागला अचानकसा !!
शरीरावरची त्वचा ओढ दिल्यागत आकसून ताण असह्य करणारी.
हे असं का व्हावं ?

कोंडुरा गावची रस्त्याच्या कडेलगताची पाटी नजरेने हलकेच वाचलेली असते. सहा सात मिनिटांचा जीवघेणा प्रवास, रस्त्यावरच्या खड्डयांनी अधिकच ताणलेला.गाडीचा दरवाजा आपसूक उघडला जातो, अन नकळत मी गाडीच्या बाहेर पडतो.

बेभान मनानं पावलांना इशारा केलेला असतो. झप झप वेग वाढत जातो. जवळपास धावतच अनामिक ओढीने मी समुद्राच्या दिशेने जाऊ लागतो. अवघ्या काही क्षणांत निसरड्या वाटेवरून आवेगात पोहोचतो कड्याच्या टोकाकडे.

समोरचं अलौकिक दृश्य नजरेत साठवण्यासाठी नजर भिरभिर करू पहात होती. कड्याखाली काळ्याशार दगडांची उतरंड. समुद्राच्या फेसळलेल्या लाटा आवेगात त्यांच्या भेटीला येत होत्या, एकामागोमाग ! पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या थेंबानी त्या दगडांना न्हाऊ माखु घालत होत्या जणू !!

थोडं भानावर आल्यावर, नजर आसपास गेली. इथं तर हिरव्यागार रंगांच्या विविध छटांचा गवती गालिचा !! त्यातून हलकेच डोकावणारी पिवळी धम्मक नाजूकली रानफुले, मनबावरी !!!
किनाऱ्यावरच्या कबऱ्या मऊशार वाळूवर, किंचित काळेशार गर्द हिरव्या माडाच्या झाडांनी, आभाळ पेललेलं !

ह्या निसर्गाच्या भावविभोर खेळात, आता भर घालतो तो वरुणराजा ! निळ्याशार आकाशात काळसर ढग अचानक गर्दी करू लागतात. टप्पोरे टप्पोरे पांढरे शुभ्र पाण्याचे थेंब खाली सोडू लागतात. थोड्या वेळाने पावसाचं जमा झालेलं पाणी डोंगरकड्यावरून खाली समुद्राच्या दिशेने येऊ लागतं. जणू हिरव्या शालूवर मोत्यांच्या माळा घातल्यागत !

आता पाळी असते ती सूर्यनारायणाची !!
ऊन सावलीचा त्याचा नेहमीचा हुकमी खेळ आता तो सुरु करतो. सूर्याच्या किरणांनी, खाली पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला मग सोनेरी मुलामा चढला जातो.
एखादं सुंदर निसर्गचित्र पहावं, तसंच काहीसं !

भोवताचं सौंदर्य टिपून गच्च भरलेले डोळे पायावर खिळताच, वीज कोसळावी तसा देह सळसळतो. पाय नकळत मागे खेचला जातो. इतकावेळ कड्याच्या शेवटच्या टोकावर मी उभा असतो ! आणखी एक पुढलं पाऊल, हे खालच्या कातळ खडकावरलं कपाळमोक्ष करणारं ठरलं असतं.

जैतीर मंदिरातलं पुजाऱ्याने घातलेलं गाऱ्हाणं, आता आपसूक ओठावर येत असतं.
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....व्हय म्हाराजा..... पार नाशिक येथून, मनात रुतून बसलेलं, वर्षनुवर्षीच गाऱ्हाणं घेऊन आले असा. त्यांचा गाऱ्हाणं तू कबूल कर रे म्हाराजा ... व्हय म्हाराजा..... !! ...
व्हय म्हाराजा.....मनातल्या असंख्य कल्लोळानी एकसुरी जयघोष केलेला.

देवी सातेरीने आशीर्वादासाठी पाठीवर हात ठेवल्याचं जाणवतंय आणि रवळनाथानेही प्रार्थनेला स्विकार केल्याचा भास होतोय.

