Monday 5 September 2022

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

 


वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी... 

'रम्य ते बालपण किंवा बालपणीचा काळ सुखाचाअसे साधारणतः आयुष्याच्या प्रारंभीकाळाचे वर्णन केले जाते. आपल्या बालपणाविषयी मात्र असे म्हणता येणार नाही, असे अनिल बागुल सांगतात. कठीण काळात एकेकाळी अगदी घरोघरी जाऊन पेपर वाटप करणारा हा मुलगा मग पुढे फॅशनइंटिरिअर डिझायनिंगमधली मानाची समजली जाणारी एक संस्था उभारतो आणि यशस्वीपणे ती पुढेदेखील नेतो. असा हा प्रवास आहे नाशिकच्या अनिल बागुल यांचा...

 लहानपणी पाहिलेल्या खडतर काळात आईने अनिल व त्यांच्या भावांना जिद्दीने आणि कष्टाने वाढवले. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना आयुष्य आपली परीक्षा पाहते. आपण मात्र कायम सकारात्मकतेने पुढे जायचे असते, हे आपण आपल्या आईकडून व रा. स्व. संघाच्या शाखेतील शिस्तीमुळे शिकलो, असे ते आवर्जून सांगतात. कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये प्राथमिक शिक्षण घेणार्‍या अनिल यांनी इयत्ता सातवीत स्कॉलरशिपमिळवली, दहावीत भरघोस यश संपादन केले. पेपर वाटप करताना त्यांना वाचनाची गोडी, तर लागलीच. परंतु, अग्रलेख वाचताना त्यांची वैचारिक घडणदेखील होत गेली. व्हीजेटीआयया संस्थेतून अनिल यांनी टेक्स्टाईल इंजिनिअरिंगपूर्ण केले व पुढे बीकॉमएमबीएदेखील केले. त्यांच्या क्षेत्रात सुरुवातीला रेमंड्स’, ‘हिंदुस्थान स्पिनिंग मिल्स’, ‘नॅशनल रेऑन कॉर्पोरेशनअशा ठिकाणी नोकरी करत त्यांनी अनुभव घेतला.

एका नोकरीच्या निमित्ताने ते नाशिकमध्ये आले आणि पक्के नाशिककर झाले. इथेच पुढे त्यांचा विवाहदेखील झाला. उपजीविकेचे साधन प्राप्त व्हावे म्हणून शिक्षण घेण्याकडे साधारणतः अनेकांचा कल दिसतो. सभोवताली मोठ्या प्रमाणावर अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये वाढताना दिसतात अशा वेळेस आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करत विद्यार्थ्यांसाठी नवीन क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी निर्माण करता यायला हवी, असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. मुलतः असणारी डिझायनिंग’, ‘फॅब्रिक्स’, ‘टेक्स्टाईलची आवड यातून मुहूर्तमेढ रोवली गेली ती डीआयडीटीया फॅशनइंटिरिअर डिझायनिंगया संस्थेची. सकाळी १० ते ६ नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा पण वेगळेपण राखून हे त्यांनी ठाम ठरवले होते. फॅशन डिझायनिंगम्हणजे केवळ टेलरिंगनव्हे, घर-ऑफिसेसमध्ये उत्तम तसेच विचारपूर्वक केलेल्या सजावटीमुळे तिथले वास्तव्य अधिक सुखकर होत कार्यक्षमतेत वाढ होते, हे विचार रुजवण्यासाठी २००६ मध्ये संस्था उभी राहिली. विद्यार्थ्यांसाठी एका नव्या क्षेत्रामध्ये आपल्यातील कलेला वाव देणारी नवीन वाट निर्माण करण्याचा ध्यास आपल्या मनामध्ये होता, असे अनिल सांगतात.

संस्थेची उत्तमरित्या सुरुवात झाली तरीही सातत्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. संस्थेतर्फे होणारे फॅशन शोचे आयोजन, संस्थेतून नोकरी करणारी, स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभारणारी काही उदाहरणे निर्माण झाली तिथून पुढे विद्यार्थ्यांनी संस्थेला आपलेसे केले. लवकरच पुण्या-मुंबईचा दबदबा असणार्‍या क्षेत्रात नाशिकचे नाव नव्याने येऊ लागले. शहराचा विस्तार होत आहे. बांधकाम क्षेत्रातही नवनवे प्रोजेक्ट्स सातत्याने उभे राहत आहेत. इंटिरिअरची आवश्यकता पूर्वीपेक्षा झपाट्याने वाढू लागली. अशावेळी डीआयडीटीने कायमच बदल स्वीकारण्याची तयारी ठेवलेली असल्याचे ते सांगतात. आज नाशिकमध्ये मालिकांचे चित्रीकरण होऊ लागलेले आहे. अशावेळी कॉस्च्युम डिझायनरहा एक महत्त्वाचा घटक ठरतो.

‘’स्पर्धा वाढती असली तरी महत्त्वाची असते. त्यातूनच आपण नवनवीन प्रयोग करत व स्वीकारत असतो. ध्येयाप्रती सच्चा निष्ठेने आणि कठोर परिश्रमांनी कालसुसंगत वर्तन केल्यास यशप्राप्ती सुकर होते,” असे अनिल सांगतात. आपल्या आवडीनिवडी व छंदांनादेखील आपणच सजगपणे वेळ द्यायचा असतो, असे त्यांना वाटते. लहानपणी वृत्तपत्र वाचनाबरोबरीनेच वाचनालयात जाऊनही अनिल यांचे वाचन सुरू होते. त्यातूनच आपण लेखनही करावे, अशी उर्मी दाटून येऊ लागली. आयुष्याची, करिअरची सुरुवात, मुंबईत नोकरी निमित्ताने होणारा प्रवास यातून लेखनाची आवड पुढे जाऊ शकली नसली तरी आज मात्र त्यांचा स्वतःचा ब्लॉगआहे. वृत्तपत्रांमधून सदर लेखन, ‘सायबरसुरक्षा या विषयावरील लेखन, तसेच त्यांचे एक पुस्तकदेखील प्रकाशित झालेले आहे.

विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. संस्थेची उभारणी एक वेळ सोपी पण दर्जा राखणे, नवनवीन शिक्षण पद्धतींचा अवलंब करणे, नवनवीन कोर्सेसची आखणी करणे अनिल यांना महत्त्वाचे वाटते. आयुष्याचे जरदारी वस्त्र विणताना सुखदुःखाच्याधाग्यांची सांगड होणारच असली तरी कलाकुसर आपल्या हातात असते, असा विश्वास अनिल बागुल यांना वाटतो.

