Tuesday 5 November 2019

सुख म्हणजे नक्की काय असतं ?



बालाजी मंदिरात पोहोचेतो अंधार दाटून आला होता. पण घड्याळी काटा तर सायंकाळचे पाच वाजल्याचे सांगत होता. अचानक जोराचा वारा सुटला अन आभाळात वीजा चमकू लागल्या. झिम्माड पाऊस येणार हे सांगायला, कोणा ज्योतिष्याची आता गरज नव्हती. होतही तसंच ! थोड्या वेळानं पावसाचा जोर किंचित कमी होतो. मग दोघं कसबसं मंदीर गाठतात.

व्यंकट रमणा हर गोविंदा ! व्यंकट रमणा हर गोविंदा !! उजव्या हाताने धूप-आरतीचे तबक फिरवत, डाव्या हाताने सफाईने घंटा हलवत पुजारी बालाजीच्या नावाचा गजर करीत असतो. बाहेर धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे त्याला भान नसावे, इतका तो तल्लिन झालेला असतो. दर्शन घेऊन दोघही तिथं असणाऱ्या बोर्डाकडे वळतात.

दिवाळी निमित्ताने दहा दिवस वेगवेगळ्या पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या. कुंकुमार्चन, पुष्पांजली, फलार्पण वगैरे. शेवटच्या दिवशी काय? दोघही ते उत्सुकतेने पाहू लागले. मिष्टान्नार्पण...

नवरोबाने पुजाऱ्याला विचारले, हे कसं असतं?
‘’हजार लाडवांचा भोग बालाजीला अभिषेक म्हणून चढवायचा ! लाडू मात्र साजूक तुपातले हवेत !!’’ पुजारी उत्तरला.
त्याने पत्नीकडे पाहिले तर तिने मानेनेच नकार दर्शवला. मग दोघेही निघाले, तो विषय तिथेच सोडून.

पत्नीचा वाढदिवस जवळ आला होता. नवरोबा दरवर्षी तिला सरप्राईज गिफ्टदेत आला आहे. पण ह्या वर्षी कसं करायचं? त्याला काहीच सुचत नव्हतं. मित्र मंडळींना जमवून, छानशी पार्टी तर नेहमीचीच. पण ह्यावेळी काहीतरी वेगळं व्हावं, असं सारखं त्याला वाटत होतं.
    
अचानक नवरोबाला नितीनचा फोन येतो. नितिन सोनावणे एक एनजीओचालवतो. पेठसुरगाणा भागात, त्याची संस्था, आदिवासी लोकांकरिता काम करते. त्याच्याशी नवरोबाचं बोलणं होतं, सहज इकडचं-तिकडचं. फोन खाली ठेवल्यावर त्याला एकदम क्लिक होतं.  बायकोच्या वाढदिवशी, आपण जाऊयात का एखाद्या आदिवासी पाड्यावर? दुर्गम अशा भागात, जिथे सहसा मदत पोहचत नाही अशा ठिकाणी !

वा sss ही आयडिया, त्याची त्यालाच भारी आवडलेली असते. नितिनशी परत बोलणं होतं. हरसूलपासून पाच किलोमीटर दूर असलेल्या वांदरपाडाइथं जा असं त्याचं सांगणं. तिथला माणूस जोडीला द्यायची व्यवस्था, तो करून देऊ शकत असतो.

चला, काहीतरी चांगलं आणि हटके करायाची संधी मिळाली होती. तो उत्साहाने कामाला लागतो. तो बायकोला ही कल्पना सांगतो. घरात वापरात नसलेले बरेच कपडे असतील, ते घेऊन जाऊ तिथे. बायको म्हणते, दिवाळीचा फराळ आणि काहीतरी गोडधोड घेऊन जावूयात. अनायासे दिवाळी आहे, सण साजरा करूयात त्यांच्यासोबत.

हरसूलला नितिनने सांगितलेला माणूस उत्तम बोरसेत्यांना भेटतो. त्याला जोडीला घेऊन ते निघतात. वांदरपाडाहरसूल पासून पाच किलोमीटर अंतरावर. पोहोचेतो दुपारचा एक वाजतो. ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच जाणवत असतो. पण दोघेही उत्साहात असतात. घामाघूम होत ते पाड्यावर पोहचतात. उत्तमच्या घरापाशी बाया-बापड्या, पोरासोरांची ही गर्दी !

बरोबरचे कपडे उत्तमच्या ताब्यात वाटपासाठी देतात. आणि खायचे फरळाचे जिन्नस, घाईघाईने बाहेर काढून वाटू लागतात. लहानगी लेकरं अगदी तुटून पडतात त्यावर. फार भुकेलेली असावीत. मग बायको केशरी रंगाचे बुंदीचे लाडू बाहेर काढते, छान साजूक तुपातले. त्या लाडवांची रास पाहून साऱ्यांचे डोळे विस्फारतात ! पटापट सगळ्यांना दोन दोन लाडू देतात. लाडवाच्या प्रत्येक घासागणिक त्या लहानग्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद द्विगुणित होतांना त्यांना जाणवतो. नवरोबा बायकोकडे पाहून विचारतो, कसं वाटतंय?

‘’बालाजीला मिष्टान्नार्पण... केल्यासारखं वाटतंय ! साजूक तुपातल्या लाडवांचा ह्याच्याहून काय वेगळा असतो अभिषेक !!’’ बायकोच्या चेहर्‍यावरचे समाधानाचे प्रसन्न भाव पाहून नवरोबा सुखावतो. वाढदिवस सत्कारणी लागल्याच्या आनंदात, मग बायकोही सुखाने नवरोबाचा हात हाती धरते.

anilbagul1968@gmail.com



No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...