पण... पण खानोलकरांच्या कादंबरीतला कोंडुरा गाऱ्हाणं ऐकून आशीर्वाद दिल्यावर, भक्ताच्या नकळत त्याच्याकडची एखादी गोष्ट काढून घेतो. कोंडुऱ्याने माझं असं काय काढुन घेतलं असेल?
विचाराने आलेल्या काट्याने शहारलेलं अंग अजूनही तसंच आहे !

अजूनही शहारलेलंच आहे.

anilbagul1968@gmail.com

सो व्हॉट ? सो व्हॉट ?




वर्तमानाच्या पाठीला भूतकाळ हा चिकटून असतोच असतो. त्याची 'अनुभवाची काठी' करुन रोजचं जगणं सुखकर करायचं असतं, खरंतर. पण काहींच्या बाबतीत होतं भलतंच. त्यांच्या अनुभवांची काठी न होता, त्याचं होतं भलंमोठ्ठं गाठोडं ! सुखदुःख्खाच्या प्रसंगांनी कोंबून भरलेलं !! त्याच्या ओझ्याखाली दबून जात, ओढग्रस्त जीवन जगत असतात बिच्चारे ! त्यात परत, एखादा चटका लावणारा कटू प्रसंग, होऊन बसलेली असते भळभळणारी जखम. शोभा गुर्टुच्या ''उघड्या पुन्हा जहाल्या... जखमा उरातल्या'' गाण्यासारखी. त्याची खपली निघत असते अधून मधून, वर्तमानाला रक्तबंबाळ करणारी !

तर, आजच्या कथेतली आपली नायिका आहे नामांकित वकील. पुरुषी अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित स्त्रियांची बाजू घेऊन त्यांना न्याय मिळू देऊ पाहणारी. दारुड्या नवऱ्यामुळे संसार उघडा पडलेल्या, उच्चभ्रू, यशस्वी उद्योजक पतीच्या बाहेरख्यालीपणामुळे त्रस्त झालेल्या, नपुंसक, नामर्द जोडीदारामुळे वैफल्य ग्रस्त झालेल्या. अशा साऱ्या सख्यांच्या, घटस्फोटाच्या केसेस यशस्वीपणे लढणारी.

पण हाय रे दैवा ! तिच्याही पाठीवर असतं, ते वर वर्णन केलेलं गाठोडं. त्यातली तीच्या बालपणीची, स्वतःवरचा बलात्काराच्या प्रसंगाची जखम भळभळत असते. त्यामुळे तिचं आणि पर्यायाने तिच्या नवऱ्याचं, अर्थात आपल्या कथानायकाचं 'सेक्सलाईफ' ही समस्या बनलेलं. सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट सुरु असते. झालेल्या बलात्काराचा प्रसंग तिनेच तपशीलवार लिहून काढणे, मनावर तीव्र आघात केलेल्या प्रसंगातली धार बोथट होईपर्यंत ! हि असते ट्रीटमेंट !!
ह्या सगळ्यात नवऱ्याची होणारी मनाची घालमेल, शारीरिक उपासमार ह्यावर उपाय म्हणजे नवऱ्याने घटस्फोट घेणे, असा तीच सुचवते पर्याय. त्याला अर्थातच, नायकाचा नकार. ''प्रेम आणि सेक्सलाईफ ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मी मनापासून प्रेम करतो तुझ्यावर.'' नायकाचं तिला ठाम उत्तर.

मग चार-आठ दिवस दोघांनी वेगळं राहण्याचं ठरतं त्यांचं. आपला नायक त्याच्या गावी जातो रहायला. तिला जेव्हा वाटेल, तेव्हाच तिने त्याला फोन करून बोलवायचं असंही ठरतं. चार दिवसांनीच, तिचा त्याला फोन येतो. त्याच्या शिवाय करमत नसल्याचा. असं काय घडतं चार दिवसात?

दरम्यान, तिची एक केस सुरु असते कोर्टात, घटस्फोटाची. हाय प्रोफाइल केस. नवरा मोठ्या जाहिरात कंपनीचा मालक, तर बायको असते, एकेकाळची 'मिस इंडिया' !! पदरी एकूलतीएक मुलगी, मात्र ती असते गतिमंद. तिच्या जन्मानंतर पत्नी वैफल्यग्रस्त बनलेली.

