Monday 24 September 2018

कारवां...



कारवां...
अ ह... आत्ताचा इरफानखानचा नाही. कारवां म्हटलं की तोच तो आरडीने धमाल संगीत दिलेला, नासीर हुसेनने कमाल डीरेक्ट केलेला. सत्तरच्या दशकातला. ह्याकारवांने माझ्या मनात पक्क घर केलं आहे, गेली कितीतरी वर्ष !

पिया तू अब तो आजा, दिलबर हा दिलबर, चढती जवानी मेरी चाल मस्तानी, कितना प्यारा वादा आणि सगळ्यात धमाल म्हणजे ... दैया हाय में ये कहाँ आ फसी. सगळी सुपरहिट गाणी. अरुणा इराणी, जितेंद्र आणि आशा पारेख तिघेही एकापेक्षा एक सरस डान्सर. सत्तर एमएमचा पडदा व्यापून एकशे ऐशी मिनिटे अथक नाचत असतात चित्रपट संपेपर्यंत.

हे 'कारवां'चं गारुड माझ्या लहानपणीच सुरु झालेलं. मला आठवतंय चौथी-पाचवीत असेन मी बहुदा. नेरळलास्वीट कॉटेजमधे आम्ही रहात असू. आमच्या शेजारी म्हणजे अलकाताईच्या घरी मी नेहमी जात असे खेळायला. त्यांच्याकडे एल पी रेकॉर्ड वाजवण्याचा ग्रामोफोन होता सोनेरी रंगाचा ! काळ्या कुळकुळीत रंगाच्या तबकड्या (रेकॉर्ड्स) असायच्या. मधोमध लाल रंगाचा कागद असायचा. त्यावर एच. एम. व्ही. कंपनीचा लोगो आणि नाव. लोगो, तोच तो, कुत्रा बसून गाणं ऐकतोय असं चित्र असलेला. एच. एम. व्ही. कंपनी भारतीय संगीत क्षेत्रात अग्रेसर होती त्याकाळात.


तर ती तबकडी खालच्या वर्तुळाकार फिरत्या बेसवर अलगद बसवायची, मग तबकडीवर असलेल्या रेघेवर काळजीपूर्वक पिन ठेवायची. पिन ठेवतांना जागा जरा जरी चुकली तर काचेवर ओरखडे ओढल्यासारखा आवाज व्हायचा. त्याचा परिणाम म्हणजे गाण्यात खरखर यायची. मला हे काम नाही जमायचं. त्यामुळे मी स्वतः गाणं लावायची रिस्क घ्यायचो नाही. मग गाणं लावायचं असलं की अलाकाताई लागायची. तीही लावून द्यायची प्रेमाने.


लहानपणीचा हा 'कारवां’, सिलसिला पुढे माझ्या कॉलेजात आला माझ्याबरोबर. पूर्वी रस्त्यावर पडद्यावर पिक्चर दाखवले जायचे रात्रीच्या वेळेला. गणपतीच्या उत्सवात कॉलेजच्या होस्टेल कॅम्पसमधेही असे पिक्चर दाखवले जायचे. माझ्या कॉलेजच्या पहिल्याच वर्षी, हा 'कारवांदाखवला गेला. 'कारवांचित्रपट तेव्हां पहिल्यांदा पाहीला. लहानपणी त्याच्या गाण्यांच्या प्रेमात होतो आणि आता चित्रपटाच्या. पिक्चर एन्जॉय करणं म्हणजे काय असतं त्याचा मस्त अनुभव घेतला त्यावेळी. पाहणारे सगळेहोस्टेलाईट स्टुडंट’. गाणं सुरु झालं, की शिट्यांचा पाऊस सुरु व्हायचा. काही ग्रुप हात वर करून फक्त चीत्कारायचे. काहींचा ढिनच्यॅक नाच सुरु व्हायचा. हा उन्माद एव्हढा, की गाणं संपायच्या क्षणी ओरडा व्हायचा वन्स मोअर, वन्स मोअर ! प्रत्येक गाणं दोन दोन वेळेस ऐकलं पोरांनी. रात्री नऊला सुरु झालेला पिक्चर पहाटे एक पर्यंत चालला.


गंमत इथंच संपत नाही. मध्यंतरीव्हिएतनामला गेलो होतो फिरायला, तिथेही होतंच 'कारवां'चं गारुड जोडीला. ‘होचिम्हीनह्या तिथल्या राजधानीतला प्रसंग. रात्री 'व्हेस्पा ऍडव्हेंचर टूर' एन्जॉय करत होतो. सायगांव (होचिम्हीन) शहरात वेस्पा स्कुटर्स वरुन फिरायचं सहा-सातच्या ग्रुपनी. त्यावेळी वेगवेगळ्या हॉटेल्समधे घेऊन जातात तिथे. माझ्याबरोबर एक जर्मन आणि एक ब्रिटिश कपल होतं. असच एका रेस्टोरंन्टमधे जेवण चालू होतं साग्रसंगीत. हो म्हणजे गाणी ऐकत. प्रत्येकानं आपापल्या आवडीचं गाणं ऐकवायचं आणि सांगायचं, ह्या गाण्याला स्वतःच्या आयुष्यात काय स्थान आहे, असं. शेवटी माझी पाळी आली. मग मी माझा मोबाईल काढला आणि हॉटेलच्या सिस्टमला जोडला, अन गाणं सुरु केलं ....

दैया हाय में ये कहाँ आ फसी
हाय रे फसी, कैसे फसी
रों आवे ना, आवे हसी
पापे बचालो तुषि

ह्या गाण्याला माझ्या आयुष्यात काय स्थान आहे तेच मी त्यांना सांगितलं, जे आताच तुम्हाला मी सांगतोय ! त्या लोकांना गाण्याचे बोल काय कळले माहीत नाही, पणपंचामदानी त्यांनाही ठेका धरायला लावलाच !! आणि विशेष म्हणजे ह्या गाण्यानी, तिथेही वन्स मोअर घेतलाच.

सारेगामा कारवासिस्टम असेलच ना तुमच्याकडे? मग ऐका गाणी आणि तुम्हीही अनुभवा गारुडकारवांचं !

anilbagul1968@gmail.com



Wednesday 12 September 2018

'अजि म्या कर्नाटकू पाहीला' (भाग दुसरा)








आज आता हंपी सोडायचं होतं. बदामी खुणवत होतं. हंपीला जे पाहिलं ते अद्भुत होतंच. पण त्याहून अधिक पुरातन अशा लेण्यांचं लावण्य नजरेत साठवण्याची ओढ लागली होती.

सकाळी भरपेट नास्ता केला आणि गाडीत बसलो. गाडीने वेग घेतला. होस्पेट मार्गे मुनिराबाद, हिंतलं, बुडुगुम्पा, मेथगल, बेवूर, येलबुर्गा, मुधोळ, मुशीगेरी, जालिहाल अशा छोट्या गावांमधून गाडी धावू लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दमदार शेती दिसत होती. ऊस, ज्वारी, बाजरी मोठ्या प्रमाणात होती. मधूनच पिवळा पट्टा लागायचा. मोठ्ठाली पिवळी धमक सूर्यफुले आनंदाने डोलत होती.


हंपीला चौकशी केली होती पावसाबद्दल. यंदा पाऊस फारसा पडला नसल्याचं कळलं होतं. मग हि अशी शेती कशी? बारकाईनं पाहू लागलो. मधूनच वॉटर स्प्रिंकल्स दिसू लागले, कुठे बोअरवेलच्या खुणा दिसू लागल्या. आता उलगडा होत होता.

इतक्यात रस्त्यावर बदामी गावाची पाटी लागली. ड्रायव्हरनं मुकामाच्या ठिकाणी गाडी थांबवली. बदामीत मुक्काम दोन दिवस होता. पहिल्या दिवशी 'हॉटेल क्लर्क इन' तर दुसऱ्या दिवशी, 'हेरिटेज रिसॉर्ट' येथे. मुद्दामहून दोन ठिकाणं, दोन दोन अनुभवांसाठी.  हो, उगीच रिस्क नको.

बदामीतलं क्लर्क इनहंपीतल्यापेक्षा लहानसं. खोलीचा ताबा घेतला आणि खिडक्यांतून डोकावू लागलो. गाव कसं असावं ह्याचा अंदाज घेण्यासाठी. जवळपास छोटी छोटी बैठी घरं होती. कौलारू कमीच, पत्र्याच्या शेडची जास्त. घराजवळच्या मोकळ्या जागेवर, डुक्करांचा मुक्त वावर सुरु. तर छपरांवर माकडे उड्या मारत हिंडत होती. म्हटलं वा वराह अवतारात विष्णू आणि मर्कटरूपात हनुमान दोघांचंही दर्शन झालं तर.