 

 ------- प्रवर देशपांडे 

#तन्वीअमित 

सुंदरी गार्डन- हळुवार प्रेमाची अलवार गोष्ट

#SUNDARIGARDEN


मध्य केरळमधील कुठलंसं गाव. उंचावर वसलेलं. छोट्या छोट्या टेकड्यांनी सजलेलं. नागमोडी रस्त्यानी नटलेलं. टेकड्यांनी हिरव्याशार दुलईचे पांघरूण लपेटलेलं. गावात छोटी छोटी बंगलीवजा घरे. असाच एक थोडासा मोठा पण टुमदार बंगला. बंगल्यासमोर अंगण. अंगणात हिरवळ अन सभोवती पानाफुलांची दरवळ. बगिच्याच्या पलीकडे नक्षीदार गेट. गेटवर नावाची लाकडी पाटी. ऐटीत बसवलेली. पाटीवर नक्षीदार अक्षरे - सुंदरी गार्डन !

हे नाव बंगल्याचं आणि ह्या मल्याळम सिनेमाचं देखील !!

सुंदरी, तिशीची. घटस्फोटित. गर्भाशयाच्या कॅन्सरमधून बरी होऊन नव्याने आयुष्य जगणारी. ऐन तारुण्यात आलेल्या ह्या कटू अनुभवांमुळे तिने आपली एक जगण्याची चौकट आखून घेतलेली. त्या बाहेर न पडण्याची काळजी घेत तिचं रुटीन आयुष्य मजेत जगायला आता ती शिकलीय. पेशाने लायब्ररीयन. गावातल्याच एका मोठ्या शाळेच्या लायब्ररीची. सुंदरी, शाळेच्या इतर स्टाफ पासून काहीशी अलिप्त राहणारी. पण हुशार विद्यार्थ्यांच्या जवळची. आणि कामात चोख.

तुम्ही पुस्तकाचं फक्त नाव सांगायचा अवकाश. पुढच्या मिनिटाला ती सांगणार .... उजवीकडून सातवे कपाट, वरून तिसरा कप्पा अन डावीकडून पाचवे पुस्तक. आणि तुम्ही तेथून ते पुस्तक काढतांना अचंबित झालेले.

शाळेत नवीन शिक्षक रुजू होतो. इंग्रजी विषयकरीता. तरुण आणि देखणा. तो अविवाहित असणार हे तुम्ही ओळखलं असणारच. सुंदरला तो आवडू लागलाय, कदाचित ती त्याच्या प्रेमात आहे. पण 'त्या' चौकटीचा ट्यबूतिला पुढे जाऊ देत नाही.

 लेखा हि दुसरी टीचर. गोरी गोमटी देखणी तरुणी. तीही अविवाहित. व्हिक्टर आणि तिचं बऱ्यापैकी सूत जुळत आलेलं. शाळेच्या ट्रिपच्या पहिल्या दिवशी सुंदरीने ते जवळून पाहिलेलं.

त्यामुळे सुंदरीची घालमेल होतेय. त्या रात्री ती वैफल्याने व्होडका पित बसते. तिथे नेमका व्हिक्टर येतो. मद्याचा अंमल झाला असल्याने सुंदरा किंचित सैलावते. तिने आखलेली चौकट किंचितशी किलकिली होते. व्हिक्टरला काहीसं आश्यर्य वाटणारं, पण बहुधा सुखावणारं.

काही दिवसांनी शाळेतल्या लायब्ररीत एका हुशार मुलीवर एक प्रसंग ओढवतो. त्या प्रसंगातलं सुंदरीचं कणखर भूमिका घेणं. आउट ऑफ द वे जाऊन त्या मुलीला मदत करणं, व्हिक्टरला भावतं. लक्ष्मीकडून तो सुंदरीकडे हळूहळू जाऊ लागतो.

 अशी हि हळुवार प्रेमाची अलवार गोष्ट. सरळपणे आपल्यासमोर मांडली जाते. कुठेही आडवळण नाहीत, मेलोड्रामा, मादकता, आक्रसताळेपणा नाही. आयटम सॉंग नाही. खलनायक वा खलनायिका देखील नाही. आणि हो मुख्य म्हणजे प्रेमकथा असली तरी नृत्य नाट्य नाही. मात्र हळुवार संगीत असलेली मल्याळमटच गाणी आहेत.

 दिग्दर्शक चार्ली डेव्हीसन ने आपले काम चोख बजावलंय. अपर्णा बालमुद्री आणि नीरज माधव हे सुंदरी आणि व्हिक्टर ह्या प्रमुख भूमिका अक्षरशः जगलेत. 'सोनी लिव्ह' वर रिलीज झालेला सिनेमा नक्की पाहावा असाच आहे.

---- अनिल सुमति बागुल  

Sunday 15 August 2021

बॉलिवूडच्या चष्म्यातून भारतीय स्वातंत्र व देशभक्ती

 



नाशिकच्या श्रीयुत धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके ह्यांनी १९१३ सालीराजा हरिश्चंद्र’, हा मूकपट प्रदर्शित केला. हिंदी चित्रपट सृष्टीचा त्यांनी पाया घातला. स्वातंत्रपूर्व काळातील हा कालखंड. सुरवातीच्या काळात हिंदू संस्कृतीतील पौराणिक कथांवर आधारित चित्रपट तयार होऊ लागले. चित्रपट सृष्टी अजून बाल्यावस्थेतच होती. त्यानंतर मग चित्रपटाचे विषय हे सामाजिक होऊ लागले.डॉ. कोटणीस कि अमर कहाणी’, हा १९४६ साली प्रसिद्ध झालेला चित्रपट हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण. 

 

भारतीय स्वातंत्र्याचे स्वप्न अद्याप पूर्ण व्हायचे होते आणि सिनेसृष्टी अजून कुठे रांगतच होती. साहजिकच भारतीय स्वातंत्र, हा तिचा विषय अजून व्हायचा होता. पण १९३१ साली प्रदर्शित झालेल्याआलम आराचित्रपटाने, तिला आपला आवाज जरूर दिला होता.

 

१९६२ साल उजाडले. चेतन आनंदचा 'हकीकत' प्रदर्शित झाला. १९६२ च्या भारत-चीन युद्धावर आधारीत कथानक. 'युध्दस्य कथा रम्या', म्हटल्याप्रमाणे लोकांना कथानक भावलं. चित्रपट हिट झाला. हिंदी चित्रपट सृष्टीनेदेशभक्तीलसीचा पहिला डोस घेतला. 