नायिका केस हरते. विरोधात निकाल गेल्याने, ती बायको नायिकेच्या अंगावर धावून जाते. तिला धक्काबुक्की करते. तो नवरा तिला कसंबसं सोडवतो. थकून भागून नायिका घरी येते. बिछान्यावर अंग टाकते. सारं अंग ठसठसत असतं, मानेची वेदना असह्य होत असते. इतक्यात दरवाजा ठोठावला जातो. दारात, आजची केस जिंकलेला तो नवरा ! ती आश्चर्यचकीत !!

बोलता बोलता तो तिची मान ठीक करतो ... हलका मसाज करुन. शरीरावर असा हलका हात फिरवूंन, त्याला कुरवाळून दुखरा भाग बरा होतो. मनातल्या जखमेचं काय ? ती त्याला विचारते.

जाता जाता तो उपाय देऊन जातो. मनाच्या जखमेला असं कुरवाळत बसायचं नसतं. त्या जखमेला सहज झटकून टाकायचं, प्रश्न विचारून...
सो व्हॉट ? सो व्हॉट ?

आपलं मनच, मग बोलतं अशा कटू आठवणींना ... चल हट, चल फूट !!
गोष्ट तर आवडलेली असेलच तुम्हाला. पण ही कथा पडद्यावर तितकीच जिवंत उभी राहते आपल्यासमोर, 'फायरब्रॅन्ड’ ह्या मराठी चित्रपटातून ! कथा, दिग्दर्शन सबकुछ अरुणा राजे असलेला 'फायरब्रॅन्ड', नेटफ्लिक्सवर नक्की पहा.

anilbagul1968@gmail.com

अलकाताई





''काय कुशाग्रबुद्धी?'' - अलकाताई
''बोल मंदबुद्धी! - मी

आमच्या प्रत्येक दिवसाच्या भेटीची सुरवात, ह्याच संवादाने ठरलेली असायची. अलकाताईचं घर आमच्या शेजारचंच. म्हणजे तसं, आम्ही त्यांच्याच घरात रहात असू, भाडेकरु म्हणुन ! पण घरमालकीणीची मुलगी, असल्याचा रुबाब तिने कधी दाखवलाच नाही. तसा तिने कसलाच रुबाब दाखवला नाही म्हणा.
वयाने १२-१५ वर्षाने बहुदा ती मोठी असावी ती. न चुकता दरवर्षी राखी बांधायची ती मला. पण मला ती माझी मैत्रीणच वाटायची. ह्याच कारण तीच वागणं ! माझ्या वयाची होऊन ती खेळायची माझ्याबरोबर! आमच्या स्वीट कॉटेजच्या घराभोवती प्रशस्त आंगण होतं, बाग होती छान फुललेली. अंगणात झोपाळा. हे सारं, आमचं दोघांच विश्व असायचं. मग झोपाळ्यावर खेळणं. अंगणात किल्ला बनवणं व्हायचं. लगोरी कधी, तर कधी लंगडी-कबड्डी व्हायची. थंडीच्या दिवसांत सकाळी सकाळी निवांत गप्पा व्हायच्या ऊन खात खात.
खाण्याच्या बाबतीत अलकाताई खूप चोखंदळ.
'' काय मामी, आज गूळपोळीचा बेत वाटतं.'' असं म्हणत अलकाताई आमच्या घरात, थेट स्वयंपाक घरात घुसायची. मग तव्यावरची गरम गरम पहिली गुळपोळी कोणी खायची? यावरून तिचं नि माझं भांडण व्हायचं. मग आई, तव्यावरून पोळी उतारावतांनाच दोन भाग करून आम्हा दोघांना वाढायची, भांडण नको म्हणून. तर कोणाच्या वाट्याला मोठी पोळी? यावरून आमचं भांडण व्हायचं!

