Showing posts with label कथेच्या राज्यात. Show all posts
Showing posts with label कथेच्या राज्यात. Show all posts

Tuesday 11 December 2018

लाल फितीचा कारभार - अर्थात रेडटेप !!




शासन व्यवस्था आणि तिचा एकूण कारभार, ह्याचं वर्णन एका वाक्यात कसं करता येईल ? 
तर सरकारी काम म्हणजे फायलींचा वर्षानुवर्षे रेंगाळणारा प्रवास  !
म्हणजेच लाल फितीचा कारभार - अर्थात रेडटेप !!

नको असलेल्या फायली, कधी त्यात अडकल्या जातात. कधी जाणीवपूर्वक अडकविल्या जातात.
तर हव्या असलेल्या फायली नको तितक्या जलदगतीने प्रवास करत पुढे दामटल्या जातात.
कारण काय तर ..
लालची  राजकारणी, धनदांडगे व्यापारी आणि भ्रष्ट नोकरशहा ह्यांच्या अभद्र युतीचा 'वेस्टेड इंटरेस्ट' त्यात असतो.

पण त्यांना हवी असलेली फाईल जर कोणी नोकरशहा जाणीवपूर्वक दाबून ठेवत असेल तर ?
तर ... संघर्ष अटळ असतो.  अन कधी कधी तो 'टोकदार'ही होत जातो.

हाच टोकदार संघर्षाच्या, दमदार लढ्याचा विषय आहे, 'रेडटेप' ह्या  पत्रकार अभिजित कुलकर्णी ह्यांच्या नव्या कोऱ्या कादंबरीचा. प्रस्तुत कादंबरी ही लेखकाची पहिलीवहिली साहित्यनिर्मिती आहे, हे पाहून अचंबित व्ह्यायला लागतं, हि वस्तुस्थिती.

मराठी वाडःमयात, एकूणच राजकारण ह्या विषयावरील, त्यातही शहरी राजकारणावर बेतलेल्या कादंबऱ्या तश्या हातावर मोजण्याइतक्या. त्यातही महत्वाच्या, 'आज दिनांक' ,'सिंहासन' आणि पडघम-'अस्वस्थ दशकाची डायरी ह्याच. त्या मांदियाळीत ही रेडटेप ह्यापुढे असेल असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही.

कादंबरीचा नायक, बांद्र्याचा जिल्हाधिकारी महेश राऊत,  ह्या संघर्ष लढ्यातले मुख्य पात्र. तर दै. प्रखरचा वृत्तसंपादक जया आणि त्याचा सहकारी अभि ह्या लढ्यातले त्याचे साथिदार. ह्यांचा लढा आहे तो प्रामुख्याने महसूल मंत्री कदम, आरोग्यमंत्री घोरपडे, ह्यांच्याशी. मंत्रालयातले चीफ सेक्रेटरींच्या मार्फत महेशला पायबंद करण्याच्या प्रयत्नात ते असतात. जोडीला मुख्यामंत्री, सांस्कृतिक मंत्री रोकडे, कदमांच्या उजवा हात सुरेश नाईक आणि महेशचा बॅचमेट रासकर आणि माहिती जनसंपर्क अधिकारी वर्षा.

प्रत्येक पात्रबरोबरचे संवाद लेखकाने खुमासदारपणे रंगवल्यामुळे ती जिवंत वाटू लागतात. हे सारं इतकं जमून आलंय की वाचकांनी त्या पात्रांना आपल्या आसपास शोधल्यास नवल वाटू नये. त्यातही 'वर्षा ' इतकी फर्मास उभी राहिली आहे त्याला तोड नाही ! तीच अघळ-पघळ अन प्रसंगी लाडिक बोलणं, तिची वेशभूषा, प्रसंग निभावून नेण्याची हातोटी लाजवाब !!  अशी 'वर्षा' जवळपास प्रत्येक ऑफिस मध्ये असू शकते, असं वाटावं इतकी हि 'वर्षा' चपखल उभी राहिली आहे.