 

आता बॉलीवूडला हिट चित्रपटाचा-‘देशभक्ती’, हा एक हमखास फॉर्म्युला सापडला होता. मग 'शहीद' ह्या फिल्मच्या रूपाने बॉलिवूडने दुसरा डोस घेतला.मनोजकुमार’, नावाचा देशभक्ती कोळून प्यालेला कलाकार त्यामुळे गवसला. त्याने मग 'क्रांती', घडवली आणि सकल चित्रपट सृष्टीवर जणू 'उपकार' केले. त्याचबरोबर त्याने 'रोटी कापड और मकान' आणि 'पुरब और पश्चिम' आपल्याला बघायला लावलेच होते.

 

मग कधीतरी आला 'सात हिंदुस्थानी'. फिल्म फारशी हिट नाही ठरली पण ... हिट फिल्म्स देणाऱ्या शहेनशाला मात्र तिने पेश केलं. महानायक अमिताभ बच्चनने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं.   

 

१९७३ साली प्रदर्शित झालेला 'हिंदुस्थान कि कसम, म्हणजे चेतन आनंदचा  बुस्टर डोस. भारतीय सैन्याच्या लढायांवर आधारित त्यातलं कथानक. पुढेगदर’, ‘बॉर्डर’, ‘एलओसी’, ‘मिशन काश्मीर’, ‘लक्ष्य’, ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईकतेएयर लिफ्ट’, ह्या आजच्या काळातील चित्रपटांत देखील असाच काहीसा कथानकाचा फॉर्म्युला वापरला आहे.

 

मग मग बॉलीवूडने फॉर्म्युला किंचितसा बदलला. देशभक्तीत 'सामाजिक न्यायाचा' अधिकचा मसाला मिसळला. 'रंग दे बसंती' हे आमिरखान अभिनित, तर 'स्वदेश' सारखा, शाहरुख अभिनित चित्रपट ह्या चष्म्यातून हिट ठरले. 'सरफरोश' आणि 'रोझा' सारख्या चित्रपटांनी भारतीय सीमा आणि त्यानुषंगाने घुसखोरी, ह्या आधारे देशभक्तीचं सुंदर प्रदर्शन घडवलं.

 

देशप्रेम आणि वैयक्तिक प्रेम, हा आणखी एक आगळा वेगळा पैलू देखील बॉलीवूडने पेश केला. द ग्रेट पंचमदा ह्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट, '१९४२ लव्ह स्टोरी'. हे एकच उदाहरण त्याकरीता पुरेसं ठरावं. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. त्यात कथानकापेक्षाही गाण्यांचा वाटा मोठा होता, हि बाब अलाहिदा.

 

आता बॉलीवूडने देशभक्तीचा कॅनव्हास आणखी विस्ताराला. हॉलिवूडमधील जेम्स बॉण्ड प्रमाणेच, पण भारतीयत्वाची डूब असणारे सिक्रेट एजंट्स पडद्यावर उतरवले. 'रॉ', 'बेबी', 'हॉलिडे', 'मद्रास कॅफे', हे आजच्या जमान्यातले चित्रपट त्यावरच बेतलेले. खिलाडी 'अक्षय कुमार', अश्या भूमिकांत एकदम फिट्ट बसला.

 

हळूहळू विषयाची व्याप्ती वाढत गेली. भारतीय स्वातंत्रलढ्यातल्या क्रांतिवीरांनी ७० एम एम चा पडदा, आता व्यापायाला सुरवात केली. 'मंगल पांडे', ‘द लिजंड भगत सिंग, ‘स्वातंत्रवीर सावरकर, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस-फॉरगॉटन हिरो’, ते काल परवाचा, कंगनाचा मनकर्णिका’, हा झाशीच्या राणीवरचा चित्रपट, ही काही वानगीदाखल उदाहरणे.

 

आता देशभक्तीकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघायचे, बॉलीवूडने ठरवले. आणि मग 'मिशन मंगल', 'परमाणू -द स्टोरी ऑफ पोखरण' पडद्यावर सादर झाले. नव्या जमान्याचा नव्या प्रेक्षकांनीही ते उचलून धरले आणि आपल्याही देशभक्तीवर शिकामोर्तब केले.  

 

आता किंचितसं विषयांतर, पण इथं आवश्यक असंच. तर नुकत्याच संपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. बऱ्याच काळानंतर सुवर्णालाही गवसणी घातली. पण त्या पूर्वीच्या काळाकडे आपण पाहुयात. ऑलिम्पिकमधला पदकांचा दुष्काळ पाचवीला पुजलेला. राष्ट्रीय खेळ हॉकीचा सुवर्णकाळ आता धूसर दिसायला लागलेला. सुवर्ण पदकाची सोनेरी झळाळी, ब्रॉन्झच्या रंगापेक्षाही काळी पडलेली. क्रिकेटच्या वेडापायी भारतीयांनी, कुस्तीची दंगल विसरल्यात जमा झालेली. मुष्टीयुद्ध’, हा खेळ देखील असाच दुर्लक्षिलेला.  तर बॅडमिंटनच्या खेळातले फुल कोमेजून गेलेलं.

 

बॉलीवूडने मात्र ह्याकडे थोडं वेगळ्या अँगलने बघितले पाहिजे, असे ठरवलं असावं. आशुतोष गोवारीकरने, 'लगान'ची बोली लावली आणि देशभक्ती आणि खेळ हातात हात घालून पडदा गाजवू लागले. पण ह्यात गंमतीचा भाग हा कि सव्वाशे करोड भारतीयांना वेड लावलेल्या क्रिकेट खेळावरचा, 'लगान' आणि 'एम एस धोनी'चा अपवाद वगळता एकही हिट चित्रपट नाही.

 

ह्या उलट ... लगान वाल्या आमिर खानने मग दंगल आणला, फोगट भगिनींच्या कुस्तीवरचा. त्यापूर्वी 'चक दे इंडिया' म्हणत आलेला शाहरुखचा, हॉकीवरचा. ते ही महिला हॉकीवरचा चित्रपट. ह्या चित्रपटाने पडदा गाजवला. ह्यात खान बंधुतला तिसरा खान कसा मागे राहणार? त्याने आणला सुलतान ! मग 'भाग मिल्खा भाग,' 'मेरी कोम', 'सायना' अशी वेगवेगळ्या खेळांवरच्या चित्रपटांची मालिका सुरु झाली. जणू भारतीयांनी क्रिकेट विसरायला सुरवात केली. आणि आत्ताचं टोकियो ऑलिम्पिकच सूप वाजलेलं. भारतीय पथकाने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार ब्रॉन्झ पदकांची लयलुट केलेली. काही संबंध आहे? विचार नक्की व्हायला हवा.

