Tuesday 4 July 2017

दोन अंडी, पाच पाव !!



काल परवाच झाला मृत्यु, मंजुळा शेट्येचा ! मुंबईतल्या ऑर्थर रोड जेल मध्ये; महिला पोलिसांच्या जबर मारहाणीत !! दोन अंडी आणि पाच पावाचा हिशोब तिला लावता आला नव्हता..

जे हिशेब मंजुळाला आजवर लावता आले नव्हते गजाबाहेरच्या जगात, तेच तर चुकते करायला ती पोहचली होती गजाआड ! तिथे ती नव्याने हिशेब मांडू पाहात होती. पण नियतीला कदाचित तेही मंजूर नसावं.अशा अनेक ‘मंजुळा’ आपल्या आजूबाजूला असतात, जमाखर्चाच्या आकडेमोडीत व्यस्त. कित्येकांचे जमतात, तर बऱ्याचदा चुकलेले असतात.

दाउदची आई, अल्लाला प्यारी होतांना, आयुष्याची वजाबाकी मांडून गेली असेल का? त्या ‘तुकाराम ओम्बले’ची पत्नी भरल्या कपाळावरचं कुंकू पुसतांना सव्वीस अकराचा पाढा म्हटली असेल का? केईमच्या त्या वार्डात, अखेरचा श्वास घेतांना ‘ अरुणा शानबाग’ला गणित सुटलं होतं का आयुष्याचं? ह्या सगळ्याची उत्तरं माहीत असतील आपल्याला, कारण ती आपणच ठरवलेली असतात म्हणून ! पण एखाद्याच्या आयुष्यात नियतीने मारलेल्या फुल्यांचा अर्थ कुठे माहीत असतो आपल्याला? नाहीतर हिशेब चुकल्या मुळे वाढलेले असे अनेक ‘स्त्रीगर्भ’ वजा होतेच ना !

खरं तर असे अनेक हिशेब लागत नसतात आपले आयुष्यात. म्हटलं तर पै-पैशाचे, म्हटलं तर नात्यातल्या अपूर्णतेचे. आयुष्य सरत जातं बेरजा वजाबाक्या करत ! अगदी जवळचा ‘हच्चा’ दिला तरी जुळणी होत नाही मनासारखी. मग नियती हसत राहते, एखाद्या क्रूर खलनायाकासारखी !

पण आपण तर असतो सर्वसामान्य. आपलं जगणं थोडीच असणार अमिताभच्या फिल्म सारखं; ‘दो और दो पांच?

आपल्या नशिबी फक्त आणि फक्त दोन अंडी आणि पाच पाव !!

anilbagul1968@gmail.com



  

Monday 13 June 2016

सिंहस्थ पर्वणीचा 'अमृतकुंभ'

गोदातीरी भगव्या संध्याकाळी
कामांध वासनांचा भोग चढतो आहे
आणि उगवणारा प्रत्येक प्रहर
साधु महंतांचा क्रोध झेलतो आहे 


सत्तेच्या दिखाऊ दिवाणखान्यातून
श्रेयवादाचा मद स्त्रवतो आहे
तर, भिक्षुकांच्या बुभुक्षित झोळीला
केवळ दक्षिणेचा मोह होतो आहे 


इच्छुकांच्या निव्वळ स्वप्नभंगातून
फक्त भाकड मत्सर प्रसवतो आहे
अन सिंहस्थ पर्वणीच्या अपूर्व योगासाठी
षडरिपूंचा 'अमृतकुंभ' शिगोशीग भरतो आहे.  


षडरिपूंचा 'अमृतकुंभ' शिगोशीग भरतो आहे.

BACK UP


'validity' संपलीय 'relation' च्या 'software' ची,
आठवणींच्या 'files delete' होत आहेत.


जुनंच 'version'  नव्याने 'Install'  करावं  की,
'program' चं सगळा change करायचा ?


हा 'dilemma' आता संपवावा लागणार आहे.
आपणच 'outdated' होण्यापूर्वी. 


एक मात्र नक्की करायचं....
अनुभवाचा 'backup' तेव्हढा ठेवायचा.

anilbagul1968@gmail.com

कविता


ऐन तारुण्यात कविता करू पहात होतो,
शब्दांचे फुलोरे फुलवू बघत होतो.


शब्दांच्या मेळात अर्थ निसटून जात होता,
अर्थाच्या गवसणीत शब्द सांडून जात होते. 


ज्येष्ठ कवी म्हणाले अक्षरा मधे जीव ओत,
भावनांचा ओलावा शिंपडायला शीक.
प्रेमाचा बगिचा फुलव, मग बघ जादू,
शब्दांचा पाऊस आणि कवितेच भरघोस पीक !


प्रेमाच्या झुल्यावर कविता झोके घेऊ लागली,
स्वप्नाच्या जगात मग हिंडू फिरू लागली.
प्रेमाला मग धुंद प्रणयाचा बहर आला,
अन कवितेला जणू मोगऱ्याचा सुवास आला.


आयुष्याच्या वळणावर वास्तवाची ठेच लागली,
अनुभवाच्या धारदार शस्त्रनि कविता घायाळ झाली.
दुखाच्या आवेगानी अश्रूंचा बांध पुरता फुटला,


वेदनाच्या आर्त कळान्तून विरहगीत प्रसवून गेला. 

anilbagul1968@gmail.com

कुंडली

आयुष्यातले हिशेब चुकते करीत गेलो 
जमा थोडे बाकी उणेच मांडीत गेलो 

यशाच्या सोंगट्या दूरदेशी राहिल्या 
नशिबाचे पत्ते फक्त पिसत बसलो

नवे नवे घाव झेलीता झेलीता
जुन्याच जखमा मोजीत रमलो

मरणाच्या दारात डोकावीत असता
सरणाचे देणे मात्र फेडीत राहीलो

आता उरलो केवळ शुन्य भूतकाळापुरता
वर्तमानाचा अद्याप पत्ताच नाही ठरला

भविष्याचे काय म्हणुनी काय पुसता
फकीराची कोणी कधी कुंडली मांडीता? 

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...