दुपारी रणरणत्या उन्हात लेणी दर्शनाला निघालो. दीडेकशे उभ्या पायऱ्या चढून वर आलो. इथेही माकडांचा वावर होता. त्यांच्या मर्कटलीलांनी पर्यटक हैराण तर सुरक्षारक्षक हतबल!



 

बदामी पूर्वी वातापी नावाने ओळखली जायची. इ.स. ५४० ते ७५७ या काळात चालुक्य राजांची राजधानी होती. त्याच काळात तांबड्या -पिवळ्या सॅण्डस्टोन खडकात, हि लेणी मंदिर कोरण्यात आली. 'सर्वधर्म समभावा'चं सूत्र त्याकाळात जपलं गेलं होतं. बौद्ध, हिंदू आणि जैन ह्या तीनही तेव्हा अस्तित्वात असलेल्या धर्मची प्रत्येकी एक लेणीमंदिरं इथं आहेत. इथं एकूण चार लेणी होती. त्यापैकी दुसरं लेण भव्य आणि देखणं.

उंचावरून बदामी गाव दिसत होतं, अगदीच रखरखीत. थोड्या उजवीकडे नजर गेली आणि खरा नजारा दिसू लागला. विस्तीर्ण असा अगस्ती तलाव. एव्हढ्या रखरखाटातही बऱ्यापैकी पाणी. पाण्याला लागून तीन सुंदर देवळं. भूतनाथ मंदिरे त्याचं नाव. समोरचं दृश्य कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यास अगदी योग्य. फटाफट फोटो काढले.





ह्या सगळ्यात स्वतःकडे पहायला वेळ कुठे दिला होता. आता घशाला कोरड पडली होती. प्रखर उन्हाचे चटके जाणवू लागले होते. चालून चालून पायाला पेटके आले होते. गेले तीन दिवस आम्ही चालतो आहोत. खरं तर ऊन मला अजिबात सोसत नाही. त्यामुळे चेहरा लालबुंद झाला होता. मुक्कामी पोहचण्याचा मनिषा आग्रह धरत होती. अर्थात तीही कधी नव्हे ते एव्हढी चालत होती. तिचं बरोबरच होतं. पण तलाव आणि भूतनाथ टेम्पल बघण्याचा मोह टाळता येणं शक्यच नव्हत. शेवटी थेट मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा केली.

मंदिर अतिशय देखणे होते. पण त्याच्या सभामंडपात बसून समोरचा अगस्ती तलाव पाहणं, अहा हा! आता उन्हाची तीव्रता कमी होत जात होती, आग ओकून ओकून सुर्यनारायण विश्रांतीला निघाला होता. तलावातल्या निळ्याशार पाण्यात सूर्यकिरणे हलकेच मिसळली गेली होती. त्या मिलनाने तलावाला सुरेख लाली आली होती. हे दृश्य टिपण्यासाठी आतुर झालेल्या फिरंगी पर्यटकांनी धडाधड फ्लॅश मारले. त्यात आमच्या दोघांच्या कॅमेऱ्यांची भर पडली. इतका वेळ झालेले श्रम कारणी लागले होते. तृप्त मनांनी दोघांनी हॉटेल गाठले आणि बेडवर अंगे झोकून दिली.

आज भल्या पहाटे जाग आलेली. तहानेने आणि भुकेने जीव व्याकूळ झालेला. भरकन पाण्याची बाटली तोंडाला लावली. थोडं बरं वाटलं. खायला काही सापडतंय का म्हणून अंधारात शोधाशोध करू लागलो. माझ्या खुडबुडीने मनिषा जागी झाली. तिलाही भूक लागली होतीच. तिने पर्स मधून बिस्किटे काढली. दोन मिनिटांत दोघांनी पुडा फस्त केला. आता कुठे जीवात जीव आला होता. मग दोघांच्या लक्षात आल, काल रात्री आपण न जेवता झोपलो होतो.

थोड्यावेळाने हॉटेलला जाग आली. घाईघाईने खाली गेलो. चार-चार इडल्या चेपल्या, वर कॉफी ढोसली तेव्हा कुठे पोटातला खड्डा भरून निघाला.

खरं तर माझा हा लेख लिहून पूर्ण झाला असं वाटून मी थांबलो होतो. पण मनिषाने तो बारकाईने वाचला आणि मला दोन गोष्टी राहिल्याचं माझ्या लक्षात आणून दिलं. त्यातली एक खूप भावलेली आणि एक खूप आवडीची. एक भौतिक सुखाची तर दुसरी आत्मिक सुखाची. दोघांची अनुभूती अनुभवणं विलक्षण आनंदाचं.

झालं असं की, बदामीतला आज दुसरा दिवस होता. आज मुक्काम मगाशी उल्लेख केल्याप्रमाणं,'हेरिटेज रिसॉर्ट'मध्ये असणार होता. पण तिथे आधी न जाता आधी ऐहोळे आणि पट्टडकल पाहुयात असं ड्राईव्हर म्हणाला. आम्ही म्हणालो, 'तू माझा सांगाती'. निघालो.

आताचे ऐहोळे म्हणजे चालुक्य पूर्व काळातील आर्यपुरा. इ.स. ४५० ते ५०० (म्हणजे सुमारे पंधराशे वर्षा पूर्वीचा काळ) या काळातील द्रविड, नागरा, कदंबा ह्या स्थापत्यापध्दतीने बांधलेली मंदिरे इथं आहेत. ह्यांचा उल्लेख कवी कालिदासाच्या काव्यातही आढळतो. ह्यातलं दुर्गा मंदिर तर अप्रतिम! आश्चर्य म्हणजे ह्याच्या सभामंडपाच्या रचनेचं आणि दिल्लीतल्या लोकसभेच्या वास्तूशी साम्य आढळते. इथल्या बहुतांशी मंदिराच्या गाभाऱ्यात आता मूर्ती आढळत नाहीत आणि आहेत त्या मूर्ती पुजल्या जात नाहीत.

ASI (आरकॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) हा सगळा पुरातन ठेवा छान जपला आहे. प्रत्येक वास्तूच्या ठिकाणी कंपाउंड आहे. भोवती बगीचा फुलविलेला आहे. हिरवीगार लॉन निगुतीने राखली आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी केअर टेकर नेमला आहे.



असाच एक केअर टेकर भेटला आम्हाला, बहुदा 'हुच्चीमली टेम्पल'पाशी. साधारणतः पंचेचाळीस पार केलेला असावा. साधाच पण स्वछ पांढरा सुती पेहराव. रवीकुमार नाव त्याचं. स्वतःहून बोलला आमच्याशी. ओळख-पाळख झाली. गप्पा सुरु झाल्या. जमतंय असं वाटल्यावर मी त्याला प्रश्न विचारायला सुरवात केली. हंपीहून बदामीच्या वाटेवर दिसलेल्या, भरघोस पिकांच्या शेतीबद्दलचे, शेतकऱ्यांविषयीचे. त्यानेही मनमोकळी उत्तरे दिली. त्याचं बोलणं भाबडेपणाचं वाटलं. या वर्षी फारसा पाऊस जरी नसला तरी इथं बोअरवेल आहेत. त्यांना बऱ्यापैकी पाणी आहे. त्याच्या जीवावर शेती होते.

इथं शेतकरी आत्महत्या होत नाहीत का? तर म्हणाला इथला शेतकरी सधन नसला तरी खाऊन-पिऊन सुखी आहे. इथली लोक हांथरुण पाहून पाय पसरणारी आहेत. फारसा बडेजाव नसतो लग्नात. हुंडा पद्धत नाही. लोकं फारसे राजकारण करत न बसणारे आहेत. आणि घरची ज्वारीची भाकरी आणि भाजी खाणारे असल्यामुळे सूदृढही आहेत. ऐकलं आणि खूप बरं वाटलं. मनात हिशेब केला, इथून महाराष्ट्राची सीमा फार तर तीनशे मैलांवर आहे, असो.

रवीकुमारचा छानसा फोटो मी माझ्या मोबाईलमध्ये बंदिस्त केला आणि त्याचा निरोप घेतला.