 

जाता जाता प्रेमाची सूचना. उद्या आपण ७५ वा स्वात्यंत्रदिन साजरा करतो आहोत. नाक्यानाक्यावर, रेडिओ-टीव्हीवर लागलेलं, 'मेरे देश के धरती सोना उगले उगले हिरे मोती, हे 'उपकार' चित्रपटातलं गाणं नक्की ऐकायला हवं. मनोजकुमार इतकी नाही, पण किंचितशी आपलीही देशभक्ती आपण दाखवायला नको का?

 

अनिल सुमति बागुल


Tuesday 11 May 2021

दम लगाके हैशा!

 



 

'झिरो फिगर'ची क्रेझ आता राहिली नाहीये. बघा आजूबाजूला...

'सुंदरा मनामध्ये भरली'ची जाडू लतिका आणि 'येऊ कशी तशी मी नांदायला मधील गोडु स्वीटू.

क्रेझ आता ह्यांची आहे. खोटं सांगतो कि काय? जनाब ‘करीना’ आता दोन मुलांची आई झालीय !

हे घडतंय २०२१ मध्ये!

 

‘पण 'दम लगाके हैशा!' आला २०१५ मध्ये!!

तेव्हा अश्या जाडूल्या पण गोडुल्या हिरोईनला घेऊन चित्रपट काढायचा म्हणजे मोठं धाडसाचंच काम! ‘यशराज’च मोठं बॅनर असलं की असा जुगार सहज खेळाला जाऊ शकतो.

 

तर हि कथा आहे प्रेम प्रकाश तिवारी आणि संध्या वर्मा ह्या जोडप्याची. घडतेय हरिद्वारमध्ये. कथेचा काळ आहे ९० च्या दशकाचा. जेव्हा ऑडिओ आणि व्हिडीओ कॅसेटचा जमाना होता.  आणि नाकात गाणारा कुमार शानू जोरात होता. 

 

तर आपला 'प्रेम' आहे, तिवारी कुटुंबाचा कुलदीपक. पढाईत जेमतेम. ती कशीबशी पूर्ण केल्यावर संभाळतोय बापाचा ऑडियो कॅसेटचा धंदा. गिऱ्हाइकांच्या मागणीप्रमाणे त्यानां कॅसेट मध्ये गाणी भरून देण्याचा हा व्यवसाय.

 

इथे आपण नॉस्टॅल्जीक होतो. आपणही अशी गाणी भरून घेतलेली असतात. ती ६० ची, ९० ची कॅसेट. कॅसेटची A साईड, B साईड. ती कॅसेट अडकणं. त्यातली ती टेप बाहेर येणं. तुम्हाला नक्की इथं आठवणार!

 

पण जमाना बदलतो आहे जनाब. ‘कॅसेटची जागा, आता ‘सीडीने घेतली आहे. तिवारी बाप बेटे बदल स्विकारायला अद्याप तयार नाही आहेत. पण ते महत्वाचे नाही. तर महत्वाचे आहे ‘प्रेम की शादी’.

 

जेमतेम शिकलेल्या आणि टुकूटुकू धंदा असणाऱ्या आपल्या कुलदीपकाला कुणी शहजादी मिळणार नाही ह्याची बापाला पूर्ण कल्पना आहे. काही तडजोड करायची त्याची मानसिकता झालेली आहे. हीच बाब तो सगळ्या तिवारी कुटुंबाच्या गळी उतरवतो आणि सगळे निघतात ‘प्रेम’ला दुल्हन बघायला. हा बघण्याचा कार्यक्रम असतो हरिद्वार मधल्याच वर्मा कुटुंबात.

 

वर्मा कुटुंब, सुशिक्षित आणि सधन. आपली दुल्हन ‘संध्या’ चांगली शिकलेली आणि शिक्षिका म्हणून नोकरी करणारी. दिसायला सुंदर, गोड, किंचितशी फटकळ पण चांगलीच वजनदार! पण ह्यामुळेच वर्मा कुटुंबाचीही तयारी असते तडजोडीची. पोरीला उजवायची फिकीर जी त्यांना असते.

 

मग काय ठरतं सगळं रितसर. घाईगडबडीत. पैसे वाचवण्यासाठी शादी होते, सामुदायिक विवाह सोहळ्यात. पण ह्या सगळ्यात 'प्रेम'चा कुणी विचारच केलेला नसतो नीटसा. त्यामुळे तो आहे खट्टू. त्यात ‘सुहागरात’ला बायकोचं अगडबंब रूप पाहून तो हबकतो, नाराज होतो, निराश होतो, तिच्यापासून दूर होतो.

 

आपली व्यथा तो उघड करतो शाखाप्रमुखाकडे, संध्याकाळच्या शाखेत! संघाची शाखा, त्यांचा गणवेश, त्यांची मानसिकता, अगदी हुबेहूब. कुठेही नौटंकी नाही. आपल्याला भास व्हावा खरंच आपण संघाच्या शाखेत आहोत कि काय! शाखाप्रमुख आणि इतर त्याला सबुरीचा, तडजोडीचा, परिस्थिती स्विकारण्याचा स्वाभाविक सल्ला देतात. ‘प्रेम’ला तो सल्ला काही रुचत नाही.

 

माझा कुणीच विचार करत नाही ही त्याची घट्ट भावना. संध्या शिकलेली आहे, त्याचा रुबाब करत्येय. आपण फारसं शिकलेलो नाही हा त्याला न्यूनगंड. तर, आपल्या नवऱ्याने, आहे ती परिस्थिती समजून घ्यावी, आपला मनापासून स्वीकार करावा. हि संध्याची भावना. तिला कमी शिकलेला, फारसं कर्तृत्व नसलेला असला, तरी नवरा हवा आहे. संसार करायचा आहे.

 

सुहागरातला काहीच न घडलेलं पाहून वर्मा आणि तिवारी कुटुंबीय परेशान. सगळ्याचं मत 'प्रेम'ने संध्याचा स्वीकार करावा. संध्याची आई फोनवरून तिला सल्ला देते ... तसल्या व्हिडीओ कॅसेट आणून रात्री एकत्र बघण्याचा! ती तसं करूनही पहाते. आणखी काय काय करते. हे सगळं वाचण्यापेक्षा पडद्यावर पहाणं अधिक रंजक!