बान्द्रातील सरकारी वसाहतींचा पुनर्विकास आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. सदरची फाईल ही जिल्हाधिकारी महेश राऊत ह्यांच्याकडे आहे. ती त्यांनी मंजूर करून लवकर मंत्रालयात पाठवावी ह्यासाठी शासनातील एक लॉबी प्रयत्नशील आहे. चीफ सेक्रेटरी हे महेशवर दबाव आणत आहेत. महसूल मंत्री कदम ह्यंची त्याकरिता चरफड सुरु आहे.  ह्या प्रस्तावातील काळबेरं,  हे महेशने ओळखले आहे. बिल्डरलॉबीचा कावा त्याच्या लक्षात आला आहे. त्याच्या प्रामाणिक मनाला ही गोष्ट पटलेली नाहीये. कोणत्याही परस्थितीत हा डाव त्याला हाणून पाडायचंय. त्यासाठी कोणताही दबाव झुगारून द्यायची त्याची मानसिक तयारी झालीये. आणि मग सुरुवात होते रंगतदार खेळाला...

हा खेळ आहे दोन प्रवृत्ती मधला. पैश्याच्या लालसेपोटी वखवखलेली बिल्डर लॉबी, नीती-अनीतीची कोणतीही चाड नसणारे राजकारणी आणि सहज विकले जाणारे सरकारी बाबू ही अभद्र युती पटाच्या एका टोकाला. तर, प्रामाणिक सरकारी अधिकारी आणि तत्वनिष्ठ पत्रकार पटाच्या दुसऱ्या टोकाला. दोन्हीकडून दुसऱ्याला मात देण्यासाठी चाली खेळल्या जातात. प्याद्यांचा वापर केला जातो. शेवटी बाजी कोण मारतं?

कथा पुढे सरकतांना राजकारण्यामधल्या परस्परांमधला शह-काटशह, नोकरशाही मधला सुप्त संघर्ष ह्याच बरोबरीने वृत्तपत्राजगतातील पत्रकारामधील कुरघोडी ह्या पटलावर नेमकेपणाने येतात.

शेवटच्या क्लायमॅक्समध्ये महेशला जाळ्यात ओढण्यासाठी लावलेल्या 'हनीट्रप'चं वर्णन फारच रंजक झालं आहे. त्यात आपला कथानायक गुंतू नये, अशी भावना वाचताना प्रत्येक वाचकाची होणार ह्यात शंका नाही.

कोणत्याच खेळीला महेश हार पत्करत नसल्याचे पाहून हताश झालेले वरिष्ठ अपेक्षेप्रमाणे महेशची बदली करतात. त्याही परिस्थितीत महेश लढा चालू ठेवतो.  त्या करीता मंत्रालयातल्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांचीही  त्याला साथ मिळते. त्या सर्वांनी मिळून आखलेला  प्लान एका अर्थाने यशस्वी होतो.

मुदलात सशक्त कथाबीज, ओघवती भाषा, घटनांचा वेग, ठसठशीत पात्रे, त्यांच्यातले खुमासदार संवाद, टोकदार संघर्ष, त्याकरीता रचलेले डावपेच ह्या साऱ्यामुळे कादंबरी वाचनीय आणि दर्जेदार झालीये. अभिजित कुलकर्णी ह्यांची हि साहित्यकृती म्हणजे पदार्पणातच ठोकलेले शतक ठरावे. त्यात मेहता पब्लिशिंग सारख्या विख्यात प्रकाशन संस्थेने निर्मिती करतांना कुठेही कसर ठेवली नाहीये. त्यामुळे ही कादंबरी 'बेस्ट सेलर ' ठरल्यास आश्चर्य वाटू नये.

anilbagul1968@gmail.com

Wednesday 24 October 2018

नानू बामणाचा सदरा


नानू बामणाचा सदरा

नानू म्हणजे नानू गद्रे, आमचा शेजारी. आम्हा बेडेकऱ्यांच्या वाड्याशेजारीच गद्रे वाडा. पूर्ण सावरगावात ही दोनच ब्राह्मणांची घरं. इथल्या कुणब्यांच्या भाषेत बामणांची.

नानू मुका होता, त्याला बोलता येत नसे. कानाने ऐकूही येत नसे. त्याचा जेव्हा कधी आणि जिथे कुठे जन्म झाला असेल, तेव्हापासूनच तो असा असणार. म्हणजे आम्ही गद्र्यांकडे जेव्हापासून त्याला पाहतो आहोत तो असाच आहे.

रोज सकाळी साधारणतः सहा साडेसहाच्या सुमारास खराट्याने अंगण झाडल्याचा आवाज येई. नानूचा रोजचा दिवस त्याने सुरु होई. अंगणात बाजेवर झोपलेलो आम्ही भावंडे त्या आवाजाने जागे होऊन उठू लागत असू. शेणाने सारवलेल्या अंगणाचा वास घेत आम्ही घरात शिरत असू.