आता 'रावनफाडी' पाहायचं होतं. नाव फार विचित्र वाटत होतं. गाव संपता संपता ही 'रावनफाडी' लागली. ही छोट्याश्या चढावर कोरलेली दोन लेणीमंदिरं. इथंही एक केअर टेकर होता. हा मात्र रवीकुमारपेक्षा वयानं कितीतरी लहान. पोरसवदा. नुकताच लागला असावा. लेण्यांमध्ये एका टोकाला पाय पसरून बसला होता. जीन्स टीशर्ट आणि डोक्यावर टोपी. हातात मोबाईल आणि कानात पांढरी वायर. काहीतरी ऐकत असावा, बहुदा मोबाईल मधली गाणी. त्याला तसं पर्यटकांशी सोयरसुतक असल्याचं वाटलं नाही. आम्हीही त्याच्याकडे दुर्लक्ष करून लेणी पहिली. निघालो. 
 
आता चलो पट्टडकल. 'ऐहोले ज्युनिअर स्कुल, बदामी सिनिअर स्कुल, तर पट्टडकल कॉलेज'. कंप्लीट मंदीर. द बेस्ट. असं इथल्या मंदिर स्थापथ्यकलेचं वर्णन रवीकुमारनं केलं होतं. त्यामुळं उत्सुकता वाढली होती.

अर्ध्या तासात आम्ही पट्टडकलला पोहोचलो. साधारणतः तीन एकरचा परिसर. शांत, साफ-स्वच्छ. फुलझाडं-वेली, हिरवळ छान राखलेली. एकाच परिसरात बारा-तेरा देवळं. काडसिद्धेश्वर, गगलनाथ, संगमेश्वर, पापनाथ, मल्लिकार्जुन आणि विरुपाक्ष इ.
ह्यातली दोन मंदिरं तर, चालुक्य नरेश विक्रमादित्य-द्वितीयच्या पत्नीने, महाराणी लोकमहादेवीने आणि तिच्या बहिणीने बांधलेली आहेत. आपापल्या पतींच्या पराक्रमाची आठवण म्हणून. त्यापैकी विरुपाक्ष मंदिर आजही वापरात आहे, रोज पूजा आरती होते नित्यनेमाने. हे असं गेले पंधराशे वर्षे चालू आहे, अव्याहत! हे ऐकून, प्रत्यक्ष पाहून अवाक झालो. अचानक माझी तंद्री लागली, ट्रान्स मध्ये गेल्यागत...




महाशिवरात्रीचा आजचा पवित्र दिवस. महाराज विक्रमादित्य, महाराणी लोकमहादेवी, महामंत्री, दरबारातील झाडून सारे मानकरी मोठ्या लवाजामासह राजधानी बदामीहून इथं हजर आहेत. नगरीतील सारे सारे प्रजाजन आले आहेत. उत्सवाची धामधूम सुरु आहे. सनई-चौघडे, हार-तुरे, पताका-तोरणे सारी सज्जता आहे. वातावरण मंगलमय झालं आहे. आता मुख्य पुजाऱ्याने महाराजांना महाराणीसह पुजेकरीता आवाहन केले. पूजेला यथासांग सुरुवात झाली. महादेवीच्या पिंडीवर गोमातेच्या दुधाचा अभिषेक केला जातोय. यथासांग पूजा होते. टाळ-मृदूंगाच्या गजरात आरत्या म्हटल्या जातात. पूजेच्या समाप्तीला महादेवाचा जयकार केला जातो. महाप्रसादाचं वाटप होतं. माझ्याही हातावर कुणीसं प्रसाद ठेवतं अन मी भानावर येतो...

हातातल्या खोबऱ्याच्या तुकड्याकडे पहात राहतो एकटक. आता मन शांत झालेलं असतं. इतके वर्षाचं मनातलं विचारांचं द्वंद्वव संपलेलं असतं. मनानं स्पष्ट कौल दिलेला असतो. 'जग मिथ्या...ब्रह्म सत्य'. तो आहे, चराचरात आहे. घरच्या फोटोतल्या प्रतिमेत आहे. इथल्या दगडाच्या देवळात देखिल आहे. त्याचं अस्तित्व एकदा मान्य केल्यावर आस्तिक-नास्तिक असला वितंडवाद राहत नसतो. उरलाच तर तो फक्त आणि फक्त माणसाचा अहंकार असतो!

हा विचक्षण अनुभव नेणिवेच्या पलीकडला होता. आत्मिक सुखाचा हा अद्भुत ठेवा मी जपून ठेवणार आहे कायमचा. वर्षानुवर्षे ... अव्याहत!!

अगदी आनंदात पोहचलो, आजच्या मुक्कामाच्या जागी. हेरिटेज रिसॉर्ट! मोजकेच आठ कॉटेजेस. सगळीकडे फुलझाडं. स्वच्छता, टापटीप. मालकच स्वतः पाहत असल्याने आवर सावर चांगली होती. मालक आनंद विजयने छान हसून स्वागत केलं. कॉटेजची चावी हातात सुपूर्द केली. कॉटेज अगदी ऐसपैस होती. बाहेर बसायला पडवीवजा जागा होती. तिथेच जेवण केलं. गुबगुबीत बिछान्यावर पडल्यापडल्या दोघंही निद्राधीन झालो.
  
आज अगदी शांततेत होतं सगळं. आज काही खास करायचं नव्हतं. बदामीहून निघून फक्त हुबळीला मुक्कामी राहायचं होतं. सोबतीला छान नवीकोरी पांढरी स्विफ्ट डिझायर. ड्राईव्हर स्वतः गाडीचा मालक. रस्ताही छान. दोन अडीच तासात हुबळीला पोहोचलो. 'हॉटेल नवीन', इथं आज वास्तव्य असणार होतं. हॉटेल नवीन, पूर्वी हॉटेल गेट वे, हुबळी होतं, अर्थात ताज ग्रुपचं. त्यामुळे दर्जा चांगला असणार ह्यात शंकाच नव्हती. कुतूहल हॉटेल नवीन...लेकसाईड व्हू अशा टॅगलाईनचं होतं.




'उनीकले' तलाव हा दोनशे एकरावर पसरलेला भव्य तलाव आहे. मध्यभागी स्वामी विवेकानंदांचा देखणा पुतळा. विस्तीर्ण अशा उनीकले तलावाशेजारी हे प्रशस्त हॉटेल आहे. हॉटेलला पोहोचलो. सहा मजली टुमदार पांढरीशुभ्र वास्तू. वरच्या बाजूला निळ्या रंगात हॉटेल नवीन अशी नावाची पाटी. आजूबाजूला छानसा बगीचा. पाहताचक्षणी 'दिल गार्डन गार्डन हो गया'.

रिसेप्शन काउंटर वर छानसं स्वागत झालं, वेलकम ड्रिंक दिलं गेलं. रुममधे शिरलो आणि समोरचा नजारा पाहून थक्क झालो. लेक व्हू, लेक व्हू म्हणतात तो हाच. मनिषा आणि मी, रूम - त्यातल्या फॅसिलिटी, काही काही न पाहताच बाल्कनीकडे धावलो.

खाली हिरवळ आणि रंगीत फुलांचा बगीचा आणि समोर निळंशार पाणीच पाणी. तिथून हलण्याचा विचारच होईना. जोडीला वातावरण पावसाळी. हवेत कुंद गारवा. कधी लक्ख ऊन, तर कधी सावलीचा खेळ. मधूनच पावसाच्या भूरुभूरु धारा. 'मौसम सुहाना और दिल अशिकाना', अशी स्थिती.

दुपारी बारा वाजेपासून, सायंकाळी सात वाजेतो, आम्ही दोघे खिळल्यासारखे तिथेच ठाण मांडून होतो. अशा ह्या रम्य वातावरणात सोबतीला, माझी सहचारीणी तरुणी होती. मग वारुणीचा आस्वादबात तो बनता ही है! सारं काही मनसोक्त. सुख-सुख म्हणताच ते हेच. सारं संपवून केव्हा झोपी गेलो कळलंच नाही.

भौतिक सुखाचा हा अलौकीक अनुभव आयुष्यभर याद देणारा. अशा प्रकारे आत्मिक आणि भौतिक अशी दोन्ही सुखे मी पाठोपाठ अनुभवली होती. त्यामुळे आणखी थोडा समृद्ध झालो होतो.

आज जोगचा प्रसिद्ध धबधबा पाहणं होतं. एक अनामिक ओढ लागली होती. एकदाची गाडी आली आणि आम्ही निघालो. तीन तासाचा एकूण प्रवास. त्यापैकी निम्मा जंगल वाटेचा. थोड्या वेळाने रस्त्यावर वाहनांची वर्दळ जाणवली. ठिकाण जवळ आल होतं. पाण्याचा रोरावणारा आवाज कानांनी टिपला होता. आम्ही उतरलो धबधब्याच्या दिशेने चालू लागलो.