 

पण कुठलाच ‘नुसका लागू पडत नाही. संसारात, हळूहळू भांडी आपटायला लागतात. धुसफूस वाढू लागते. एक दिवस संध्या बॅग भरते आणि माहेर गाठते. प्रकरण थेट कोर्टात, घटस्फोटाकरीता. पेटून उठलेल्या संध्याचा, हा अट्टाहास! तर दोघांच्या घरचे मात्र हतबल. निकाल लागतो. दोघांनी सहा महिने एकत्र राहायचं.  मग मिळणार घटस्फोट हवा असलाच तर!

 

इथं येतो कहानी में ट्विस्ट!!

आता एकत्र राहायचंच आहे, तर न भांडता प्रेमाने राहूयात की, संध्या विचार मांडते. प्रेम होकारा भरतो नाइलाज असल्या सारखा. हळूहळू कथेला, प्रीतीचे रंग भरले जातात. दोघांच्या सहवास फुलू लागतो हळुवारपणे.  प्रेमला तो सहवास हवाहवासाही वाटू लागतो, न कळत. तरीही तो अव्यक्त. संध्या मात्र ते जाणून आहे.

मोह मोह के धागे हम्म ये मोह मोह के धागे ह्या गाण्याने इथं छान वातावरण निर्मिती होते. न कळत आपलाही धागा गुंतत जातो दोघांच्या प्रेमात. आपण प्रेमात पडतो कथेच्या!

प्रेम झालेल्या आयुष्यमान खुराणाचीच खरीखुरी कथा असल्यासारखं, तो इथं वावरलाय. अन संध्या झालेली भूमी पेडणेकरचा अभिनय अगदी सहज आणि सुखद वाटतोय. विशेष हे की ह्या भूमिकेबद्दल तर तिला फिल्मफेअर ऑवार्ड मिळालंय!

 

चित्रपटाचा क्लायमॅक्स? 'दम लगाके हैशा', नावाचा इथं काय संबंध?

ऊ sss हू ..

अमेझॉन प्राईमवर नक्की पहा. आणि तुम्हीच सांगा मला. पाहिला असेल तर, परत एकदा पहा. एक तास पन्नास मिनिटे वाया नाही जाणार! ये आपुन की गॅरेंटी!!

Friday 30 April 2021

कोरोना भातुकलीतला

 

bhatukali


खोलीतल्या अंधारी कोपऱ्यात पडले होते मी, पाय दुडपून. किती तास झाले असतील? मी विचार करू लागले. तास काय, कितीतरी दिवस झाले असतील ... कितीतरी वर्ष... बहुदा.

खोलीतला काळामिट्ट अंधार माझ्या मनांत गच्च दाटून आला होता. विचार करण्याची शक्ती गोठून गेली होती. जखमेवरचं रक्त गोठल्यागत.

खिडकीच्या पलीकडून sss आवाज येत होता. बहुधा १०८ क्रमांकाची अँब्युलन्स असावी ती. दर अर्ध्या तासाने येत असतो हा आवाज. भीतीने अंगावर शहारा आला. घाईघाईने मी खिडकीची काच ओढायला गेले. बंदच होती ती. तरीही आवाज आंत कसा येतो मग? मी माझ्यावरच चिडले. का, माझ्या मनांत घर करून बसलाय हा अँब्युलन्सचा आवाज? कसलीतरी गूढ अनामिक भीती तयार करणारा?

थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले

कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले

कुठून तरी स्वर कानावर आले sss

कोण बरं गात असेल?

शब्द तर ओळखीचे वाटतायंत!

अचानक गाणं थांबलं.

दोन मिनिटांनी परत सुरु झालं.

 स्वप्न पाखरांचा ठाव तुझ्या माझ्या अंगणात

कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात

 थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले

कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले

अरे हे तर माझ्या खूप आवडीचं गाणं. माझ्या खूप जवळचं. हे तर वादळवाट सिरियलचं टायटल सॉंग! मी पटदिशी भानावर येते. अरे हि तर माझ्या मोबाईलची कॉलर ट्यून!!

माझे मोबाईलकडे लक्ष जाते. बिचारा बेडच्या साईड टेबलवर पडून होता कधीचाच. मी सावकाश हात पुढे करते. किती जड आहे हा हँडसेट? आधीपासूनच आहे का असा जड? का आत्ताच मला जाणवतोय?  

मी कॉल घेते. माझ्या नवऱ्याचाच कॉल.

अगं मनिषा दरवाजा उघड ना. केंव्हाचा ठोठावतोय मी. चहा तयार आहे. थर्मास ठेवलाय बघ दाराजवळ.

मी भानावर येते. मनातले लाईट्स पेटतात पट्कन. सकाळपासूनच, तर आहे मी इथं. आमच्याच बेडरूममध्ये. होम क्वारंटाईन! पाचच तर तास झालेत. कसले किती दिवस? किती वर्ष? माझंच मला खिन्न हसू येतं. ह्या पाच तासांत तर माझ्या मनाने किती किती झोके घेतले. किती किती हिंदोळे अनुभवले. आपण इतका का निगेटिव्ह विचार केला?

माझी कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा रिपोर्ट आला म्हणून? इतके काय घाबरतोय आपण? मृत्यूची दहशत दस्तक देत असल्यासारखे! आजूबाजूला घडणाऱ्या मृत्यूंच्या थैमानाचे तांडव मला जाणवतेय का? परावाचं ते ऑक्सिजन गळतीचं प्रकरण. चोवीस जण गेले म्हणतात त्यात. ‘रेमडेसिव्हर’ औषध मिळालं नाही म्हणून कित्येक जण हॉस्पिटल्सच्या बेडवर दम तोडतायत. हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा म्हणून कित्येकांची वणवण होतेय. तर बेड मिळालाय, रेमडेसिव्हर औषधही मिळालंय, पण ऑक्सिजन नाही मिळत म्हणून कित्येकांची तडफड होतेय.

पण ... पण मी का उजळणी करतेय ह्या सगळ्याची? मरणाचे सोहळे दाराशी असल्यागत. फक्त कोव्हीड टेस्टच तर पॉझिटिव्ह आलीय. बाकी सगळं तर,.. तिथल्या तिथेच तर आहे! आपला नवरा आहे आपल्या पाठीशी भक्कमपणे. नातेवाईक, शेजारी पाजारी आहेत जवळ. ते काही नाही आपल्याला असं हताश होता काम नये.   

मी सावकाश दरवाजा उघडते. स्टीलचा थर्मास दिसतोय.

अगं बाई हा थर्मास कुठून सापडला ह्यांना? सात वर्षांपूर्वी, घेतला होता आपण. काश्मिर टूरला गेलो होतो तेव्हा! बरा सापडला ह्यांना. तसे हे, काही काही म्हणून विसरत नाहीत. आतल्या आत सुखद आठवणींचं मोरपीस फिरतं.