मग पुढे ती कर्जतला जाऊ लागली, बी एड करण्यासाठी. अन अचानक तिच लग्न ठरलं! माझ्यापेक्षा मोठी, ती इतक्या लवकर कशी झाली मला कळलंच नाही!! आमचं स्वीट कॉटेज सोडून ती गेली थेट कोकणात, मुरुडला. मला मग आमचं घर-आंगण, तो झोपाळा, ती बाग परकी वाटू लागली.
लग्नानंतर ही, दरवर्षी, न चुकता तिची राखी यायची. आम्ही नेरळला असेतो!
नंतर कधीतरी माझं नेरळ सुटलं. नाशिकला आलो. घर-संसार, उद्योग-व्यवसायात व्यस्त होत गेलो. आताशा पत्रव्यवहारच एकूण थांबलेले, अन तिचा फोन नंबर नव्हता माझ्याकडे. त्यामुळे संपर्क तुटलेला होता काल-परवापर्यंत.

मागच्याच आठवड्यात ‘कोकणात’ जायचा प्लान ठरला, अन मला अलकाताई आठवली. विचार केला तिला सरप्राईज भेट देउयात.
मुरुडला गेलो. लोकांना विचारत विचारत तिचं घर शोधलं.
''अलकाताई sss'' फाटकातून आत शिरतांना मी हाळी दिली.
‘’कोण? कुशाग्रबुद्धी का?’’ घरातून आवाज आला.

‘सरप्राईज’ व्हायची पाळी माझ्यावरच आली होती.

anilbagul1968@gmail.com

एका लग्नाची पुढची गोष्ट ...






ही गोष्ट आहे मनिषाची, अहं मोरुच्या मनिषाची.
आता तुम्ही म्हणाल, ''हा मोरु कोण?''
अहो हा मोरु आहे आपला नेहमीचाच आवडता, गेल्या २९ वर्षांपासून अधून मधून भेटत राहणारा. फार पूर्वी 'मोरूच्या मावशी' बरोबर भेटलेला, 'टूरटूर करणारा 'ब्रह्मचारी'. 'गेला माधव कुणीकडे' विचारणारा, ‘चार दिवस प्रेमाचे’ गात, 'एका लग्नाची गोष्ट' सांगणारा. आजवर, जवळपास ११००० वेळा आपल्याला भेटला आहे तो ! 'साखर खाल्लेला माणूस', लब्बाड कुठचा !! बघा ना कसा 'गारुड' घालतो समोरच्यावर ! लग्नाच्या पुढच्या गोष्टीविषयी सांगायचं, तर त्याचीच गोष्ट सांगत बसलो. असो.

तर ही आहे, 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. तिसरी घंटा वाजली वाटतं. पडदा तर उघडतो, एका घराचा सेटही दिसतो, पण घरात कुणीच नाही !
आपली कविता मेढेकर (च्या मारी, हिचं वय वाढतच नाही का काय?) याहीवेळी 'मनिषा' बनून चक्क प्रेक्षकांमध्ये दिसते. परसदारी फिरत फिरत, गप्पा मारल्यासारखी संवाद साधतेय, तिच्या लाडक्या प्रेक्षकांशी ! अशा संवादातून कथानक पुढे न्यायची आयडीया भन्नाटच !!