हा जोग फॉलहा भारतातला दुसऱ्या नंबरचा धबधबा. शरावती नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असते. वसुंधरेच्या अनामिक ओढीने, प्रचंड आवेगाने, दोनशे फुटावरून सहस्त्रधारांनी धरणीवर कोसळते. तो नजरा डोळयात साठवण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी झुंबड असते.

धबधबा पाहण्यासाठी व्हू पॉईंटतयार केला आहे, त्यापाशी पोहोचलो. समोर जे दिसत होतं, त्याने डोळे विस्फारून गेले. कानावर धडकी भरवणारा पाण्याचा आवाज येत होता. खालच्या कातळावर पडणाऱ्या पाण्याचे शुभ्र तुषार अंगावर उडत होते.




राजा, राणी, रो रो रारा आणि रॉकेट असे पाण्याचे चार स्त्रोत. चारही वेगळ्या प्रकारचे. अजस्त्र लोट बनुन, निष्काम कार्मयोग्यासारखा एकसारखा अविरत कोसळणारा, ‘राजा. त्याला पाहील्यावर अबाबा तोय आदळे, नाही आठवलं तर नवलंच. हिरवा शालू नेसलेल्या नवविवाहितेच्या गळ्यातली मोत्याची माळ म्हणजे राणी. एक एक मोती टप्पोरा. नावाप्रमाणे रोरावत कड्यावरून खाली येणारा, ‘रो रो रारा. आणि सर्वात वेगाने आदळणारा, ‘रॉकेट. चारही एकापेक्षा एक सरस.

कानांवर पाण्याचा आवाज आदळत होता, डोक्यावर श्रावणधारा रिमझिम बरसत होत्या. नजरेसमोर स्फटिकासारख्या शुभ्र, निर्मळ जलधारा कोसळत होत्या. पण मन भरत नव्हतं, पाय निघत नव्हता. पण वेळेकाळेची टोचणी लागली अन नाईलाजाने निघालो.

आजचा मुक्काम गोकर्णाला होता, 'कुडले बीच व्हू रिसॉर्ट' इथं. आजपर्यंतचे सगळे दिवस नजरसुखाचे होते. त्याला दृष्ट लागायला नको, असं मन सारखं सांगत होतं. गोकर्ण बद्दल खूप काही वाचून झालं होतं. पण झालं भलतंच...




खोलीत सामान टाकून सरळ बीचवर पोहोचलो. जमिनीचा भाग जेमतेम. तो ही बराचसा खडकाळ. बीचभोवती हॉटेल्सचा विळखा. प्रत्येक हॉटेलच्या किचनमधून सांडपाण्याचा प्रवाह समुद्राच्या खाऱ्या पाण्याला नवी चव देत होता. पुढे पाऊल टाकण्याची इच्छा होईना. भयंकर शिसारी आली. एक फिरंगी जोडपं, त्या पाण्यात आनंदात खुशाल लोळत होतं. पण आमच्या आनंदाचा झरा केव्हाच लुप्त झाला होता. हताशपणे खोलीवर पोहचलो. एकूणच गोकर्ण म्हणजे ओढूनताणून बनवलेलं पर्यटन स्थळ आहे, असा आमचा निष्कर्ष निघाला. लोकही फारशी चांगली वाटली नाहीत, वागायला बोलायला. दोन दिवसांच्या इथल्या मुक्कामाचा प्लान बदलत सकाळी सकाळी इथून निघालो.

आता एक पूर्ण दिवस आणि रात्र बाकी होती. कालपर्यंत सगळं छान झालं होतं, गोकर्णचा अनुभव वगळता. पण शेवट गोड व्हायला हवा होता. तसंही परतीचा प्रवास गोव्याच्या दाबोलीम एअरपोर्ट वरूनच करायचा होता. मग थेट गोव्याला जायचं की मधेच कारवारला थांबायचं? माझा कल अर्थात गोवा हाच होता. कर्जाच्या खाईत बुडालेल्या किंगफिशर मल्ल्याला थोडी मदत करावी, हाच उदात्त हेतू आपला. पण माझ्या समाजसेवेच्या मनसुब्याला मनिषाने खो दिला आणि आमचा ताफा कारवारला पोहोचला. वाटेतच ऑनलाईन हॉटेल बुकींग केलेलं. तिथं पोहोचेतो रात्र झालेली. त्यामुळे जेवून सरळ झोपलो.




सकाळी सकाळी कारवार शहराला चक्कर मारली. शांत, समंजस, धाकट्या बहिणीसारखं वाटलं गाव. परिसर स्वच्छ होता, लोकं सुसंकृत वाटली. घाई, गडबड, गोंधळ कसलाही मागमूस नव्हता.

जेवण्याकरिता कुठे जायचं? कारवार ट्रीप प्लॅनमध्ये नव्हतं. त्यामुळे आधी काही ठरवलं नव्हतं. गुगलगुरुला विचारलं. हॉटेल अमृतत्याने सुचवलं. फिश मेनूकरीता खूप प्रसिद्ध असल्याची खास माहिती देखिल त्याने पुरवली. यथेच्छ ताव मारला.

सायंकाळी फ्रेश होऊन कारवार बीच पाहायला निघालो. अगदी गावाला लागून पण शेवटच्या टोकाला हा बीच होता. उन्ह उतरत होती. सूर्यास्त व्हायचा क्षण जवळ आला होता. बीचवर बऱ्यापैकी कारवारी ग्रामस्थ दिसत होते. कुठे सिनिअर सिटीझनचा ग्रुप तर कुठे महिला मंडळ. दिवसभराचा शिणवटा, आपल्या गाववाल्यांबरोबर गप्पा मारत दूर करू पाहत होते सारे. चार सहा ठिकाणी कुटुंब बसली होती आपापल्या लहानग्यांशी खेळत. कुणी वाळूचा किल्ला करतंय, कुणी खालच्या मऊशार सोनेरी वाळूत शिंपले गोळा करतंय. आम्ही ते सारं सारं हलकेच टिपत होतो. अखेर सूर्यनारायण त्या लाटांच्या आड खोल खोल बुडाला आणि आम्ही परतलो.

कारवारी भोजनाने आणि पाहुणचाराने शेवट सुखांत झाला होता. सकाळी आनंदाचे झाड कारवाराच्या अंगणात लावून प्रसन्न निरोप घेतला. गोवा गाठण्याची आता घाई झाली होती.




तासभराने गाडीने गोव्याची वाट धरली होती. कोकणची लाल माती आणि जांभ्या खडकांच दर्शन सुखावह होतं. एकाएकी हवेत बदल झालेला जाणवू लागला. वातावरण कुंद झालं, काळोखी पसरली आणि इतक्यात एक मोर गाडीसमोरून उडून पलीकडे गेला. त्याचा निळसर सोनेरी पिसारा, डोईवरचा तुरा, मन मोहवून गेला. लगेचच श्रावणधारा सुरु झाल्या. अडीच तासाचा हा प्रवास. अगदी वेळेत आम्ही आम्ही एअर पोर्ट गाठले होते. अधीर मनांनी आम्ही विमानात बसलो. विमानाने टेक ऑफ घेतला.

मुंबईला पोहचेपर्यंत दुपार झाली होती. पण जेवणाचा प्रश्न नव्हता. विमानात मॅगी नूडल्सचा फन्ना उडवला होता. त्यामुळे पोटे टम्म होती तडक टॅक्सी घेतली आणि थेट नाशिकला निघालो.

गाडीने कसारा घाट ओलांडला. आता अवघा दीड तास उरला होता. मी अधाशासारखा गाडीबाहेर पहात होतो. कसारा, इगतपुरी, घोटी, गोंदे, वाडीव्हरे, यापूर्वी कितीतरी वेळा हि गावं पहिली असतील. पण आज ती परत परत पहावीशी वाटत होतं. गेले नऊ दिवस आम्ही घरापासून दूर, कर्नाटकात मनमुराद भटकंती करत होतो. घरची, ऑफिसची कसलीही चिंता न करता. गोकर्णचा अपवाद वगळता सगळीकडे छान आनंद घेता आला. कारवारचा मुक्काम तर अनपेक्षित पण सुखाचा होता. आता घरची, गावची ओढ वाटू लागली होती.