मी पुरती भानावर आलीय का आता? हलकेच चहाचा कप भरते मी. अगं बाई, माझा आवडता कप ठेवलाय ह्यांनी. गोल्डन नक्षीची बॉर्डर असलेला, मिल्की व्हाईट! कधी कधी ना, कित्ती काळजी करतात माझी!! एरवी सतत चिडचिड सुरु असते, थोडं मनाविरुद्ध झालं की. काही कळत नाही बाई ह्यांचं.  

चहाचा कप घेऊन मी खिडकीपाशी येते. खिडकीचा पडदा हलकेच बाजूला करते.

सोसायटीच्या पार्किंग मध्ये किलबिलाट ऐकू येतोय. चहाच घुटका घेत घेत मी लक्ष देऊन ऐकू लागतेय.

''ए मीनल नेहमीची भातुकली नै काही! आपल्याला किनई, आज कोरोनाची भातुकली खेळायचीय!!'' सई

''अगं सई sss कोरोनाची भातुकली म्हणजे गं काय?'' मीनल

''अगं हे बघ ही गाथा, समजूया हिला कोरोना झालाय!'' सई

''चालेल मला कोरोना झाला तरी. आता काही होत नाही त्याने, डॉक्टरकाकांनी सांगितलेलं ऐकलं तर.'' गाथा   

''ए मग आपण तिला लांब ठेवुयात, माझ्या पप्पांना ठेवलं होतं तसं!'' सई

''हो हो गाथा ते काय असतं तसं होम कोरण्ट असणार.'' मीनल

''अगं सई त्याला होम क्वारंटाईन म्हणतात. माझ्या आईच्या तोंडून मी ऐकलंय गं.'' गाथा

''बरं बरं गाथा, तू ते होम क्वारंटाईन. तुझ्या बेडरूमपाशी आम्ही तुझं जेवण ठेवणार. तू कुण्णाला कुण्णाला शिवायचं नाही. कळलं का? नाहीतर कोरोना स्प्रेड होतो.'' मीनल

चहाचे घुटके घेत घेत मी दंग झाले होते त्यांच्या खेळण्यात. 

 इतक्यात अँब्युलन्सचा आवाज येतो. तिच ती! १०८ क्रमांकाची!! आवाज आता आणखी तीव्र होतोय. मी दचकतेय. घाबरतेय. आता अँब्युलन्स सोसायटीच्या गेटमधून आत येऊ लागलीय. कुणाकडे आली असावी अँब्युलन्स? नक्की कोण गेलं असेल? त्या 'बी विंग' मधल्या सुमनच्या सासूबाईं तर नाही? ना sss ही. गेल्याच आठवड्यात त्यांना ऍडमिट केलं होत. सिटी हॉस्पिटलला. आय सी यू मध्ये होत्या म्हणे त्या. त्या तर नसतील? अंगाला नुसता कंप सुटलाय. दरदरून घाम पण येतोय. अरे बापरे घशाला कोरड पण पडलीय. मला श्वास घ्यायला त्रास होतोय का? ऑक्सिमीटर कुठंय? पहिले ऑक्सिजन लेव्हल चेक करूयात. हं ठीक आहे.

माझ्या मनाचा खेळ सुरु झाला. हल्ली ना असंच होतं. मन चांगला विचार करतच नाही. मी तरी काय करणार? आजूबाजूला जे घडतंय, तेच तर आपलं मन टिपतं. टिपकागदासारखं!  ह्या टीव्हीवर, पेपरात ज्या बातम्या सततच्या येतायंत त्यांनीच तर पसरलीय ही सगळी निगेटिव्हिटी!!  हे हे सगळे टीव्ही चॅनेल्स बंद केले पाहिजेत. त्यापेक्षा आपणच नाही बघू, त्या बातम्या फितम्या.

मनात विचारांचे चक्र भिरभिरतंय? का आपल्याया गरगरतंय? छे पहिले मोकळा श्वास घेवूयात. अचानक मी भानावर येते, खालच्या पोरींच्या गलक्याने.

हे काय? त्या अँब्युलन्स मधून कोण उतरतंय?

''ए पुष्करची आज्जी आली, पुष्करची आज्जी आली.'' सई

''ए माझी आज्जी बरी झाली, माझी आज्जी बरी झाली.'' पुष्कर

''ए पुष्कर, तू हि ये आता आमच्यात खेळायला.'' गाथा

''ए पण सई, आता कोरोनाची भातुकली नाही खेळायची.'' मीनल

''मग काय खेळायचं?'' गाथा

''ए पण आता डॉक्टर डॉक्टर खेळुयात.'' मीनल 

''चालेल, आपण कोव्हीड सेंटर चालवूयात, माझी आज्जी ऍडमिट होती तसं.'' पुष्कर 

''ए अगं मी ऐकलंय कोव्हीड सेंटरमध्ये ऑक्सिजनचे बेड्स नसतात. आणि हॉस्पिटल्सना ऑक्सिजन सिलेंडर्स नाही मिळत. पुष्कर खरं आहे का?'' गाथा

''अगं पण ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स का लागतात? माझी सायन्सची टीचर सांगायची की झाडांमधून ऑक्सिजन मिळतो. मग आपण भरपूर झाडं लावली पाहिजेत, आपल्या सोसायटीच्या अंगणात.'' सई

''आपण त्यापेक्षा व्हॅक्सिनेशन सेंटर चालवूयात का? माझ्या डॅडनी आजच व्हॅक्सिनचं इंजेक्शन घेतलंय. ते म्हणत होते, सगळ्यांनी घेतलं तर कोरोना फिरोना जाईल कुठल्या कुठे पळून.'' मीनल

''त्या चायना फियनाला देऊ पाठवून!'' पुष्कर

सगळे खो खो हसतात, एकमेकांना टाळी देत.

खेळ त्या वेळापुरता संपतो. मुले पांगतात. आपापल्या घरी जातात. माझ्याही मनातले निगेटिव्ह विचार पांगलेले असतात. मी उत्साहाने माझ्या घरात परत येते. आता न्यू नॉर्मल व्हायचं. फ्रेश जगायचं. मी मनोमन ठरवते. उत्साहाने मी ह्यांना फोन करते.

''अहो व्हॅक्सिनसाठी पहिले तुमचा नंबर लावा आणि मी बरी झाले कि माझा पण. त्या कोरोनाला चायना फियनाला पाठवून द्यायचंय आपल्याला.''

anilbagul1968@gmail.com


Monday 26 April 2021

अंगेटी


 

angeeti

तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात, एक 'फिरदोस' असतेच असते. आणि बहुधा प्रत्येक फिरदोसच्या मनात देखील. आपल्या मनातली 'फिरदोस' नाही गवसली... तर देतो आपण सोडून तिला. अन कालांतराने विसरूनही जातो. राख होते आठवणींची त्या.

