Thursday 16 April 2020

सुखी संसाराचा मंत्र




तुमचं लग्न झालय? हो, मग हा लेख तुमच्यासाठीच.
काय म्हणता? तुमचं लग्न व्हायचय अजून? मग हा लेख तर तुमच्याचसाठी.
खानदेशी आहात? वर्‍हाडी? माणदेशी? मराठ्वाड्याकडचे? घाटावरचे की कोकणातले? तुम्ही कुठचेही असा, हा लेख खास तुमच्याचसाठीच !
असं काय करताय राव? ‘सुखी संसाराचा मंत्र’ सांगतोय की !!
सोळा आणे सत्य. चुकीचा ठरलो ना, तर सांगाल त्याच्या ढेंगे खालून जायची तयारी आहे आपली.
तर ऐका आणि तुम्हीच ठरवा.

शनिवारी रात्री, यथासांग ‘कार्यक्रम’ झालेला असल्याने, नवरोबा पलंगावर ‘सुशेगात’ होता. रविवारचे सकाळचे दहा झाल्याचे त्याच्या गावीही नव्हते. स्वैपाकघरात बायकोची लगीनघाई. पहाटे पाच वाजताच तिचे ‘मिशन ए पंगतभोजन’ सुरू झालेलं. त्यामुळे नवर्‍याचे अद्याप लोळत पडणं, तिला असह्य होत होतं. दर मिनिटागणिक तिच्या चिडचिडीला फोडणी मिळत होती. गॅसवर मटण रटरटत होतं, आणि तिच्या मनात संताप. ‘रश्या’ला शेवटची उकळी देऊन ती गॅस बंद करते आणि बेडरूमकडे मोर्चा वळवते.
‘’संसार सांभाळण्याचा ठेका जसा माझ्या एकटीचाच आहे. सण-वार, रीत-भात मीच पहायचे. पै-पाहुणे मीच जोडून ठेवायचे. तुम्ही मात्र खुशाल लोळत पडा.’’ बायको एका हाताने लाटणे फिरवत, तावातावाने बोलत होती. रणचंडिकेच्या अवतारातील तिच्या रूपात, जिभेवर मात्र सरस्वती खेळत होती.
आता नवरोबाची झोप, गोधडीच्या घडीतून अलगत कपाटात. घाईने तो बाथरूमचा आश्रय घेतो. शत्रूपक्षपासून बचाव करण्याकरीता, खंदकाचा आसरा घेतल्यागत. आजवरच्या अंनुभवातून बराच गनिमीकावा, नवरोबाने आत्मसात केलेला. शॉवरचं थंडगार पाणी त्याच्या डोक्यावर पडताच त्याच्या ‘डोस्क्यात’ प्रकाश पडतो. बायकोच्या ह्या अवतारामागच्या रहस्याचा, त्याला झटदीशी उलगडा होतो. आपली चूक त्याला उमगते. सपशेल माघार ! त्याचं धोरण ठरतं.
आजचा दिवस, बायकोच्या दृष्टीने खास होता. तिचा मावसभाऊ, बायका-मुलांसह दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित पाहुणा होता. भाऊ तिच्या हातच्या मटणाचा, फार चाहता होता. आणि अशा दिवशी नेमके आपण लोळत पडतो. आपल्यावर तर खास जबाबदारी होती, बाजारातून, ‘राणे डेअरीतून एक किलो आम्रखंड आणून द्यायची. ‘या खुदा, मै निकला गधा’, नवरोबा मनातल्या मनात, स्वतःला शिव्या घालतो. पैशाचं पाकीट, गाडीची किल्ली आणि कापडी पिशवी घेऊन सुमडीत कलटी मारतो.
त्याची ही नेहमीची खेळी, बायको चांगलीच ओळखून असते. तर तिकडे, ‘राणे डेअरी’तून आम्रखंड घेतल्यावरच, नवरोबा सुटकेचा निश्वास सोडतो. बायकोला खुश करण्यासाठी अजून काय करता येईल? तो विचार करतो आणि ‘मघई’ पान घेतो खास चांदीचा वर्ख लावलेलं.
इकडे घरी, बायकोच्या मावसभावाचं, त्याची बायको, मोठी मुलगी आणि धाकट्या मुलाचं आगमन झालेलं. बायको मोठ्या खुशीत त्यांचं स्वागत करते. ख्याली खुशाली होते. थोड्या वेळाने भाऊ नवरोबाची चौकशी करतो. मग काय बायकोची तक्रारीची ‘सीडी’ सुरू होते.
‘’मी आहे म्हणून हा संसार टिकून आहे. दुसरी कोणी असती ना, तर काही खरं नव्हतं.’’ अरे दादा तूच काही तरी समजावून सांग ह्यांना.’’
इतक्यात धापा टाकत नवरोबा हजर.
‘’सालेसाहेब आपले स्वागत असो.’’ आपल्यासाठीच खास आम्रखंड आणायला गेलो होतो. आपल्याच ताईच्या आज्ञेवरून ! आणि आपल्या ताईसाहेबांसाठी खास मघई पान. नवरोबा, मधाळ स्वरात बोलका पोपट होऊन जातो.

नवरोबाची ही ‘गेम चेंजर’ खेळी, ‘काफी असरदार’ साबीत होते. घरातलं वातावरण एकदम बदलून जातं. मावसभावाला नवरोबाच्या कौतुकाचं कोण भरतं येतं.
‘’काही म्हण पण ताई, तू नशिब काढलंस. किती करतात तुझ्यासाठी दाजी !’’
नवरोबा मिश्किल नजरेने बायकोकडे कटाक्ष टाकतो. नवर्‍याच्या झालेल्या अनपेक्षित कौतुकाने तिचा चेहरा पाहण्यासारखा होतो.

तेव्हा, संसार सुखाचा होणं फारसं अवघड नाही. फक्त मौनात केव्हा राहायचं आणि केव्हा बोलका पोपट व्हायचं हे समजायला हवं !
हाच तर आहे, सुखी संसाराचा मंत्र !!

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...