गाडीत बाजुला झोपलेल्या मनीषाने झोपेत खांद्यावर डोके ठेवले. माझ्या हातांनी नकळत तिच्या कपाळावर हलकेच स्पर्श केला. अलगद तिच्या केसांतून बोटे फिरवू लागलो. तिच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव पाहून माझा नऊ दिवसांचा शिणवटा दूर झाला. बाहेर जलधारांनी भुईला तृप्त केले होते आणि आमची दोघांची सुखाने भरून पावलेली मने, प्रवास सफल झाल्याचं सांगत होती.

anilbagul1968@gmail.com



'अजि म्या कर्नाटकू पाहीला' (भाग पहिला)


बंगळूरू, इथं एका कार्यशाळेच्या निमित्ताने जायचं होतं. काम का तो बहाना था. घुमना-फिरना तो होना ही था. तब्बल नऊ दिवसांचा हा दौरा राहणार होता. मागचा, केरळ सफारीचा अनुभव चांगला होता. त्याप्रमाणेच ह्याही वेळी, विचारपूर्वक नियोजन केलं होतं. दक्षिण-पूर्व कर्नाटक मधून उत्तरेकडे जायचं, तिथून पश्चिमेला कोकण किनारपट्टीला आणि शेवट गोव्याच्या भोज्जाला शिऊन परतायचं. हां, गोवा मात्र निमित्ताला. एअर पोर्ट जवळ असल्याने. बंगळूरू-चित्रदुर्ग-हंपी-बदामी-ऐहोळे-पट्टाडकल-हुबळी-जोग-गोकर्ण-दाबोलीम (गोवा) असा 'अजि म्या कर्नाटकू पाहीला' करणार होतो.

आज सकाळीच मुंबई गाठायची होती. मुंबईहून बंगळूरूला विमानानं जाणार होतो. टॅक्सी साडेसहाला हजर होती. आदल्यादिवशी वेळेवर येण्याचं बजावून ठेवल्याचा परिणाम होता. महिन्यापूर्वी मुलाला-स्वराजला गोव्याला जाण्यासाठी ह्याच क्वीन ट्रॅव्हेल्सची टॅक्सी बुक केली होती. पठ्ठ्या पाऊण तास उशिरा आला होता. त्यात वाटेत 'ट्रॅफिक जॅम'. स्वराजची खूप धावपळ झाली होती. जेमतेम फ्लाईट मिळाली होती. त्यामुळे क्वीन्सवाल्याला दमातच घेतले होते. ह्यावेळी उशीर केलास, तर तुझ्या नावावर कायमची फुली.

आजचा ड्रायव्हरही चांगला वाटला. पण अबोल होता. तेही एक बरं म्हणा. गप्पांच्या नादात ... हो ते 'आंबेनळी घाटा'सारखं काही नको घडायला. छे विचारच नको असं म्हणत डोळे मिटून घेतले झोप येण्यासाठी. शेजारी मनिषाने एव्हाना डुलक्या मारायला सुरवात देखिल केली होती. बाईसाहेबांचं एक बरं आहे. कुठेही, कधीही झोप लागते. पण मला काही प्रवासात झोप लागतं नाही.त्या अबोल ड्रायव्हरने गाडी अगदी वेळेत पोहचवली. क्वीन्सला पुढची संधी मिळणार होती तर...



बंगळूरू विमानतळावरून पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी, आदर्श हॅमिल्टनला जाण्याकरिता टॅक्सी केली. टॅक्सी ड्राईव्हरने गाडीत गाणं लावलं होतं. त्यावर ठेका धरत स्वारी गाडी चालवत होती. आधी वाटलं कुठलंसं कन्नड गाणं असेल. मग कान देऊन ऐकल्यावर शब्द जरा ओळखीचे वाटले. चक्क मराठी गाणं ऐकत होता तो! पण चाल अगदी दक्षिणी पद्धतीची!! मग काय त्याच्याशी बोलायला सुरवात केली. ही अशी गाणी तिथे खास बनवली जातात, तिथल्या मराठी लोकांकरीता. खूप लोकप्रिय देखिल होतात त्यातली काही काही. असं तो सांगत होता.  हे सगळं त्या ''सैराट'' नंतरचं. नागराज मंजुळे बाबा’, हे काय करून ठेवलंत हो...उतरतांना ड्रायव्हरकडून-सतेज पाटील त्याचं नाव, मोबाईल मध्ये ती गाणी घेतली.

दुसऱ्या दिवशी आर्किटेक्चर व इंटेरिअर डिझायनिंग क्षेत्रातील नवीन ट्रेंडह्या विषयावर ताज हॉटेल, बंगलोर येथे कार्यशाळा होती. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यातील, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आर्किटेक्ट, इंटेरिअर डिझायनिंग फर्म ह्यांचे प्रतिनिधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. नाशिक मधिल आमच्या संस्थेला, 'धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी'ला (डीआयडीटी), ‘मोस्ट प्रॉमिसिंग इंटेरिअर डिझाईन इन्स्टिट्यूटमहाराष्ट्र, ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले. डीआयडीटीच्या वतीने, मी स्वतः आणि मनिषा दोघांनी सदरचा पुरस्कार स्विकारला. असा पुरस्कार वगैरे मिळाल्याने स्वतः बद्दल, संस्थेबद्दल अभिमान वाटला. पण कार्यक्रम थोडा उशिरा सुरु झाला होता आणि मग लांबलाही. नंतर ताज हॉटेलमध्येच जेवण होतं. एव्हढ्या फाइव्ह स्टार हॉटेलचं जेवण, पण अजिबात आवडलं नाही बुवा. फारच फिक्कट वाटलं...




दुपारनंतर आमचा कर्नाटक दौरा खरा सुरु होणार होता. मग घाईघाईने टॅक्सी गाठली आणि चित्रदुर्गकडे कूच केलं. चित्रदुर्ग, खरतर जिल्ह्याचे ठिकाण. पण गाव लहानच त्या मानाने. इथं आमचा मुक्काम होता हॉटेल मौर्या यात्रीनिवासमधे. आपल्या एमटीडीसीसारखं, केसटीडीसीचं हे हॉटेल. साधंच पण टापटीप. आमच्या रूमच्या समोरच उभा किल्ला-चित्रदुर्ग फोर्ट. हॉटेलचे व्यवस्थापक कदममराठी. मोठा उमदा माणूस, अजिबात टिपिकल सरकारी बाबू वाटला नाही. पट्कन मैत्री झाली. त्यांच्याबरोबर प्रवासाच्या नियोजनाची रात्री चर्चा केली. त्यांनी काही सूचनाही केल्या.
दुसऱ्या दिवशी टॅक्सीची व्यवस्था करून देण्याचंही त्यांनी कबूल केलं. रात्री गप्पा संपता संपता म्हणाले, ''सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक सारखे किल्ला फिरून या, आलात की नास्ता तयार ठेवायला सांगतो. हां पण गाईड आवर्जून घ्या बरोबर’’.

दुसऱ्या दिवशी किल्ला बघायला गाईड- शिवकुमारला बरोबर घेतला. शिवकुमारचं इंग्रजी अगदीच कामचलाऊ. घोकून घोकून पाठ केल्यासारखं. नॉलेजही यथातथा!! किल्ला दाखवण्यापेक्षा स्वतःची फॅमिली स्टोरी सांगत होता बळे बळेच. त्याचा हा रागरंग पाहून अर्ध्यातच त्याला जय कर्नाटककेला. मग पाट्या वाचत वाचत मुशाफिरी सुरु ठेवली.




तर हा किल्ला चित्रदुर्गच काइथं मोठाले दगडशिळा अशा पद्धतीने आहेत की त्यातून विविध प्राण्यांची चित्रे आहेत असे वाटते. उदा. हत्ती, बेडूक वगैरे. हा चित्रदुर्ग, अठराव्या शतकात राजा मदाकेरी नायकाने बांधला. पुढे हैदरअलीने तिसऱ्या प्रयत्नांत तो जिंकला. हैदरअलीने, मदाकेरीला बंदी केलं आणि त्याची हत्या देखिल केली.

थोडं पुढे जाताच चक्क हिडींबा राक्षसणीचं मंदिर दिसलं. हे आमच्यासाठी नवलच होतं. पुढे कळलं, महाभारतातल्या हिडींबाचं, भारतात आणखीही एक मंदीर आहे. हिमाचलमधे कुठेतरी. असंही कळलं, इथंच हिडींबाभीमाच्या मुलाचा, घटोत्कचचा जन्म झाला होता.
फिरता फिरता भरपूर फोटो काढत होतो. दगडाधोंड्यांचे एव्हढे फोटो पहिल्यांदाच काढले. सुंदर देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, असं  महाराष्ट्राऐवजी ह्यालाच म्हणावं, इतके प्रचंड दगड. महाराष्ट्रात काळा कातळ असतो तर इथं पिवळा-सोनेरी.
किल्ला फिरून धापा टाकत खाली आलो, भरपेट नास्ता केला. आत्ताही कदम स्वतः जातीने हजर होते. कदमांनी पुढील पूर्ण दौऱ्यासाठी टॅक्सी ड्रायव्हर बरोबर डीलपक्क केलं. दहा मिनिटांत बरोबरचे कपडे घेऊन येतो अस ड्रायव्हर म्हणाला. परत आला तोच, नाही म्हणून पडला, सगळ्या दौऱ्यासाठी. कदम म्हणाले हंपीपर्यंत न्या, तिथे मिळेल दुसरी टॅक्सी. निघालो.