 

पण त्या फिरदोसच्या मनातल्या फिरदोसचं काय?

ती शोध घेतंच राहते. कारण तिच्या मनात, तोवर त्या शोधाची आग तयार झालेली असते.

तीच ही अंगेटी - विस्तव, जाळ, फायर वा शेकोटी

 

जगायचं कशासाठी? हे जितकं महत्वाचं, तितकंच तर महत्वाचं असतं, ते जगायचं कसं?

कविवर्य मंगेश पाडगावर तर छान सांगून गेलेत... 

सांगा कस जगायचं?

कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत

तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?

 

आपल्या ह्या कथेतल्या ‘फिरदोस’ला देखील कण्हत कण्हत जगायचं नाहीये. तिला आनंदात गाणं गात गात जगायचंय. हि फिरदोस राहतेय जम्मूतल्या कुठल्याश्या खेड्यात. एका मुस्लिम कुटुंबात. नवरा, सासरा आणि लहानग्या मुलीसह.

 

कथा घडतेय नव्वदीच्या दशकात. स्त्री स्वातंत्र्याचा डंका तितकासा जोरात वाजलेला नाहीये. आणि मुस्लिम कुटुंबातल्या स्त्रीचा बुरखा तर किंचितही बाजूला झालेला नाहीये. त्यात फिरदोसचा सासरा, मौलवी आणि गावच्या मशिदीच्या कमिटीचा मेम्बर. स्वाभाविकच पुराणमतवादी. स्त्री स्वातंत्र म्हणजे स्वैराचार ह्याची पक्की खूणगाठ बाळगणारा. त्यामुळे साधा टिव्ही देखील आणू देत नाहीये तो घरात.

 

तर नवरा त्याच्या अबूच्या शब्दाबाहेर जाण्याची जुर्रत नसलेला. साहजिकच फिरदोसची कुतरओढ होतेय. तिला आस लागली आहे, बाहेरच्या मोकळ्या आकाशाची. त्या आकाशात तिला मुक्त विहार करायचाय. तिच्या नवऱ्याला, हमीदला मात्र, तिचे हे विचार बालिश वाटत असतात.

 

अशातच घरी येतो शाहिद. हमीदचा जुना मित्र. पंजाब प्रांतात ठेकेदार असणारा. बऱ्यापैकी श्रीमंत शाहिद, थोडंफार जग पाहिलेला. त्यामुळे विचाराने परीपक्व. जीवन जगण्याची कला अवगत असलेला.

सुरवातीला फ़िरदोसला तो तितकासा आवडत नाही. विशेषतः तिला अर्धवस्त्र पाहिल्यावर त्याचं अंगचटीला येणं, ह्याचा तिला तिटकारा आलेला. त्याचे तिला सततचे येणारे फोन, तिला नकोसे वाटणारे. त्याला विरोध करता करता, तिला त्याच्या बरोबर फिरण्याची उर्मी होते. हि इच्छा वासनेचा लवलेश नसणारी. स्त्री स्वातंत्रतेच्या शोधातली. मुक्ततेचा मार्ग शोधू पाहणारी.

 

अखेर एकदाचा ती मनाचा हिय्या करते. ती त्याच्याबरोबर घराबाहेर पडते. त्याच्या गाडीतून फिरून येते. मोकळा श्वास घेते. मनमोकळं खळखळून हसून घेते.  एवढंच नाही तर त्याच्याबरोबर सिगारेटचा कश देखील अनुभवते. 

 

तिच्या वागण्यातला बदल हमीदने टिपलेला. अबूच्या दबावाखाली त्याची होणारी घुसमट. त्यातून त्याला आलेली असह्यता. हि त्याचीही एक बाजू. तो आत्महत्येचा प्रयत्न करू पाहतो. पण बायको-मुलीवर, संसारावर असणारं प्रेम त्याला ते करू देत नाही.

 

मग तो सरळ शाहिदकडे जातो. त्याच्या संसारातुन त्याने निघून जावं, असं शांतपणे शाहिदला विनवतो. परिपक्व शाहिद त्याला तसं वचन देतो. त्याप्रमाणे तो पंजाबला निघून जातो. पण हे का घडलं? ह्यावर विचार नक्की कर, असं जातांना आग्रहाने सांगून जातो.

 

आता हमीद फ़िरदोसबरोबर नव्याने संसार मांडू पाहतोय. तिला अधिकचा वेळ देऊ लागतोय. तिला हवी असणारी स्पेस देऊ पाहतोय.

 

आणि एके दिवशी त्याने बाजारात जाऊन टीव्ही खरेदी करून आणलाय, अबूच्या विरोधाला न जुमानता. ते पाहून फ़िरदोसच्या चेहऱ्यावर ख़ुशी आहे. तिची फिरदोस तिला आता गवसणार ह्याची तिला खात्री झालेली असते!

 

नव्वदीच्या दशकातली हि कथा, आजच्या प्रत्येक स्त्रीनं पडद्यावर अवश्य पहावी अशीच. अन प्रत्येक स्त्रीने का पाहावी? हे समजून घेण्यासाठी, प्रत्येक पुरुषाने देखील पाहावी अशीच. लेखक दिग्दर्शकाने कोणताही अभिनावेश न आणता अतिशय शांतपणे, सरळ धोपटपणे, सहजपणे, पण प्रवाहीपणे मांडलेली आहे.

 

मुस्लिम समाजातल्या सामाजिक आणि धार्मिक बंधनांमुळे स्त्रीच्या आयुष्याची होणारी घुसमट दाखवणारा हा चित्रपट. मुस्लिम समाजातल्या स्त्रीला आवश्यक असणाऱ्या स्वातंत्र्याचा मुक्त विचार मांडणारा. विशेष नमूद करण्याची बाब ही की, ह्याचे लेखक, दिग्दर्शक आणि काम करणारे बरेचसे कलाकार हे मुस्लिम धर्मिय आहेत. सर्व प्रमुख पात्रांची कामे यथायोग्य. 'फिरदोस', रितू राजपूत तर लाजवाब.  

जाता जाता थोडंसं:

सिनेमाच्या पोस्टरवरून आणि नावावरून अधीर होऊन, आज रात्रीच कोणी हा चित्रपट पाहणार असेल तर ... नंतर माझ्यावर खापर फोडू नका.

