''काय कुशाग्रबुद्धी?'' - अलकाताई
''बोल मंदबुद्धी! - मी
आमच्या प्रत्येक दिवसाच्या भेटीची सुरवात, ह्याच संवादाने ठरलेली असायची. अलकाताईचं घर आमच्या शेजारचंच. म्हणजे तसं, आम्ही त्यांच्याच घरात रहात असू, भाडेकरु म्हणुन ! पण घरमालकीणीची मुलगी, असल्याचा रुबाब तिने कधी दाखवलाच नाही. तसा तिने कसलाच रुबाब दाखवला नाही म्हणा.
वयाने १२-१५ वर्षाने बहुदा ती मोठी असावी ती. न चुकता दरवर्षी राखी बांधायची ती मला. पण मला ती माझी मैत्रीणच वाटायची. ह्याच कारण तीच वागणं ! माझ्या वयाची होऊन ती खेळायची माझ्याबरोबर! आमच्या स्वीट कॉटेजच्या घराभोवती प्रशस्त आंगण होतं, बाग होती छान फुललेली. अंगणात झोपाळा. हे सारं, आमचं दोघांच विश्व असायचं. मग झोपाळ्यावर खेळणं. अंगणात किल्ला बनवणं व्हायचं. लगोरी कधी, तर कधी लंगडी-कबड्डी व्हायची. थंडीच्या दिवसांत सकाळी सकाळी निवांत गप्पा व्हायच्या ऊन खात खात.
खाण्याच्या बाबतीत अलकाताई खूप चोखंदळ.
'' काय मामी, आज गूळपोळीचा बेत वाटतं.'' असं म्हणत अलकाताई आमच्या घरात, थेट स्वयंपाक घरात घुसायची. मग तव्यावरची गरम गरम पहिली गुळपोळी कोणी खायची? यावरून तिचं नि माझं भांडण व्हायचं. मग आई, तव्यावरून पोळी उतारावतांनाच दोन भाग करून आम्हा दोघांना वाढायची, भांडण नको म्हणून. तर कोणाच्या वाट्याला मोठी पोळी? यावरून आमचं भांडण व्हायचं!
मग पुढे ती कर्जतला जाऊ लागली, बी एड करण्यासाठी. अन अचानक तिच लग्न ठरलं! माझ्यापेक्षा मोठी, ती इतक्या लवकर कशी झाली मला कळलंच नाही!! आमचं स्वीट कॉटेज सोडून ती गेली थेट कोकणात, मुरुडला. मला मग आमचं घर-आंगण, तो झोपाळा, ती बाग परकी वाटू लागली.
लग्नानंतर ही, दरवर्षी, न चुकता तिची राखी यायची. आम्ही नेरळला असेतो!
नंतर कधीतरी माझं नेरळ सुटलं. नाशिकला आलो. घर-संसार, उद्योग-व्यवसायात व्यस्त होत गेलो. आताशा पत्रव्यवहारच एकूण थांबलेले, अन तिचा फोन नंबर नव्हता माझ्याकडे. त्यामुळे संपर्क तुटलेला होता काल-परवापर्यंत.
मागच्याच आठवड्यात ‘कोकणात’ जायचा प्लान ठरला, अन मला अलकाताई आठवली. विचार केला तिला सरप्राईज भेट देउयात.
मुरुडला गेलो. लोकांना विचारत विचारत तिचं घर शोधलं.
''अलकाताई sss'' फाटकातून आत शिरतांना मी हाळी दिली.
‘’कोण? कुशाग्रबुद्धी का?’’ घरातून आवाज आला.
‘सरप्राईज’ व्हायची पाळी माझ्यावरच आली होती.
anilbagul1968@gmail.com
No comments:
Post a Comment