नानूला आमच्या झोपमोडेची फिकी नसे. तशी नानूला कसलीच फिकी नसायची म्हणा.
सकाळी सकाळी अंगण झाडलं, विहिरीवरून सात आठ बदल्याभरून पाणी आणून दिलं, की नानूचा दिवसभराचा कामाचा कोटा संपलेला असे.

मग घराच्या पडवीत, जणू खास त्याच्यासाठीच केलेल्या कट्टयावर, मळखाऊ रंगाचा अभ्रा असलेल्या लोडाला टेकायचं. आजूबाजूचं  जग स्वतःची जहागिरी असल्यासारखं  पहात राहायचं, हा मोठा दीर्घोद्योग त्याच्यासाठी.
धूनमधून धोतराच्या कनवटीला लावलेली खाकी रंगाची चंची काढायची. त्यातून पितळी अडकित्ता काढायचा. किंचित पिवळसर हिरवं विड्याचं पान काढायचं. हलक्या हातानं त्याच्या शिऱ्या ओढून काढायच्या. चुन्याच्या डबीतून अंगठ्याच्या नखांवर चुना घ्यायचा. चुना कोरडा असेल तर जवळच्या पितळी तांब्यातील पाणी लोट्याने घेत, दोन चार थेंब टाकून ओलसर करायचा. तर चुना मनाजोगता लावून झाल्यावर, काथ्याचे  दोन लहानगे तुकडे पानावर घ्यायचे आणि मग सुपारीचा कार्यक्रम व्हायचा.

सुपारी, खास आप्पांच्या दुकानातली, श्रीवर्धनहून मागवलेली. त्यातलं एखादं खांड, पितळी अडकित्यात अल्लद धरून सरसर कातारायचं. कातरता कातरता, उजवा पाय किंचित वर करून एक मोठाला पाद हमखास सोडला जायचा. हे टायमिंग इतकं परफेक्ट की पाद सोडण्यासाठीच जणु सुपारी कातरायचा तो, असं वाटावं.

सुपारीचे तुकडे... कातरलेली सुपारी, त्या पानावर ठेऊन, पानाची छानशी घडी करायची. तोंड पूर्ण उघडून पानाचा तोबरा तोंडात सफाईनं कोंबायचा. मग शून्यवत नजर लावत रवंथ करत राहायचं कित्येक वेळ ! भूत, वर्तमान अन भविष्य कसलाच घोर जीवाला नसल्यागत.
 
तसा गद्र्यांच्या घरात नानू म्हणजे असून नसल्यासारखा. तो मूळचा गद्रे नसून आश्रित असल्याचा आम्हा बेडेकरांना दाट संशय. पन्नाशी पार केलेला नानू अविवाहित ! त्यामुळे कसलाच आगापिछा नसल्यासारखा. गद्र्यांच्या प्रतिभाकाकूंनी दिलेल्या भाकर तुकड्यांवर त्याची गुजराण व्हायची. सरळ स्वभावाच्या प्रतिभाकाकूं, फार काही नं बोलता त्याला खाऊ-पिऊ घालत. असा परिपाठ चालू आहे गेली कित्येक वर्षे.

गद्र्यांची शेतीवाडी भरपूर. शिवाय आंबा, फणस आणि काजूची भरपूर झाडं. सगळं सांभाळायचं तर भरपूर माणसं हवीत. त्यामुळे घरी कुणबी गडी-बायांची कायमच वर्दळ. त्यांच्या नजरेला, कट्ट्यावर रवंथ करत निवांत बसलेला नानू पडायचा. त्यांच्यात कुजबुज चालायची अधून मधून मग नानूवरून. 
एकंदरीतच त्यांच्या दृष्टीने नानू एकदम सुखी माणूस. त्यांचंही बरोबरच आहे म्हणा. त्यांची हातावरची पोटं. गद्र्यांच्या घरी मोलमजुरी करून जे पदरात पडेल त्यावर त्यांच्या घरांची चूल पेटणार असायची. चरितार्थासाठी आमच्या सावरगावात दुसरं होतंच काय म्हणा. लोडाला टेकून दिवसभर निवांत बसणारा नानू त्यांच्या दृष्टीने एकदम सुखी माणूस !