मी हि पोस्टर बघुनच शेमारूवर सिनेमा पहिला होता, खोटं का बोला.

 

anilbagul1968@gmail.com

#Shemaroome #angitheemoviereview  

Thursday 22 April 2021

अंकुर अरोरा मर्डर केस

 

#ankuraroramurdercasereview

‘’क्योकी आप भगवान नही है!’’

‘’आय एम गॉड! मौत के मुहं से निकाला मैने ऐसे हजारो लोगोंको, जिन्हें तुम्हारा भगवान अपने पास बुला रहा था. मुझ मे उतनीही शक्ती है, जितनी उनमे है. 

‘’क्योकीं उस गॉड की गलती कि वजह से हजारो मरीज बिमार होते है और मैं उन्हे ठीक करता हूं. फिर भी आप उसे गॉड कहते हो और मैं एक ब्लडी डॉक्टर?’’

‘’नही. आय एम गॉड! हा मै ही गॉड हू!!’’

 

डॉ आस्थाना, डॉ रिया ह्या इंटर्न डॉक्टरवर बरसत असतो. फिल्मच्या क्लायमॅक्स मधला हा प्रसंग! समरसरसून केलेला अभिनय आणि तितकीच खणखणीत संवादफेक! के के सिंगने खूप ताकदीने उभा केलाय डॉ. अस्थाना. आपल्या वैद्यकीय ज्ञानाने, डॉक्टरी कौशल्याने, प्रथितयश सर्जन म्हणून प्रसिद्ध झालेला पण अहंकार ठसठसून भरलेला डॉ. अस्थाना आपल्या समोर जिवंत उभा केलाय त्याने.

 

सिनेमाचा प्लॉट सांगायचा तर हि आहे एक छोटीशीच गोष्ट. आताचा एकूणच वैद्यकीय व्यवसाय ... हो व्यवसाय, हा नीतिमत्तेचा, साधनशुचितेचा बोळा करून मेडिकल वेस्टच्या डब्यात कसा भिरकावून देतोय हे सांगणारी. डॉक्टर होतांना घेतलेल्या शपथेचा, नोबल प्रोफेशनच्या मास्कच्या आतून कसा गळा घोटला जातोय, हे दाखवणारी. 

 

अंकुर अरोरा हा सात आठ वर्षाचा मुलगा. पोटदुखीच्या त्रासाने हैराण झालेला. त्याची आई त्याला घेऊन येते हॉस्पिटलमध्ये, तपासणीला. हे हॉस्पिटल - 'शेखावत हॉस्पिटल' ह्या शहरातलं नामांकित हॉस्पिटल. प्रसिद्ध सर्जन डॉ. अस्थाना ह्यांच्यामुळे नावारूपाला आलेलं.

 

तर ... अपेंडिक्सचं निदान होतं. तिसऱ्या दिवशी ऑपरेशन ठरतं. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होऊ शकत होतं, पण एक दिवसाचा चार्ज वाढवण्यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट ते करत नाही. हॉस्पिटल मध्ये असलेल्या दुसऱ्या एका इंटर्न डॉक्टरला, डॉ रोमेशला ते खटकतं. डॉ. अस्थाना त्याला त्यापाठीमागचा व्यवहार शिकून घे, असा सल्ला देतात. इंटर्न करतांना नुसतं वैद्यकीय शिक्षणच घ्यायचं नसतं, तर हॉस्पिटल मॅनेजमेंटचा व्यवहारही शिकायचं असतो असं देखील बजावतात.

 

ऑपरेशनच्या दिवशी सकाळी अंकुर चार बिस्किटे खातो, भूक असह्य झाल्याने. हि गोष्ट ड्युटी नर्स, डॉ. अस्थानांच्या निदर्शनास आणून देते. हू sss म्हणून ते हि गोष्ट उडवून देतात. ऑपरेशन कॅन्सल होणार नाही आपण बिस्किटांचा भाग ऑपरेशन करायच्या आधी काढून घेऊ असं बेफिकिरीने सांगतात. पण नेमकं हेच करायला ते विसरतात. ऑपरेशननंतर कॉम्प्लिकेशन होतात.  पेशंटला ऑक्सिजनची गरज भासते.  अंकुर कोमात जातो. दुसऱ्या दिवशी त्याचा जीव हि जातो.   

 

इंटर्न डॉ. रोमेशला हे पटत नाही. तो डॉ अस्थाना ह्यांना आपली चूक कबुल करण्याविषयी सांगतो. डॉ अस्थाना ह्यांच्या अहंकाराला ठेस पोहचते. डॉ. रोमेश इंटर्नशिप अर्धवट सोडून हॉस्पिटल मधून बाहेर पडतो.

 

तो येतो तडक अंकुरच्या आईच्या घरी. वस्तुस्थिती कथन करतो. मग उभा राहतो संघर्ष. न्याय मिळवण्यासाठीचा, त्यांनी दिलेल्या लढ्यातून. हि लढाई कायदेशीर. त्यात वकील महिला त्यांच्या साथीला. समदुःखी असणारी. पुत्रविरहाच्या वेदनांनी होरपळलेली. इथं अंकुरच्या आईचा - नंदिताचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. टिस्का चोप्रानं, ह्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतलाय.

 

शेवटी होतो सत्याचा विजय! डॉ अस्थानाचा अहंकाराचा फुगा, कोर्टाच्या निकालपत्राने टाचणी लावल्यासारखा टचकन फुटतो.

 

डॉक्टरांच्या रुपात देव बघण्याचे ते दिवस. डॉक्टरी पेशा एक नोबल प्रोफेशन असण्याचे ते दिवस. त्यामुळेच कदाचित, २०१३ साली रिलीज झालेली, 'अंकुर अरोरा मर्डर केस', हि फिल्म, फारशी नावाजली गेली नाही. 

 

कदाचित विक्रम भट ह्याने चुकीच्या काळात हि पटकथा लिहिली. किंवा आजच्या काळात ती लिहायला हवी होती. कारण आज जर हि फिल्म रिलीज होती तर सुपर डुपर ब्लॉक बस्टर ठरती!!

 

विशेषतः आजच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील (काही अपवाद वगळता) हॉस्पिटल्स मॅनेजमेंट आणि डॉक्टर्सच्या निषेधार्य वर्तनानंतर तर नक्कीच!

 

मला तर आवडली बुवा ही फिल्म. यु ट्यूब वर आहे उपलब्ध. तुम्ही ही आवर्जून पहा आणि सांगा काय वाटतंय ते!

 

© अनिल सुमति बागुल, नाशिक

anilbagul1968@gmail.com


वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...