वाटेत एका ठिकाणी ड्राईव्हरने गाडी थांबवली. रस्त्याच्या डाव्या बाजूला पाणीच पाणी. उत्साहाने उतरलो पहायला. रस्त्याच्या कडेला ओळीने गाड्या लागल्या होत्या. जवळंच हारीने हातगाड्या लागल्या होत्या. कुठे गरम गरम चहा, तर कुठे मक्याची कणसं विकली जात होती. एखादा फेरीवाला साबणाच्या पाण्याचे फुगे उडवत होता. आमच्यासारखेच अनेक पर्यटक तुडुंब पाण्याचा साठा नजरेत साठवत होते. हे होतं  तुंगभद्रेचं बॅकवॉटर. यंदा वरुणराजाने या धरण परीसरात भागात कृपा केली होती. वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे एरवी शांत असणाऱ्या पाण्यात लाटा येत होत्या, समुद्रासारख्या. पाऊण तास रेंगाळलो आणि पुढे निघालो.




वाटेत रस्त्याच्या दोनही बाजूला असणाऱ्या टेकड्यांवर सुझलॉन कंपनीच्या  विंडमिल उभारलेल्या दिसल्या. आपले अजस्त्र बाहू वाऱ्याच्या झोतात, गरागरा फिरवत उगाचंच घाबरावतायत असं वाटत होतं.

संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोहचलो हंपीला. इथं गाडीतून बाहेर दिसणारं दृश्य फार भारी होतं. अगदी गोष्टीतल्या वर्णनासारखं! चित्रदुर्गला काल झलक पहिली होती, पण तो आता ट्रेलर वाटू लागला होता. आणि हा पिक्चर!! पिक्चर मात्र फारच हटके दिसत होता. सायंकाळी मुक्काम करून सकाळीच बघायचं ठरलं होतं. त्यामुळे मोह आवरला. 'हॉटेल क्लर्क'ला मुक्कामी गेलो. रिसेप्शन काउंटरवर चौकशी केली टूर प्लॅन साठी, तर त्याने पॅम्प्लेट दिले, अगदी अदबीने. चला काम झालं होत. आता चांगला गाईड मिळायला हवा होता. चित्रदुर्गचा कालचा अनुभव फारसा बरा नव्हता. पॅम्प्लेटवरच्या नंबरवर फोन केला.  माणूस पंधरा मिनिटांत हॉटेलमध्ये हजर. पण तो स्वतः काही येणार नव्हता गाईड म्हणून. त्याचा माणूस पाठवणार होता. ह्याच काम फक्त बुकिंग घ्यायचं. असे सहा गाईड त्याच्याकडे आहेत म्हणाला.

रात्री जेवायला शेजारचंच पिंक म्यॅन्गोगाठलं. हॉटेलकायच्या काय वेगळंच. भारतीय बैठक, मंद पिवळे दिवे. हो पण पिंक काहीच नाही आणि म्यॅन्गो देखिल नाहीत. सात आठ फॉरिनर्स ऐसपैस बसलेले. कन्नड गाणं लाउड लावलेलं. इथे मेनूकार्ड मधे तिबेटियन, मंगोलियन, इटालियन, मेक्सिकन आणि थायलंड अश्या वेगवेगल्या देशांच्या डिशेस.  त्यातला तिबेटियन रोल कबाब आणि मंगोलियन फ्राईड राईस मागवला. राईस चविष्ट होता पण कबाब फारच सुखे सुखे.

ऑर्डर देतांना बहुदा त्याला कळलं असावं आम्ही मराठी आहोत. पुढच्या पाच मिनिटांनी सैराटचं झिंगाटसुरु झालेलं. मालक एकदम प्रोफेशनल. पण कस्टमरफ्रेंडली. गिऱ्हाइकाला जे आवडेल ते द्याव, असा खाक्या असलेला. मजा आला.
आज सकाळी लवकरच जाग आलेली. संध्याकाळी गाडीतून पाहिलेली दगडांची ती अद्भुत दुनिया खुणावत होती. नऊच्या ठोक्याला गाईड हजर. चंद्रशेखर गुट्टी नाव त्याचं. प्रथम दर्शनी चांगला वाटला. दिवसभरात काय काय बघायचं त्याच्याशी चर्चा केली. म्हटलं जास्त चालण्याचे, उंच चढण्याचे पॉईंट्स पहिले करून घेऊ. रणरणत्या उन्हात नको. असंच करूया म्हणाला. हेमकुटा हिलपासून सुरवात करूया.




हेमकुटा हिल, ही अगदी छोटीशी टेकडी वजा जागा. हेमकुटा म्हणजे सोन्याने मढलेली वास्तू. टेकडीवरच्या पिवळ्या-जर्द शिळा जणू निसर्गाचं सोनंच. पण टेकडी चढल्यावर गाईड बोलेच ना. त्याने तिथे असलेल्या बाकांवर बसण्याची खुण केली. मग दीर्घ श्वास घेतला आणि सफाईदार इंग्रजीत सांगायला सुरवात केली. ''हजारो वर्षांपूर्वी, (काही लोक असं मानतात की समुद्रमंथनाच्या वेळी) ह्या भूभागात ज्वालामुखीचा प्रचंड विस्फोट झाला. त्याने इथल्या भूभागाची भयंकर उलथापालथ झाली. भूगर्भाच्या खालच्या स्तरातल्या दगडांच्या शिळा वर आल्या. अनेक ठिकाणी त्या एकमेकांवर ठेवल्या गेल्या. त्या ज्या स्थितीत ठेवल्या गेल्या, त्या तश्याच आजही हजारो वर्षा नंतरही टिकून आहेत. ह्याला आज भूगर्भशास्त्रानुसार 'वेट बॅलन्सिंग टेक्निक' असं मानतात. ह्याच टेक्निकचा वापर पंधराशे वर्षांपूर्वी 'चालुक्य'च्या काळात मंदिरे बांधताना स्थापत्य कलेत करण्यात आला.''

गाईडने परत एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, चला...
एका भली मोठी गणपतीची मूर्ती असलेच्या मंदिरापाशी तो थांबला. ''चांगल्या कामाची सुरवात ''गणपती'' पूजनाने करतात, म्हणून ह्याच दर्शन पाहिलं. ह्याच नाव ''मस्टर्ड गणेशा''. नंतर आपण ''पीनट गणेशा'' मंदीर देखिल पाहणार आहोत. गणपतींची ही नावं त्या मूर्तीच्या पोटाच्या आकारावरून पडली आहेत.

आता आम्ही टेकडीच्या उंचावरती पोहोचलो होतो. वरून सभोवार दिसणारं, सारं काही अदभूत आणि अवर्णनीय! सोन्यासारखे चमचमणारे विरुपाख्य मंदिरांचे कळस, त्यापलीकडे तुंगभद्रा नदी, नदीपल्याड अंजनेरी डोंगर, डोंगरावर हनुमान मंदिर!! सभोवताली मोठमोठाल्या शिळा एकमेकांवर अलगद ठेवल्यासारख्या. कधीही पडतीलशा वाटणाऱ्या, तरीदेखील अविचलवर्षानुवर्षे, शतकानुशतके!!!

इथल्या अंजनेरी डोंगरावर हनुमान मंदिर आहे. हनुमानाचा जन्म इथे झाल्याचा गाईड सांगत होता. त्याला म्हणालो आम्ही नाशिकचे आहोत. आमच्या इथं त्रंबकेश्वर जवळ अंजनेरी डोंगर आहे. हनुमानाचा जन्म तिथे झालाय असं वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या आम्ही ऐकत आलोय. हे ऐकून त्याने फक्त खांदे उडवले - 'गॉड क्नोज ', अशा अर्थाने.
थोडं पुढे जाताच सुमधुर आवाजातलं कन्नड भाषेतलं कसलंस स्तोत्र ऐकू येत होतं. फारसं समजत नव्हतं काही, पण प्रसन्न ऐकावंसं वाटत होतं. गाईड म्हणाला ललित स्तोत्रआहे. आवडलं असेल तर डाउनलोड करून घ्या, यूट्यूब वर आहे.