प्रत्येक वर्षी नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला आमच्या सावरगावच्या देवीचा उत्सव असे. दुर्गादेवीच्या मंदिरात रात्री कीर्तन हमखास असायचे. झाडून सारे गांवकरी कीर्तनाला हजर असत मात्र एक सोडून. मूकबधिर नानूला कीर्तनाचा काय उपयोग. तो आपला गद्र्यांचा पहारेकरी असायचा त्या दिवशीचा.यंदाच्या वर्षी सदानंद बुवा कोरेगावकर कीर्तन सांगणार होते. बुवा पंचक्रोशीत प्रसिद्ध. साहजिकच रात्री गर्दी झाली होती. पूर्व रंग झाला. अबीर बुक्याची ताटे फिरली. आपा गद्र्यांनी बुवांच्या कपाळी  बुक्का लावला. झेंडूच्या फुलांचा हार घातला. श्रीफळ आणि बिदागीचं पाकीट त्यांच्या हातात देऊन अदबीने नमस्कार केला. 
बुवांनी उत्तररंगाला सुरुवात केली.

जगी सर्व सूखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधून पाहे
मना त्वाची रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले

तर मंडळी  संपूर्ण जगात असा सुखी माणूस शोधूनही सापडणार नाही. नाहीतर अश्या सुखी माणसाचा सदरा घालून आपणही सुखी झालो असतो. ‘’आहे काहो असा कोणी सुखी ?’’ बुवांनी लोकांना प्रश्न विचारला. कोपऱ्यातल्या सदूच्या नजरेसमोर नानू आठवला.

बुवा कोणी सुखी नाही म्हणतात खरे, पण नानूच ह्या जगातला सुखी आहे. दिवस रात्र कष्ट करून रापलेल्या अशिक्षित सदूच्या नजरेत आरामात बसून खाणारा नानू सुखीच होता.  नानुचा सदरा आपण पळवायचा, सदूने मनातल्या मनात नक्की केलं. तो घातला की बुवा सांगतायत तसं आपणही सुखी होऊ. त्याने विचार पक्का केला. 

 ‘’जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला.’’ त्यामुळे लोकहो, चांगली कर्मे करा, कुणाशी कपट करू नका. कुणाला दुखः देऊ नका. बुवांनी उपदेश करत कीर्तन संपवले. लोकांनी टाळ्या वाजवल्या. सदू उठला.

नानूच्या विचारात चालत चालत तो गद्र्यांच्या घराजवळ केव्हा पोहोचला हे त्याचे त्यालाच कळले नाही. आता नानुला सांगून त्याचा सदरा घ्यायचा आणि घालायचा, एव्हढंच त्याच्या मनात घोळत होतं.

गद्र्यांच्या घराच्या अंगणात पिवळा दिवा थोडाफार उजेड देत होता. त्याने अधिरतेने नानूच्या कट्याकडे पाहिलं. नानू काही दिसला नाही. सदू अस्वस्थ झाला. इकडे तिकडे पाहू लागला. पूर्वेच्या कोपऱ्यात तांदळाच्या गोणींच्या जवळ अस्ताव्यस्त पसरलेला नानू त्याला दिसला. सदूने घाई केली. नानूजवळ तो पोहोचला. नानूचा चेहरा काळा-निळा पडला होता. तोंडातून फेस गळत होता, त्याने ओकारी देखिल केली असावी. त्याचा सदरा माखला होता.

किंचित शुद्धीत नानू हातवारे करत होता. नानुने केलेल्या इशाऱ्याच्या दिशेने सदूने पाहीले. अंगणातल्या झुडूपांमध्ये सळसळ झाली. सदूने ताडले, विषारी नाग असावा. सदूला काय करावे ते काही कळेना.

अप्पा गद्र्यांच्या नावे तो जोरजोरात हाका मारू लागला. नानुचे हातवारे हळूहळू कमी होऊ लागले. त्याने सदूचा पाय पकडला अन त्याने मान टाकली. सदू घाबरला. इतक्यात अप्पा गद्रे, प्रतिभाकाकू अंगणात शिरल्या.
‘’सद्या काय रे हे ?’’ अप्पांनी मोठ्यांदा विचारले.

सदू भानावर आला.  पुटपुटल्यासारखं म्हणाला,  ‘’जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला.’’
नानुचा सदरा घ्यायचा विचार सुद्धा आता त्याला भीतीदायक वाटू लागला होता. 

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...