नाटकाचा विषय खरं तर विनोदी नाही. तो आहे स्त्रियांच्या 'मेनॉपोझ' विषयीचा. चाळीशी ओलांडली की, सर्व स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या 'त्या' फेजनंतर, तिच्या भावविश्वात होणारी उलाघाल, स्त्रीत्व हरवून दुर्लक्षित पडल्याची भावना. नवऱ्याचं आपल्याविषयी आकर्षण संपणार, त्याचं आसपास लक्ष जाणार, ह्या विचारांनी, तिची होणारी चिडचिड. अशा काळात आपल्या जोडीदाराची साथ मिळायला हवी अशी तिची अपेक्षा. पण नवरा त्याच्या ऑफिसच्या ‘वर्कप्रेशर’ने कावलेला. संसाराच्या नव्या नवलाईच्या काळात तिच्या विषयी असणारं आकर्षण आता उरलेलं नाही. ह्यावर कळस म्हणजे, त्या घरात राहणारी मनिषाची, घटस्फोटीत मोठी बहीण ! आयुष्यात राम उरला नाही, त्यामुळे ‘दुखीकष्टी’ असल्याचं बेअरिंग छान पकडून राहणारी. हे बेअरिंग मात्र गळून पडतं ‘बियर’ची अक्खी बॉटल रिचवल्यावर ! असो. घटस्फोट ही आपल्या घराण्याची खानदानी परंपरा आहे, आणि ती आपल्याप्रमाणे मनिषानेही जतन करावी अशी तिची धारणा. तुमच्या घरात असं वातावरण असतांना, जे घडलं असतं ते इथे घडत नाही. कुठेही रडारड नाही, आदळआपट नाही.

लग्नाचा विसावा वाढदिवस, नवरा नेमका विसरतो. तो ऑफिस मधून घरी येतो तोचमुळी संतापून. मनीषाने ‘सेलेब्रेशन’ची केलेली तयारी वाया जाते. तिचा मूडऑफ होतो. बंगलोरला शिकण्यासाठी राहणारा मुलगा, तीला हयावरचा उपाय सांगतो. तो उपाय अमलात आणण्यासाठी ती मोरूच्याच ऑफिसात काम करणार्‍या सहकाऱ्यांकडून ‘गेमप्लॅन’ करते. तिच्या ह्या खेळीत मोरु अलगद अडकतो, आणि आपण नाटकात. प्रशांत दामले म्हटलं की गाणं ओघाने आलंच. तो ते हुकमीपणे गाऊन घेतो. संवादाच्या अचूक टायमिंगने तो हशा आणि टाळ्या भरपूर वसूल करून घेतो. अतुल तोडणकर देखिल ह्यात कमी पडत नाही. घरातली बायको म्हणजे चारचाकी गाडी. तिच्याबरोबर एखादी 'ऍक्टिव्हा' अर्थात एखादी मैत्रिण सोबत ठेवायची. मग माणूस बोअर होत नाही. तर 'ऍक्टिव्हा' मुळे सगळा भार एकट्या गाडीवर मग पडत नाही. मग बायकोही’ रीलॅक्स. अशी त्याची थेअरी.

आपल्याला बुवा ही थेअरी पक्की पटली. तुमचं काय?

anilbagul1968@gmail.com

या सुखांनो या ...






फेसबुकाच्या भिंतीवरती खरडायचो काही-बाही. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया यायच्या, लिखाण आवडल्याच्या. मग एक दिवशी 'कोंडूर्‍याक गाऱ्हाणं' लिहिलं. माझ्या आवडत्या, तळकोकणातील प्रवासावरचं लिखाण होतं ते. खूप सारे लाईक्स मिळाले त्याला. माझं गाऱ्हाणं, कोंडूर्‍यापर्यंत पोहचलं की नाही कोणास ठाऊक? पण, 'महाराष्ट्र टाईम्स'पर्यंत मात्र नक्की पोहचलं. संपादक शैलेंद्रजी तनपुरे ह्यांचा अचानक फोन आला, ‘’सदर लिहायचंय तुम्हाला.’’

मी उडालो. खरं तर सुखावलो होतो, खोटं का बोला. आता प्रश्न होता, काय लिहायचं? सदराला नाव काय द्यायचं? एक मात्र नक्की होतं, जे लिहायचं ते हलकं फुलकं आणि खुसखुशीत हवं. त्यातून नाव सुचलं, जीरा बटर !

मग लिहिता झालो. लिहिता लिहिता सुचू लागलं. पण, माझ्या पक्क लक्षात होतं, लोकं आज-काल फारसं वाचत नाहीत म्हणून. मग ठरवलं हे लिहिलेलं टाकायचं, फेसबुकाच्या भिंतीवर. ‘नाशिक टूडे’ ग्रुपवर शेअर देखिल केलं. लाईक्स आणि कमेंट्स यायला लागले.