टेकडी, आता पलीकडच्या बाजूने उतरण्यास सुरवात केली. त्या सोनेरी कळस असलेल्या विरुपाक्ष मंदिराकडे आता आम्ही जाणार होतो. आजूबाजूला माकडांचा वावर वाढला होता. तीस एक तरी असावीत परिसरात. त्याला त्या माकडांबद्दल विचारलं. तो सांगू लागला कि इथं वर्षानुवर्षे माकडं आहेत. इथं केळी आणि ऊस हि दोन पिकं प्रामुख्यानं घेतली जातात. आणि त्यावर हि माकडं पोटं भरतात. शिवाय मंदिरातला प्रसाद असतोच. येणारे पर्यटक देत असतात काही-बाही. बाकी तसा त्यांचा त्रास नसतो काही.



इतक्यात एक सरडा दृष्टीस पडला. आश्चर्य म्हणजे भगव्या रंगाचा. मनात म्हटलं, सरडा हुशार आहे. परिस्थितीचा रंग बघून सरड्यासारखा रंग बदलाय त्याने.

हळूहळू मंदिर जवळ येत होतं. आता ललित स्तोत्राचा आवाज आता खणखणीत ऐकू यायला लागला होता. सातव्या शतकात, चालुक्याच्या काळात ह्या मंदिराची निर्मितीची सुरुवात करण्यात आली. विजयनगर साम्र्याज्यातील राजा देवराया (दुसरा) ह्याने भव्य शिव मंदिर उभारले. एकूण तीन मंदिरे इथे आहेत. पुढे राजा कृष्णदेवराय ह्याने सभामंडप आणि विजयस्तंभ उभारून त्यात काही भर घातली. ह्या सभापंडपात अतिशय स्वस्त दरात, धार्मिक पद्धतीने पूर्वीपासून विवाह केले जातात. अनेक गोर गरीब आणि धनिक लोक देखिल इथे लग्नबंधनात अडकण्यास, आजही पसंती देतात. ह्या वास्तूला वर्ल्ड हेरिटेज स्ट्रॅकचरअसा दर्जा मिळालेला आहे.




हे सर्व पाहण्यात आम्ही गुंग होतो. आमचा गाईड सगळं काही रंगवून सांगत होता. इतक्यात त्याने आमचे लक्ष एक मोठा ढोल दाखवून त्याकडे वळविले. हजारो वर्षा पूर्वीचा तो ढोल असल्याचे सांगितले. पण तो आता वापरात नाही म्हणाला. लगेच तुलनेने छोट्या, दुसऱ्या ढोलाकडे बोट करून तो म्हणाला, माझ्या लहानपणी मी हा ढोल आरतीच्या वेळी वाजवत असे.

त्या बदल्यात पुजारी मला प्रसादाचा लाडू देत असत. पण आता हा, देखिल कोणी वाजवत नाही. असं म्हणून त्याने स्वयंचलित ढोलकडे लक्ष वेधलं. आता हा वापरला जातो. आता आरती, मंत्र सगळंच रेकॉर्ड लावून. सांगतांना त्याचा स्वर किंचित खिन्न लागला होता.

काही क्षणांत त्याने स्वतःला सावरले. पूर्वीच्या उत्साहाने त्याने आम्हाला एका छोट्या मंदिराकडे नेले. हे पहा शिव-वैष्णव मंदिर. हे त्यावेळचे 'सोशल इंजिनीरिंग’. आम्हाला कळेना ह्यात कसलं 'सोशल इंजिनीरिंग'? आमच्या प्रश्नार्थक चेहऱ्यांकडे पाहून त्याने खुलासा केला. पूर्वी शैव आणि वैष्णव असे दोन पूजा पद्धतीचे दोन पंथ होते. त्यांच्यामध्ये शंकर आणि विष्णू ह्यांच्या श्रेष्ठत्वावरून प्रचंड वाद असत. अगदी शस्त्रे देखील उगारली जात. हे पाहून राजा कृष्णदेव रायने दोन्ही मूर्ती एकाच ठिकाणी स्थापून दोन्ही पंथात समेट घडवून आणला. सांगतांना गडी जोशात आला होता. मघाची खिन्नता तुंगभद्रेच्या पार पळून गेली होती. उत्साहात त्याने एका नंदीच्या मूर्तीजवळ आम्हाला नेले.


हा 'त्रिकाल नंदी'. हा इतरांपेक्षा वेगळा आहे. ह्याला तीन तोंडे आहेत. पूर्वी हा मुख्य देवळात स्थापन केला होता. पण कालांतराने ह्यातील एका तोंडाचा काही भाग तुटला. आणि पूजेसाठी अखंड मूर्ती लागते, खंडित चालत नाही. म्हणून मंदिरातून हलवून त्याला इथं ठेवलंय. 'त्रिकाल नंदी'ची तीन तोंडे म्हणजे अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. हे त्रिदेव असं पूर्वी मानला जायचं. हा, पण माझं म्हणणं वेगळं आहे. असं म्हणून त्याने आमच्याकडे पाहीले. भुवई उडवत त्याने प्रश्नार्थक चेहरा केला. आमच्या कडून उत्तर येत नाहीसे पाहत तो म्हणाला, तीन तोंडे म्हणजे तीन काळ-त्रिकाल! भूत, वर्तमान, आणि भविष्य काळ!! तुटलेल्या तोंडाला तुम्ही भूतकाळ मानलेत, त्या पासून काही शिकलात तर तुमचा वर्तमान आणि भविष्य सुरक्षित असेल. काय छान बोलून गेला होता तो!

आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यापाशी आलो होतो. दर्शनासाठी बऱ्यापैकी गर्दी होती. आम्हाला रांगेत उभे न करता, पठया विरुद्ध बाजूने गाभाऱ्यात शिरू पाहत होता. पुजारीही कन्नड भाषेत, अगम्य शब्दात त्याच्यावर खेकसला. त्यावर गाईडने काहीतरी उत्तर दिलं. आमचा प्रवेश सुकर झाला. हे बहुदा त्यांचं रोजचंच असावं.




मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही प्रदक्षिणेला मागच्या बाजूस गेलो. इथं मूर्तीच्या बरोबर मागे छपरामधून सूर्यप्रकाश खाली जमिनीवर येत होता. त्याने आम्हाला थांबवले. मनिषाला म्हणाला हात जोडा. ते हात त्याने त्या प्रकाशाच्या झोताच्या जवळ धरण्यास सांगितले. आणि काय आश्चर्य ! हात जोडलेल्या मनिषाच्या चेहऱ्यावर प्रकाशझोत गेला. असा भास होत होता की तिने हातात पणती धरली असून त्याच्या ज्योतीचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पसरून चेहरा उजळला आहे. व्वा लाजवाब !! तो क्षण मोबाईल च्या कॅमेऱ्यात टिपण्यास अजिबात विसरलो नाही.

आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो होतो. गाभाऱ्याच्या बाहेर येतांना त्याने, त्या मघाच्या पुजाऱ्याला पंचवीस रुपये दक्षिणा देण्यास सांगितलं. हि अशी सेटिंग होती तर!
आता गाभाऱ्याच्या दरवाजाकडे बोट करून त्याने आम्हाला त्यावरचं नक्षी- काम बारकाईने बघण्यास सांगितले. ह्यात काही खटकतं आहे का?  त्याच्या प्रश्नावर आम्ही अधिक बारकाईने पाहू लागलो. मूळ चित्रापेक्षा निळा रंग वेगळा वाटला. काही न बोलता तो आम्हाला मंदिरा बाहेर घेऊन आला. कळसाकडे बोट करून त्याने परत तसाच प्रश्न केला. ह्यात काही खटकतं आहे का? हे पाहणं थोडं अवघड. डोक्यावर टळटळीत ऊन, कळस वीस मीटर उंच. फार काही नीट दिसेना.

मग एका ठिकाणी बोट करून तोच म्हणाला,'' ह्या मंदिरावरचं हे ब्रिटिश आक्रमण. स्वातंत्रपूर्व काळात मंदिर दुरुस्ती करतांना ब्रिटिशांनी, ह्या कळसावर व्हिकटोरीय राणीची प्रतिमा लावली आहे. आणि आत गाभाऱ्यावर निळा रंग देऊन, दोन अँजेल देखिल कोरलेत. निव्वळ खोडसाळपणा, दुसरं काय''. सांगतांना त्याचं रक्त तापल्याचं जाणवत होतं.

