Thursday 16 April 2020

या सुखांनो या ...






फेसबुकाच्या भिंतीवरती खरडायचो काही-बाही. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया यायच्या, लिखाण आवडल्याच्या. मग एक दिवशी 'कोंडूर्‍याक गाऱ्हाणं' लिहिलं. माझ्या आवडत्या, तळकोकणातील प्रवासावरचं लिखाण होतं ते. खूप सारे लाईक्स मिळाले त्याला. माझं गाऱ्हाणं, कोंडूर्‍यापर्यंत पोहचलं की नाही कोणास ठाऊक? पण, 'महाराष्ट्र टाईम्स'पर्यंत मात्र नक्की पोहचलं. संपादक शैलेंद्रजी तनपुरे ह्यांचा अचानक फोन आला, ‘’सदर लिहायचंय तुम्हाला.’’

मी उडालो. खरं तर सुखावलो होतो, खोटं का बोला. आता प्रश्न होता, काय लिहायचं? सदराला नाव काय द्यायचं? एक मात्र नक्की होतं, जे लिहायचं ते हलकं फुलकं आणि खुसखुशीत हवं. त्यातून नाव सुचलं, जीरा बटर !

मग लिहिता झालो. लिहिता लिहिता सुचू लागलं. पण, माझ्या पक्क लक्षात होतं, लोकं आज-काल फारसं वाचत नाहीत म्हणून. मग ठरवलं हे लिहिलेलं टाकायचं, फेसबुकाच्या भिंतीवर. ‘नाशिक टूडे’ ग्रुपवर शेअर देखिल केलं. लाईक्स आणि कमेंट्स यायला लागले.

पण माझ्या आईची तक्रार होती, तिच्या पर्यन्त हे जात नाही अशी. माझ्या आईला वयोमानांनुसार अंधुक दिसू लागले आहे. तिचे वाचन त्यामुळे थांबले आहे. तिच्यासारखीच बहुतेक सार्‍या ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिति आहे. माझं लेखन त्यांच्या पर्यन्त पोहचवं, त्यांना वाचंनांनंद मिळवा म्हणून, निरनिराळ्या स्नेहींकडून वाचन करवून घेवून, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचे माझ्या आईसह, सार्‍यांनी कौतुक केले. माझी पत्नी मनिषा, स्नेही प्रज्ञा भोसले–तोरसेकर, मनिषा कोलते, आर्कि. स्मिता लहारे-कुलकर्णी, प्रा. सिद्धार्थ धारणे, नेहा खरे, मनिषा रतीलाल बागुल ह्या सार्‍यांचे त्याकरीता आभार. संगणक तज्ञ ओंकार गंधे सर आणि त्यांच्या टीमने हे सारे रेकॉर्डिंग केले होते, त्यांचेही आभार.

करियर यशस्वी होण्यासाठी योग्यवेळी ‘ब्रेक’ मिळणं, आवश्यक असतं. उशिरा का होईना, पण तो मिळाला, हेही नसे थोडके. त्याकरिता महाराष्ट्र टाईम्स, नाशिक, त्याचे संपादक शैलेन्द्रजी तनपुरे सर, क्रिएटिव्ह हेड, प्रशांत भरविरकर ह्यांचे खूप खूप आभार. लिखाणाला सतत प्रोत्साहन देणार्‍या, संतोष आणि चैत्रा हुदलीकर, विनायक रानडे ह्यांचेही आभार. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या वाचक स्नेहींचे मनापासून धन्यवाद !!

ह्या आभाराच्या कार्यक्रमात, ‘मूळ कथानका’चा शेवट सांगायचा राहिलाच ...

एकुलत्या एका लेकीचं-स्वरालीचं लग्न, यथासांग पार पडलं आहे. त्यामुळे नवरा–बायकोच्या संसाराची कहाणी सुफळ-संपूर्ण झाली आहे. पण बायकोला आता वेध लागलेत नातीच तोंड पाहायचे ! तर नवरोबाला त्याच्या गावी जायचंय !! सिंधुदुर्गातील, वेंगुर्ल्याजवळच्या ‘भोगव्या’ला, त्याला राहायचंय. तिथल्या लाल मातीचा मृद्गंगध, त्याला आता व्याकूळ करतोय. लाल जांभा खडकाचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटतोय. नारळी–पोफळीच्या बागा, आंबा–फणसाची, काजू करवंदाची झाडं, त्याला खुणावतायत. सकाळच्या न्याहारीला पांढरीफेक ‘घावानं’ त्याला खावीशी वाटतायत. पापलेट, रावस, बांगडा त्याच्या स्वप्नात येतात. ‘कोंबडीवडा’ खाण्याचे डोहाळे त्याला सुचतायत. कोकम सरबताची, सोलकढीची त्याला आताशा, तहान लागलीय. कुठल्याश्या अनामिक ओढीने, किनाऱ्याकडे सतत धाव घेण्याऱ्या लाटांची गाज, त्याला ऐकायची आहे. त्या निळ्या-हिरव्या पाण्यात त्याला डुंबायचंय, अगदी मनसोक्त ! पांढर्‍याशार वाळूंचे किल्ले त्याला बांधायचेत. त्याचं ‘स्वप्नातलं राज्य’ निर्माण करण्यासाठी !!

त्याच्या ह्या ‘स्वप्नाच्या राज्यात’, कुणीच दुःखी-कष्टी नसेल. ‘चार घास खाण्यासाठी कुणीच तरसत नसेल. आनंदाच्या चार क्षणांनी मग आनंदभुवन तयार होईल. मग तुम्ही-आम्ही सारे गाऊ लागू ...
या सुखांनो या !

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...