पण माझ्या आईची तक्रार होती, तिच्या पर्यन्त हे जात नाही अशी. माझ्या आईला वयोमानांनुसार अंधुक दिसू लागले आहे. तिचे वाचन त्यामुळे थांबले आहे. तिच्यासारखीच बहुतेक सार्‍या ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिति आहे. माझं लेखन त्यांच्या पर्यन्त पोहचवं, त्यांना वाचंनांनंद मिळवा म्हणून, निरनिराळ्या स्नेहींकडून वाचन करवून घेवून, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचे माझ्या आईसह, सार्‍यांनी कौतुक केले. माझी पत्नी मनिषा, स्नेही प्रज्ञा भोसले–तोरसेकर, मनिषा कोलते, आर्कि. स्मिता लहारे-कुलकर्णी, प्रा. सिद्धार्थ धारणे, नेहा खरे, मनिषा रतीलाल बागुल ह्या सार्‍यांचे त्याकरीता आभार. संगणक तज्ञ ओंकार गंधे सर आणि त्यांच्या टीमने हे सारे रेकॉर्डिंग केले होते, त्यांचेही आभार.

करियर यशस्वी होण्यासाठी योग्यवेळी ‘ब्रेक’ मिळणं, आवश्यक असतं. उशिरा का होईना, पण तो मिळाला, हेही नसे थोडके. त्याकरिता महाराष्ट्र टाईम्स, नाशिक, त्याचे संपादक शैलेन्द्रजी तनपुरे सर, क्रिएटिव्ह हेड, प्रशांत भरविरकर ह्यांचे खूप खूप आभार. लिखाणाला सतत प्रोत्साहन देणार्‍या, संतोष आणि चैत्रा हुदलीकर, विनायक रानडे ह्यांचेही आभार. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या वाचक स्नेहींचे मनापासून धन्यवाद !!

ह्या आभाराच्या कार्यक्रमात, ‘मूळ कथानका’चा शेवट सांगायचा राहिलाच ...

एकुलत्या एका लेकीचं-स्वरालीचं लग्न, यथासांग पार पडलं आहे. त्यामुळे नवरा–बायकोच्या संसाराची कहाणी सुफळ-संपूर्ण झाली आहे. पण बायकोला आता वेध लागलेत नातीच तोंड पाहायचे ! तर नवरोबाला त्याच्या गावी जायचंय !! सिंधुदुर्गातील, वेंगुर्ल्याजवळच्या ‘भोगव्या’ला, त्याला राहायचंय. तिथल्या लाल मातीचा मृद्गंगध, त्याला आता व्याकूळ करतोय. लाल जांभा खडकाचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटतोय. नारळी–पोफळीच्या बागा, आंबा–फणसाची, काजू करवंदाची झाडं, त्याला खुणावतायत. सकाळच्या न्याहारीला पांढरीफेक ‘घावानं’ त्याला खावीशी वाटतायत. पापलेट, रावस, बांगडा त्याच्या स्वप्नात येतात. ‘कोंबडीवडा’ खाण्याचे डोहाळे त्याला सुचतायत. कोकम सरबताची, सोलकढीची त्याला आताशा, तहान लागलीय. कुठल्याश्या अनामिक ओढीने, किनाऱ्याकडे सतत धाव घेण्याऱ्या लाटांची गाज, त्याला ऐकायची आहे. त्या निळ्या-हिरव्या पाण्यात त्याला डुंबायचंय, अगदी मनसोक्त ! पांढर्‍याशार वाळूंचे किल्ले त्याला बांधायचेत. त्याचं ‘स्वप्नातलं राज्य’ निर्माण करण्यासाठी !!

त्याच्या ह्या ‘स्वप्नाच्या राज्यात’, कुणीच दुःखी-कष्टी नसेल. ‘चार घास खाण्यासाठी कुणीच तरसत नसेल. आनंदाच्या चार क्षणांनी मग आनंदभुवन तयार होईल. मग तुम्ही-आम्ही सारे गाऊ लागू ...
या सुखांनो या !

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...