मंदिर परीसराबाहेर, समोर एक खूपसं पाणी असलेला तलाव होता. त्याला असंख्य पायऱ्या. हा आयताकृती तलाव म्हणजे 'पूष्करणी'. हा तलाव भरला कि ह्यातलं पाणी तुंगभद्रा नदीत सोडतात. चला आता आपण तुंगभद्रा नदी पाहुयात.
आम्ही नदीपाशी पोहचलो. पाण्याने तुडुंब भरलेली तुंगभद्रा विलोभनीय दिसत होती. मनात आलं ही अशीच वर्षानुवर्षे 'त्रिकाल' वाहत राहणार 'शिवाला' साक्ष ठेवत.
एव्हाना ऊन डोक्यावर आलं होतं. पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती. गाईडच्या ते लक्षात आलं असणार. घाईने तो म्हणाला आता मी तुम्हाला छानश्या हॉटेलमधे घेऊन जातो. जाता जाता आणखी एक मंदिर पाहून जाऊ, वाटेतच लागेल.
सकाळच्या मस्टर्ड गणेशा बरोबरचा, हा 'पीनट गणेशा'. मस्टर्ड गणेशाची मूर्ती अवाढव्य त्यामानाने मंदिर लहान होतं, इथं त्याच्या उलट! मंदिर उंचीने आणि आकाराने अवाढव्य तर मूर्ती तुलनेनी खूपच लहान. पण मंदिरातले खांब छान कलाकुसरीने नटलेले.

एकदाचं हॉटेल गाठलं. नाव 'म्यॅन्गो ट्री'. ह्याही हॉटेलच्या नावात परत 'म्यॅन्गो’. कालच्याच 'पिंक म्यॅन्गो'ची नेक्स्ट एडिशन. इथं मात्र इंडियन फूड मिळालं. तुडूंब जेवण केलं.



आता आम्ही जाणार होतो 'विजय-विठ्ठल मंदिर' परिसराकडे. 'म्युझिकल पिलर्स'साठी हे मंदिर प्रसिद्ध. इथला 'स्टोन चॅरिएट', फोटोग्राफर्सच्या खास आवडीचा.
आमची कार त्या परिसरात आल्यानंतर गाईडने एका ठिकाणी थांबायायला सांगितलं. तिथून पुढे गाडी नेता येणार नव्हती. तिथून पुढे मंदिरापाशी जाण्याकरीता वेगळी व्यवस्था होती. बॅटरी ऑपेरेटेड गाडीने तिकीट घेऊन जावं लागणार होतं.

इथं लक्षात आलं, इथं पूर्ण महिला-राज आहे. तिकीट देणारी, गाडी चालवणारी दोघीही स्थानिक तरुणी होत्या. अशा सहा एक जोड्या असाव्यात. फार उत्साहात त्यांचं काम चालू होतं. अशाच एका गाडीने आम्हाला मंदिरापाशी पोहोचवलं. त्या उत्साही ड्रायव्हर तरुणीला म्हणलं, तुझा फोटो काढायचाय, तर तिने छान पोझ देऊन फोटो काढू दिला.

आता आम्ही मंदिर परिसरात पोहोचलो होतो. आत शिरताच काहीतरी छान बघायला मिळणार ह्याची खात्री पटली. मुख्य विठ्ठल मंदिर, संगीत सभागृह, नृत्य सभागृह आणि भजन सभागृह अशा चार वास्तू. विजयनगर साम्राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाच्या साक्षीदार! इथं सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतांनाच वातावरण कसं असेल हाही विचार आला आणि अंगावर रोमांच उभे राहिले. ह्या विचारातून मला गाईड गुट्टीने बाहेर काढले.

चला आपण आता विठ्ठल मंदिर पाहू. आत शिरताच गाभाऱ्यात डोकावलो. इथं तर मूर्तीच नाही. मग तो सांगू लागला, परकीय आक्रमणाच्या वेळी इथली मूर्ती नष्ट केली गेली असावी अशी एक शक्यता. पण दुसरी शक्यता मला योग्य वाटते. म्हणे की, इथल्या पुजाऱ्यांनीच सुरक्षितता म्हणून मूर्ती स्वतःहाच काढून दुसरीकडे नेली असावी.
असं म्हणतात की पंढरपूरला जी विठ्ठल मूर्ती आज आपण पाहतो ती हिच. तो हेही म्हणाला की ह्याला प्रमाण, तुमचे मराठीतले 'कानडा राजा पंढरीचा', 'कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकू' हे प्रसिद्ध अभंग. त्याचं मत आम्हाला पटत होतं.




मग त्याने आम्हा दोघांना विचारलं,’’ब्रेक डान्स म्हटलं की कुणाच नाव आठवतं? मनिषा पट्कन म्हणाली ‘’ मिथुन’! मी ही मान डोलावली. गाईड गुट्टी समाधानी नव्हता. त्याच्याही आधी? मोअर फेमस? मी म्हणालो मायकेल जॅक्सन. त्याने मान डोलावली. आपण समजतो ब्रेक डान्सहा नृत्यप्रकार विदेशी लोकांकडून आपण शिकलो. पण तसं नाहीये. इथंच फार पूर्वी आपले लोकं तो डान्स करत असत. आम्ही पूर्ण गोंधळून गेलो होतो. मग आमच्या लक्षात आलं. ह्याची काहीतरी ट्रीक आहे. हा नक्की काहीतरी दाखवणार. त्याची हि स्टाईल एव्हाना आमच्या परिचयाची झाली होती. मग तो आम्हाला एका खांबाजवळ घेऊन गेला. त्यावर एका नर्तिकेचं चित्र कोरलं होतं नाचतांनाचं. आणि तिचा तो नृत्यप्रकार चक्क आताचा ब्रेक डान्सचं! आम्ही गुट्टीला हसून दाद दिली. माणूस अगदी मार्मिक बोलायचा.

आता उत्सुकता होती ते 'म्युझिकल पिलर्स' पाहण्याची. पाहतो तो काय, ते खांब जिथे होते त्या संगीत सभागृहात जाण्यासाठी मज्जाव. ASI (ऑर्चिलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) ची आदेशवजा पाटी, जोडीला सुरक्षारक्षक.




काही वर्षापूर्वी 'म्युझिकल पिलर्स'चं रहस्य शोधून काढण्याकरिता एक दोन खांब तिथून बाहेर काढले लोकांनी. पण त्यांना शोधता आलंच नाही रहस्य. पण म्हणून आतून पाहण्याकरिता बंदी. अजून काही पडझड होऊ नये म्हणून. मन खट्टू झालं. गुट्टी म्हणाला डोण्ट वरी, आय विल ट्राय माय बेस्ट. मग हळूच आम्हाला वास्तूच्या मागच्या बाजूला घेऊन गेला. तिथे सुरक्षारक्षक नव्हता. दबक्या पावलांनी तो वर चढला, म्युझिकल पिलर्सपाशी हात पोहचेतोवर. मग आमच्याकडे खूण करत नीट कान देऊन ऐकण्यास सांगितले. चारही पिलर्सवर एकामागोमाग बोटे आपटली. अहो आश्चर्यम, मंजुळ नादस्वर ऐकू आले. स्थापत्यकलेतील सौंदर्य! ज्याने हे बनवले असेल, त्या कारागिराला मनोमन वंदन केले.

गुट्टीने मग आणखी एक ट्रिक दाखऊन कमाल केली. म्हणाला तुमचा एक मोबाईल द्या माझ्याकडे. मनीषाने लगेच दिला. त्याने मग त्यातला कॅमेरा

ऑन केला. आता मी सांगतो तश्या पटापट हालचाल करायच्यात आणि सांगेन त्या पोझिशनला जाऊन उभं रहायचं जोडीने. त्याने खुणा केल्यावर आम्ही त्या त्या जागी उभे रहायचो, तो पट्कन क्लिक करायचा. तिसऱ्यावेळी क्लिक केल्यावर त्याने जवळ बोलावले. आम्ही मोबाईल मध्ये पाहू लागलो. एकाच फोटोत, आम्ही दोघं, तीन ठिकाणी उभे! गुट्टीला मनापासून दाद दिली.

एव्हाना सायंकाळचे पाच वाजून गेले. परिसर बंद व्हायची वेळ झाली. सुरक्षारक्षकांच्या खुणेच्या शिट्ट्या वाजू लागल्या अन नाईलाजाने परतावे लागले. गाईड चंद्रशेखर गुट्टीने सकाळपासून खूप छान माहिती दिली होती. अतिशय सभ्य आणि सरळ मनाचा वाटला तो. त्याचे आभार मानले आणि त्याला निरोप दिला.

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...